Nepal Floods : भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये (Nepal floods) गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात पूर आणि भूस्खलनाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. जवळ-जवळ नेपाळ मधील काही भाग हा पाण्याखाली गेला आहे, या पुरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, आतापर्यंत जीव गमावलेल्या लोकांची संख्या 170 वर पोहोचली आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत.
तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे आणि देशाच्या अनेक भागात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर, भूस्खलन आणि पुरामुळे ४२ लोक बेपत्ता आहेत. या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तसेच या पुरात 111 लोक जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वत्र सुरक्षा यंत्रणा कामाला लागली असून, बचाव कार्य वेगाने सुरू आहे. नेपाळ लष्कराने देशभरातून 162 लोकांना एअरलिफ्ट केले आहे. तसेच नेपाळ आर्मी, नेपाळ पोलिस आणि सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांनी पूर आणि पूरग्रस्त भागातून 4,000 लोकांची सुटका केली आहे.
बचावलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांना अन्नपदार्थांसह सर्व आवश्यक मदत साहित्य देण्यात आले आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
माहितीनुसार, शनिवारपासूनच राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला असून, दरड कोसळल्याने शेकडो लोक अनेक महामार्गांवर अडकून पडले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद असून, रस्त्यांवरील माती हटवण्याचे काम देखील सुरु असल्याचे गृह मंत्रालयाचे सांगितले आहे.
नेपाळमध्ये पुरामुळे किमान 322 घरे आणि 16 पुलांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काठमांडू खोऱ्यात 40-45 वर्षांत इतका विनाशकारी पूर आणि पाण्याचा कहर पाहिला नसल्याचे म्हंटले आहे.
बिहारमध्येही पुराचा धोका
नेपाळ लगतच्या बिहारमध्ये देखील 13 जिल्ह्यांतील 16.28 लाखांहून अधिक लोक पुरामुळे धोकादायक परिस्थितीतून जात आहेत. या भागातील नागरिकांना पावसामुळे आधीच पुराचा सामना करावा लागत होता. मात्र, आता नदीच्या प्रवाहाने त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये वाहत येणाऱ्या गंडक, कोसी, महानंदा आणि इतर नद्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी क्षेत्रातील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.