विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले आहे .
यावेळी बोलताना त्यांनी, दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून भेट देतो. इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याचे नमूद केले आहे बाबासाहेबांनी याच दीक्षाभूमीवर दीक्षा घेऊन लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसर विकासासाठी विशेष प्रयत्न केले गेले होते. तसेच दादरच्या चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलमधील स्मारक देखील पूर्ण करण्याला देखील महायुती सरकारने प्राथमिकता दिलेली आहे. त्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य व्यक्ती सर्वोच्च पदी बसू शकला, सर्वसामान्य कुटूंबातील नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान तर माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे केवळ संविधानामुळेच शक्य झाले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाचे) राजेंद्र गवई तसेच शिवसेनेतील सहकारी मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आमदार मुरजी पटेल हेदेखील यावेळी उपस्थित होते.