Jyoti Malhotra Case: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती.परंतु याच परिस्थितीदरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागातून नुकतेच 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीचा देखील समावेश आहे.
कोण आहे ज्योती मल्होत्रा:
ज्योती मल्होत्रा ही हरियाणामधील हिसारची रहिवासी आहे. तिचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचे युट्यूब चॅनेल आहे. ती या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंगचे व्हिडीओ टाकत असते. विशेष म्हणजे त्यामध्ये ती देश-विदेशातील पर्यटनस्थळाच्या भेटीचे देखील व्हिडीओ अपलोड करते. तिच्या या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळतो. ज्योती मल्होत्राचे यूट्यूबवर ३.७७ लाखहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तर फेसबुकवर तिचे ३.२१ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतीच ज्योतील पाकिस्तानसाठी हेरागिरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय:
ज्योतीने पाकिस्तानला भेट दिलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत. परंतु ज्योती मल्होत्रावर बऱ्याच काळापासून भारतीय सुरक्षा एजन्सी नजर ठेवून होती. त्यानंतर 15 मे रोजी सकाळी 9.30 वाजता हिसार पोलीस अधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास तिच्या घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिला सरकारी गोपनीय कायदा आणि भारतीय न्याय संहिता 152 अंतर्गत अटक केली आहे.
हिसार पोलिसांनी ज्योतीला अटक केल्यानंतर काय माहिती दिली :
-ज्योतीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही संशयास्पद माहिती सापडल्याची माहिती हिसार पोलिसांनी दिली आहे.
-ज्योतीला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे आणि चौकशी सुरू आहे. ती सतत एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती याबद्दल सविस्तर माहिती मागवली जाणार आहे, असे हिसार पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ज्योतीचा सावळा गोंधळ:
ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानमधील कारनामे नुकतेच उघडकीस आले आहे. कारण साधारणपणे जेव्हा एखादा भारतीय नागरिक पाकिस्तानला भेट देतो, तेव्हा त्याच्यावर पोलिस पातळीवर लक्ष ठेवले जाते. तो फक्त व्हिसामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी जाऊ शकतो. मात्र ज्योतीला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी वागणूक मिळत असे. तिला पाकिस्तानी पोलिसांकडून सुरक्षा देखील दिली जात होती. एवढेच नाहीतर ती पाकिस्तानातील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सहभागी होत असे. तसेच पाकिस्तान दौऱ्यादरम्यान ती पाकिस्तान गुप्तचर संस्थांना तसेच इतर उच्च अधिकाऱ्यांना भेटत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
ज्योतीची पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी कशी ओळख झाली:
ज्योतीने पोलिसांना निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीला पाकिस्तान एक्सप्लोर करायचे होते. यासाठी ती २०२३ मध्ये पहिल्यांदा व्हिसा मिळविण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात गेली होती. दूतावासात गेल्यानंतर ती तेथील दानिश नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीला भेटली. यावेळी दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. या पहिल्या भेटीतच दानिश ज्योतील मैत्रीच्या योग्यतेचा वाटला. त्यामुळे दूतावासातून परतल्यानंतर ती व्हिसाच्या बहाण्याने दानिशशी फोनवर बोलू लागली.
त्यानंतर २०२३ मध्ये तिला पाकिस्तानचा 10 दिवसांचा व्हिसा मिळाला होता. परंतु दानिश आणि ज्योतीची मैत्री वाढल्याने दानिशने तिला पाकिस्तानात गेल्यानंतर ‘अली अहवान’ नावाच्या व्यक्तीला भेटण्यास सांगितले. दानिशच्या सांगण्यावरून ज्योती पाकिस्तानला गेल्यानंतर अली अहवानने तिच्या प्रवासाची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था केली. याच अलीने अहवानने ज्योचीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थांचे अधिकारी शाकीर आणि राणा शाहबाजशी करून दिली. यावेळी ज्योतीने शाकीरचा मोबाईल नंबर घेतला. तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या नंबरबद्दल शंका येऊ नये म्हणून तिने तो नंबर ‘जट रंधावा’ या नावाने सेव्ह केल. या ओळखीमुळे तिने भारतात परतल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सअॅप, , टेलिग्राम आणि इतर माध्यमांद्वारे ती भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवू लागली, अशी माहिती समोर आली आहे.
ज्योतीसह पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरागिरी करणारे अटक झालेले व्यक्ती कोण:
-हरियाणा पोलिसांच्या स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली कैथलमधील मस्तगढ गावातील रहिवासी देवेंद्र सिंग या २५ वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
देवेंद्र सिंगवर भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित माहितीसह गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.
-पंजाब पोलिसांनी गुजाला आणि यामिन मोहम्मद अशा दोन व्यक्तींना अटक केली आहे. ते पंजाबमधील मालेरकोटला येथील रहिवासी आहेत. पोलीस पथकांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीत असे समोर आले आहे की, हे दोघे भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला शेअर करत होते आणि त्या बदल्यात ऑनलाइन माध्यमातून पैसे घेत असे.
दरम्यान, एकीकडे भारताचे सैन्य सीमेवर दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आणि भारताच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे आपल्याच देशातले लोक पैशांच्या हव्यासापोटी देशासोबत गद्दारी करत आहे. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.