जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या दहशतवादी हल्ल्यात महारष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबाला मदतीची घोषणा केली आहे. फडणवीसांची ५ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सहा जणांचा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचे पार्थिव पुण्यात नेले जातील आणि चार जणांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहेत. आमच्या मंत्र्यांवर याच्या समन्वायाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढे मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे पर्यटक घाबरल्याने त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.