Maharashtra Temprature: विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच वाढला. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले असून, नागरिकांचे घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. त्यातच आज (11 एप्रिल रोजी) नागपूरातील एका गावात उष्माघाताने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यात उष्णतेची धास्ती निर्माण झाली आहे.
या मृत व्यक्तीस आज दुपारच्या सुमारास अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे.या घटनेनंतर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे काय असतात ?
तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आणि भोवळ येणे, मळमळ आणि उलटी होणे, जास्त घाम येणे किंवा घाम न येणे, त्वचा लाल आणि कोरडी पडणे,शरीराचे तापमान वाढणे, स्नायू पेटके येणे, बेशुद्धी अशी लक्षणे उष्माघाताची दिसून येतात.
उष्माघातावर काय उपाय करावे?
-उष्मघात जाणवलेल्या व्यक्तीन थंड आणि हवेशीर ठिकाणी जावे.
-थंड पाण्याने शरीर पुसावे किंवा बर्फ लावावा.
-भरपूर पाणी किंवा ओआरएसचे द्रावण प्यावे.
-तसेच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.