काल संसदेबाहेर झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या दोन खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींमुळे दुखापत झाल्याचा आरोप भाजपने केले आहेत .राहुल यांनी हा आरोप फेटाळून लावला असला तरी भाजपने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे . त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आहे. भारतीय न्याय संहितेच्या नव्या फौजदारी कायद्यातील काही गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील भाजपने तक्रारीत केली आहे. राहुल यांनी जाणूनबुजून खासदारांना धक्का दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य काही खासदारांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये आणखी पाच कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामध्ये कलम 115 (जाणूनबुजून दुखापत करणे), कलम 117 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणे), कलम 121 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून विचलित करण्यासाठी दुखापत करणे), कलम 351 (धमकावणे) आणि कलम 125 (दुसऱ्यांची सुरक्षा धोक्यात टाकणे) या कलमांचा समावेश आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडूनही भाजप खासदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच भाजप खासदारांच्या हातात काठ्या होत्या, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात चळवळ उभी करणार असल्याचे खर्गे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
काय आहे पार्श्वभूमी
संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत भाजप खासदार मुकेश राजपूत आणि प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे राजपूत यांचा तोल जाऊन ते अंगावर पडल्यामुळे राजपूत आणि सारंगी दोघेही जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी सकाळी घडली होती.
या घटनेत प्रतापचंद्र सारंगी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे प्रत्यक्षदर्शी खासदाराने सांगितले. दरम्यान पंजाबच्या फरूखाबादचे खासदार मुकेश राजपूत देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुकेश राजपूत यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेय. तर खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज किशोर यांनी घटनेची निंदा करत कालचा दिवस संसदीय इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान राहुल गांधी हे विरोधी पक्षनेतेपदाच्या लायकीचे नसल्याचे विधान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. एका आदिवासी महिला खासदाराशी त्यांची वागणूक अशोभनीय असल्याची टीकाही चौहान यांनी केली आहे. संसदेच्या मकर दरवाजावर भाजप खासदारांचे आंदोलन सुरू असतानाच ते तिथे आले. एका बाजूने त्यांना जाण्यासाठी जागा असतानाही भाजप खासदारांमध्ये ते घुसल्याचा आरोपही चौहान यांनी केला आहे.
तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू टीका करत म्हणाले आहेत की, राहुल विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना कुस्ती दाखवायची काय गरज आहे. इतरांना मारण्यासाठी ते कराटे शिकले आहेत का? दरम्यान भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे.