India China: भारत आणि चीन हे दोन्ही देश आशिया खंडातील दोन सर्वात मोठ्या शक्ती आहेत. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यात सांस्कृतिक आणि व्यापारिक संबंध आहेत. प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंनी चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला त्यामुळे भारत-चीनचे संबंध अधिक दृढ झाले होते असे मानले जाते. तसेच प्राचीन काळी, भारत आणि चीनमध्ये रेशीम मार्गाने व्यापार होत होता, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. मात्र, 20 व्या शतकात सीमा विवाद आणि राजकीय मतभेदामुळे दोन्ही देशाच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र आता पुन्हा या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होताना दिसत आहेत. त्यामुळे आज आपण भारत-चीन संबंधाचा सविस्तर आढावा घेऊयात.
नेमका भारत-चीनमधील सीमावाद काय आहे:
-भारत चीन सीमेवरील ‘अक्साई चीन’ हा लडाखमधील एक उंच आणि वाळलेला प्रदेश आहे. भारत हा भाग आपला मानतो. परंतु चीनने 1962 च्या युद्धानंतर यावर ताबा मिळवला आहे. चीनसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण येथून त्यांच्या शिनजियांग आणि तिबेटला जोडणारा महामार्ग जातो.
-दुसरे एक म्हणजे ‘अरुणाचल प्रदेश’ हे भारताच्या ईशान्येकडील राज्य आहे. या राज्याला चीन ‘दक्षिण तिबेट’ म्हणून संबोधतो आणि त्यावर आपला हक्क सांगतो. या भागाला ‘मॅकमोहन लाईन’ देखील म्हणतात. ही लाईन 1914 मध्ये ब्रिटिश भारत आणि तिबेट यांच्यातील करारात निश्चित करण्यात आली होती. पण नंतर चीनने हा करार कधीच मान्य केला नाही.
– भारत चीन यांच्यात या सीमावादावरून सैनिकांमbhध्ये अनेकदा चकमक झाली आहे. परंतु 2020 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली त्यानंतर भारत चीन सबंध अधिक ताणले गेले. या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या चकमकीत चीनी जवानांनी खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा हत्यार म्हणून वापर केल्याचे सांगितले गेले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अत्यंत टोकाला गेला होता आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता.
गलवान खोऱ्यात झालेल्या या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील राजकीय विश्वास कमी झाला. परिणामी भारताने चीनमधील काही ॲप्सवर बंदी घातली होती. तसेच भारताने चिनी गुंतवणुकीवर कडक निर्बंध लादले होते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांवर परिणाम झाला. अर्थातच दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये एकमेकांबद्दल नकारात्मक भावना वाढल्या होत्या.
-परंतु आता पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत बोलताना चीनबरोबरच्या भारताच्या संबंधांबद्दल सकारात्मकपणे बोलल्याचे दिसले. मोदी म्हणाले आहेत की, भारत-चीनच्या सीमेवरील तणाव निवळला असून परिस्थिती सामान्य झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी चीनबरोबरील संबंध अधिक चांगले करण्याचे आवाहनही केले आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी मोदींच्या या वक्तव्यांचे कौतुक केले होते . ते म्हणाले की, “दोन्ही देशांनी एकमेकांचे सहकारी होत एकमेकांच्या प्रगतीमध्ये योगदान दिले पाहिजे.”
-ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींनी रशियामध्ये ब्रिक्स परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भविष्यातील सहकार्य करण्याची भूमिका मांडली होती.
-जानेवारी महिन्यात दोन्ही देश थेट विमान प्रवासाला परवानगी देण्यासाठी तयार झाले आहेत.
– विशेष म्हणजे २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीन-भारत सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक बंदोबस्त कडक होता. परंतु आता दोन्ही देशांनी सीमेच्या काही ठिकाणाहून सैन्य मागे घेतले आहे. ज्यामुळे भारत-चीन संघर्ष कमी होत आहे, अशा चर्चा आहेत.
– विशेष म्हणजे दोन्ही देशांनी सीमाभागातील तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू केल्या आहेत. परंतु असे असेल तरी दोन्ही देशांमधील काहीशी कटुता कायम आहे.
दरम्यान, आता या वर्षी जुलै महिन्यात ब्रिक्स परिषद आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात जी-20 ची बैठक आहे. तसेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक देखील होणार आहे. या बैठकांच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना पुन्हा एकमेकांची भेट घेण्याची संधी मिळणार आहेत. त्यामुळे या भेटीदरम्यान दोन देशाचे संबंध सुधारण्यासाठी काही महत्वपूर्ण चर्चा होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.