मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याचा अजून एक कारनामा समोर आला आहे. पोलिसांनीच त्याबाबत खुलासा केला आहे. या प्रकरणात आता एका मागून एक नवीन खुलासे होत आहे.
मिहीर शहा यावेळी भरधाव चालवत असलेल्या कारबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.मिहीरने गुन्ह्यांत वापरलेल्या कारवर या आधीही पोलिसांनी दोनवेळा कार भरधाव वेगात चालवल्या प्रकरणी चलन कापल्याचे समोर आले आहे.
दरम्यान मिहीर शहाचा चालक परवाना रद्द करण्यासाठी मुंबई पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालयाला, आरटीओला पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच ‘वरळी हिट अँड रन प्रकार घडला तेव्हा कावेरी नाखवा यांना चाक आणि बंपर या दरम्यान फरफटत नेत असताना, पादचारी तसेच रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी हाताने इशारा करून मिहीर शहा याला थांबण्यास सांगितले. मात्र तो थांबला नाही. इतकेच नाही, तर अनेकांनी त्याला आवाजही दिला. मात्र कारच्या काचा बंद असल्याने त्याला आवाज ऐकू आले नाहीत आणि कावेरी यांना तो दीड किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत घेऊन गेला असल्याचे समोर आले आहे.
वरळी येथील मासेविक्री करणारे दाम्पत्य प्रदीप आणि कावेरी नाखवा हे दोघे रविवारी पहाटे कोळीवाड्याच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना, बीएमडब्ल्यू कारने मिहीर शहा याने या दोघांना धडक दिली आणि कावेरी यांना दीड किलोमीटर फरफटत नेले. यानंतर चालक राजऋषी बिडावत याने कारचा ताबा घेत, कावेरी यांना रस्त्यावर ठेवून पुन्हा त्यांच्या अंगावरून कार नेली आणि ते वांद्रे येथे पळून गेले.असा धक्कादायक प्रकार झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे.