गेल्या काही काळापासून देशातील काही मदरशांबाबत समाजात चिंता आणि शंका वाढताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे या संस्थांमधून धर्माच्या नावाखाली अराजक, बालशोषण आणि बेकायदेशीर कृत्यांच्या घटना समोर येत आहेत, खरतर हे अत्यंत दुर्दैवी आहे. एप्रिल 2025 मध्ये सिंधुदुर्गमधील एका अवैध मदरशात दोन तलवारी सापडल्या होत्या तर नांदेड, भिवंडी आणि कळवा यांसारख्या ठिकाणी लहान मुलांवर अत्याचार आणि जबरदस्तीने काम करवून घेतले जात असल्याच्या घटना उजेडात आल्या होत्या.त्यामुळे हे मदरसे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा सरकार कारवाई करत मदरसे बंद करते, तेव्हा काहींना ते धर्मविरोधी वाटते; पण वस्तुस्थिती अशी आहे की धर्माच्या नावाखाली असे धंदे सुरु असतील तर त्यावर प्रतिबंध करणे आवश्यक ठरते. त्यातच आता या अराजकतेतून बाहेर येत काही मदरसे सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, उत्तराखंड मदरसा बोर्डाचा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’(Operation Sindoor) समाविष्ट करण्याचा निर्णय त्याचाच एक सकारात्मक टप्पा म्हणता येईल.
राष्ट्रभक्तीची बीजे पेरणारा निर्णय
उताराखंड चे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या निर्देशानंतर उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश अभ्यासक्रमात करत असल्याचे जाहीर केले आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला. त्यांच्या मते, उत्तराखंड ही वीरांची भूमी असून, इथल्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लष्करी पराक्रमाची ओळख करून घेतली पाहिजे. सध्या राज्यात ४५१ नोंदणीकृत मदरसे आहेत, ज्यात सुमारे ५०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या नव्या उपक्रमाअंतर्गत ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित स्वतंत्र प्रकरण आलिया (इंटरमिजिएट) स्तरापर्यंत शिकवले जाईल. अभ्यासक्रम कसा असावा, हे निश्चित करण्यासाठी लवकरच समितीची बैठक होणार आहे.
पंतप्रधानांचे अभिनंदन तर काॅंग्रेसवर टिका
कासमी हे ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करताना म्हणाले की, उत्तराखंडमधील मदरशांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आमच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, आम्ही अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समावेश करणार आहोत, काँग्रेसला लक्ष्य करत ते म्हणाले की, पक्षाने “आमच्या समुदायाला एकाकी पाडले असून, मुख्य प्रवाहापासून दूर नेले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबतचा धडा शिकवला जाईल याची खात्री करू. आम्ही मुलांना ऑपरेशन सिंदूर काय होते आणि ते का आवश्यक होते? हे शिकवू. ऑपरेशन सिंदूर आवश्यक होते कारण पाकिस्तान हा एक दुष्ट देश आहे आणि त्यांनी आपल्या नागरिकांचे जीव घेतल्यामुळे त्यांना धडा शिकवावा लागला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
BIG BREAKING NEWS 🚨 Operation Sindoor will be part of Madrasa Syllabus in Uttarakhand 🔥🔥
Madrasa students will also be taught the reasons why it was conducted.
Uttarakhand will be the first state to teach students about Operation Sindoor.
A whole chapter will be dedicated… pic.twitter.com/329dHBNzsE
— Times Algebra (@TimesAlgebraIND) May 20, 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ – भारतीय सैनिकांच्या शौर्याची साक्ष
७ मे २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांना जीव गमवावा लागला. या क्रूर घटनेनंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही विशेष कारवाई राबवली. अवघ्या २५ मिनिटांत, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांचे नऊ दहशतवादी तळ भारतीय हद्दीतूनच लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई जलद, अचूक आणि अत्यंत प्रभावी ठरली. यातून भारताची लष्करी क्षमता आणि धैर्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडले.
का आवश्यक आहे हा समावेश?
मदरसे ही मुस्लिम समाजातील पारंपरिक शैक्षणिक व्यवस्था असून, गेल्या काही वर्षांत इथे आधुनिक शिक्षणालाही महत्त्व दिले जात आहे. अशा संस्थांमध्ये देशाच्या सुरक्षेशी संबंधित ऐतिहासिक घटनांचा समावेश होणे हे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या घटनांमधून केवळ शौर्य शिकवले जात नाही, तर विद्यार्थ्यांना देशासाठी झटणाऱ्या जवानांचे बलिदानही जाणवते. अशा शिक्षणातून देशाच्या सुरक्षिततेबाबत सजगता येते आणि देशप्रेमाची बीजे रुजतात.
एकात्मतेकडे वाटचाल
भारताचे लष्कर हे जगातील सर्वोत्तम लष्करांपैकी एक आहे. त्याच्या शौर्यकथा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असाव्यात, हे शिक्षणतज्ज्ञांचेही मत आहे. मदरशांमध्ये अशा विषयांचा समावेश झाल्यास, मुस्लिम विद्यार्थ्यांमध्येही लष्कराविषयी अभिमान निर्माण होईल. या उपक्रमातून केवळ शैक्षणिक भर पडणार नाही, तर विविधतेत एकता ही भारताची खरी ओळख अधिक बळकट होईल. एक समाज म्हणून आपल्याला जोडणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे, आणि हा निर्णय त्या दिशेने एक पाऊल आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत जेडीयूची भूमिका
जेडीयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, उत्तराखंडमधील मदरशांच्या अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समावेश करणे हे एक चांगले पाऊल आहे. जर बिहारच्या शिक्षण विभागानेही असा निर्णय घेतला तर ते एक स्वागतार्ह पाऊल असेल. संपूर्ण देशाला सैन्याच्या शौर्याचा अभिमान आहे,
इतर राज्यांसाठी प्रेरणा
उत्तराखंड मदरसा बोर्डाचा निर्णय देशभरातील इतर राज्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरू शकतो. मदरसे हे केवळ धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था नसून, समाजाला दिशा देणाऱ्या केंद्रेही बनू शकतात. अलीकडेच अलीगडमध्ये काही विद्यार्थ्यांचे आयसिसशी कथित संबंध समोर आले होते, त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील हा निर्णय अधिक सकारात्मक वाटतो. यामुळे शिक्षणसंस्थांकडून समाजासाठी बांधिलकीची भावना व्यक्त होते.‘
ऑपरेशन सिंदूर’च्या समावेशामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेची समज मिळेल, त्यांना सीमारेषेवरील संकटांची जाणीव होईल आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणाही मिळेल.
एकूणच, उत्तराखंड मदरसा बोर्डाचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापित करणारा ठरत आहे. राष्ट्रप्रेम, शौर्य आणि ऐतिहासिक घटनांबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. मदरसे हे फक्त धार्मिक शिक्षणाची केंद्रे न राहता, समाज निर्माण करणाऱ्या संस्था बनाव्यात, हीच या निर्णयामागची दूरदृष्टी आहे.