आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी सरकारवर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. आदिवासी असल्यामुळे सरकारी नोकरीपासून मला लांब ठेवले जात आहे असे आरोप त्यांनी केले होते. सरकार दुजाभाव करत आहे असे त्या माध्यमांसमोर बोलताना म्हणाल्या होत्या. परंतु आता कविता राऊत यांना सरकारी नोकरी (Government Job) देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्या नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच कविता राऊत यांनी सरकारवर आरोप केले होते. शासकीय नोकरीसाठी अनेकदा अर्ज करून देखील माझ्या अर्जांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आणि माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे, असे वक्तव्य कविता राऊत यांनी केले होते.आता मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र माझी ज्युनिअर खेळाडू ललिता बाबर यांना माझ्यापेक्षा कमी पदके असून गट ‘अ’ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र माझे आताचे पद 2018 च्या जीआरनुसार आहेत. मात्र, आमचे प्रकरण त्याआधीचे असल्याने जुन्या जीआरनुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळावे, अशी अपेक्षा आता कविता राऊत यांनी व्यक्त केली आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
११ वर्षांपासून सरकारी नोकरी मिळण्याची कविता राऊत वाट पाहत असून आता त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत 15 जणांना सरकारी नोकरी दिली जाणार आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
दरम्यान, कविता राऊत यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदके मिळवून दिली आहेत. राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला कविता राऊत यांनी पहिले पदक मिळवून दिलेले आहे. खेळाडूंना देण्यात येणारा सर्वात मोठा म्हणजेच अर्जुन पुरस्कार देखील कविता राऊत यांना देण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून कविता राऊत यांची ओळख आहे.