काल (मंगळवारी) जम्मू-काश्मीर मधील पहलगाम बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी याठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष केले. ज्यामध्ये २९ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यूच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हल्ल्यात काही पर्यटक गंभीर जखमी देखील झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी पर्यटकांना धर्म विचारला असल्याचे तेथील पर्यटक सांगत आहेत. पर्यटकांनी हिंदू धर्म सांगताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेने सध्या जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुट्टीच्या दिवसात जम्मूत गेलेले लोक अडकून पडले आहेत. दरम्यान, या दहशदवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पहलगाम मध्ये अशाप्रकारे पर्यटकांना लक्ष करणारी घटना पहिल्यांदाच घडली नाही तर याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. ४ जुलै १९९५ रोजी पहलगामच्या लिडरवाट भागात हरकत-उल-अन्सार नावाच्या दहशतवादी संघटनेने सहा परदेशी पर्यटक आणि दोन मार्गदर्शकांचे अपहरण केले होते. हे पर्यटक अमेरिका, युके, नॉर्वे आणि जर्मनीचे होते. या घटनेने आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. याचा परिणाम काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला सहन करावा लागला होता. यामध्ये दहशतवाद्यांनी एका पर्यटकाची हत्या देखील केली होती. या घटनेनंतर परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
पुढे ऑगस्ट, 2000 मध्ये नुनवान बेस कॅम्पवर (पहलगाम) दहशदवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. अमरनाथ यात्रेसाठी जमलेल्या यात्रेकरूंवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, आता पुन्हा एकदा पहलगाममध्ये दहशदवादी हल्ला झाल्यानंतर सरकार दहशदवाद्यांविरुद्ध कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.