महाराष्ट्राची संस्कृती ही संतपरंपरेने समृद्ध आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांसारख्या संतांनी लोकांपर्यंत अध्यात्म सहज आणि समजण्याजोग्या भाषेत पोहोचवले. त्यांनी दिलेला भक्तीचा संदेश लोकांच्या जीवनाचा एक भाग झाला. याच भक्तीच्या परंपरेचा उत्कट आणि जीवंत अनुभव म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी, एक अत्यंत प्राचीन, पवित्र आणि जनतेच्या हृदयाशी नाते जोडलेला सोहळा. वारी म्हणजे फक्त धार्मिक यात्रा नाही, ती मनाची एक यात्रा आहे जी भक्तीपासून एकतेकडे, अंधश्रद्धेपासून आत्मप्रकाशाकडे नेणारी वाट आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण वारीशी संबंधित अनेक रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.
वारी म्हणजे काय?
भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन-विलीन होण्यासाठी जी, आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी-कार्तिकी पायी यात्रा केली जाते, तिलाच भागवतधर्मामध्ये ‘वारी’ असे म्हणतात. वारीची सुरुवात ज्ञानोबा-तुकाराम या नामघोषात आळंदी आणि देहू येथून होते. यादरम्यान लाखो वारकरी दरवर्षी १८-२० दिवसांचा प्रवास करतात. या चालण्याला ‘दिंडी’ म्हणतात आणि यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीस ‘वारकरी’ म्हणतात.
समानतेचा आणि श्रद्धेचा सोहळा
वारी म्हणजे भक्तीचा एक असा सुंदर सोहळा आहे, जिथं छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत, उंच-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव केला जात नाही. इथे सर्वजण एकसमान असतात कारण सर्वांची ओळख एकच असते ती म्हणजे ‘माऊली’ म्हणूनच वारीमध्ये कुणालाही नावाने किंवा पदाने बोलावले जात नाही तर सर्वांना माऊली” म्हणूनच आदराने संबोधले जाते.. खरं म्हणजे वारी हे समानतेचे, प्रेमाचे आणि भक्तीचे विद्यापीठ आहे. इथे कुणाकडे किती शिक्षण आहे, किती पैसा आहे, हे महत्त्वाचे नाही, महत्त्वाचे असते ते म्हणजे त्याचे विठोबावर असलेले प्रेम आणि श्रद्धा. म्हणूनच, वारीत सहभागी झालेला प्रत्येकजण हा “श्रद्धेचा पदवीधर” असतो.
पंढरपूर – भक्तांचे तीर्थक्षेत्र
पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. याला ‘दक्षिणेची काशी’ असेही म्हटले जाते. येथे वर्षातून चार मोठ्या वाऱ्या होतात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. वारकरी पंथ हा भागवत धर्म मानणारा असून, त्यामध्ये भक्ती, साधेपणा आणि सामूहिक साधना यांना फार मोठे महत्त्व आहे.
वारीचा इतिहास
वारीची परंपरा तेराव्या शतकात सुरू झाली असल्याचे उल्लेख आहेत. संत ज्ञानेश्वरांचे वडीलही वारी करत असत. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा प्रसार करून जातीपातींच्या पलीकडे जाऊन सर्वांना वारीमध्ये सामावून घेतले. त्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी ही परंपरा पुढे चालवली. मात्र, या संप्रदायाचा प्रारंभ भक्त पुंडलिकापासून मानला जातो.
वारी करणाऱ्यांचे (वारकऱ्यांचे) जीवनतत्त्व
वारी करताना आणि दैनंदिन आयुष्यातही वारकऱ्यांनी काही नियम पाळावेत असा संदेश संतांनी दिला आहे:
1.गळ्यात तुळशीमाळ धारण करणे
2.भाळी गोपीचंदनाचा टिळा लावणे
3.नित्य हरिपाठ वाचणे
4.संत साहित्याचा अभ्यास
5सात्विक जीवनशैली, परोपकार
6.एकादशीचं व्रत पाळणे
7.भजन-कीर्तनात सहभाग घेणे
या साऱ्यांचा उद्देश म्हणजे संसारात राहूनही विठोबाच्या स्मरणात रमणे हा आहे.
मानाच्या पालख्या
वारीमध्ये काही प्रमुख संतांच्या पालख्या असतात ज्यांना ‘मानाच्या पालख्या’ म्हणतात:
संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
संत तुकाराम महाराज (देहू)
संत एकनाथ महाराज (पैठण)
संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर)
याशिवाय, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा आणि रुक्मिणी मातेच्या पालख्याही सहभागी होतात. या सर्व पालख्या पोहचल्यावर सर्वांत शेवटी आणि अत्यंत सन्मानाने संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करते.
वारीचे विशेष वैशीष्ट्य
वारी ही भक्ती, साधेपणा, शिस्त आणि सामूहिकतेचे उत्तम उदाहरण आहे. लाखो लोकांची ही यात्रा अत्यंत शिस्तबद्ध रितीने पार पडते. प्रत्येक वारकरी आपली सेवा निःस्वार्थपणे पार पाडतो. टाळकरी, पखवाज वाजवणारे, हंडेवाले, पताकावाले, जेवण बनवणारे, तंबू उभारणारे सर्वजण आपले काम समर्पणभावनेने करतात. सकाळी बरोबर सहाला पालखी निघते, विश्रांती आणि जेवणासाठी ठरावीक वेळा असतात. नियोजन इतके उत्कृष्ट असते की लाखोंच्या संख्येतील लोकही गडबड न करता व्यवस्थितपणे या सोहळ्यात सहभागी होतात. वारकऱ्यांचे हे नियोजन एखाद्या मिल्ट्रीच्या शिस्तीप्रमाणे चालते. हे पाहून अवाक व्हायला होतं.
रिंगण सोहळा
वारीमधील एक अद्वितीय सोहळा म्हणजे रिंगण. रिंगणात पवित्र ध्वज घेऊन वारकरी एका गोलात धावतात. यामुळे आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण होते. रिंगण म्हणजे फक्त धावणे नाही, तर भक्तीच्या लाटांमध्ये स्वतःला झोकून देणे आहे. हे रिंगण संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर ठराविक ठिकाणीच होते, जसे की वाखरी, बेलवंडी, अकलूज, इत्यादी. हा भव्य सोहळा पाहणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. तो पाहण्यासाठी फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटक देखील उपस्थित राहतात.
शासनाची भूमिका
वारीचा हा भव्य सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून शासन, पोलीस यंत्रणा आणि हजारो स्वयंसेवक अहोरात्र झटत असतात. यादरम्यान पाणी, रस्ते, आरोग्य यांची उत्तम सोय केली जाते. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची आरती केली जाते. यादरम्यान एका सर्वसामान्य वारकरी दांपत्यालाही मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या आरतीचा मान दिला जातो. ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना विठ्ठलाची सेवा करण्याचा 4 वेळा मान मिळाला आहे.
२०२५ ची वारी – एक खास संधी
यंदाची वारी खास आहे कारण या काळात तीन एकादशींचा अद्वितीय संयोग आला आहे. यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून २०२५ रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून २०२५ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. तर वारीचा समारोप १७ जुलै २०२५ ला आषाढी एकादशीला होईल.
एकुणच वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती एक जीवनपद्धती आहे. भक्ती, समानता, शिस्त, परोपकार आणि आत्मिक समाधानाचा हा मार्ग लाखो वारकऱ्यांना एकत्र आणतो. त्यामुळे शेकडो वर्षांपासून आजही ही परंपरा तितक्याच भक्तिभावाने आणि एकतेने पाळली जाते, म्हणूनच वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाची शान आहे. तसेच ही आपल्या महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक शिदोरी आहे. जपण्यासारखी आणि शिकण्यासारखी!