पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या गोटात मोठी खळबळ उडवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा (LeT) सहसंस्थापक आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा याच्यावर लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. विडंबन असे की, जो व्यक्ती इतरांच्या प्राणांवर उठला होता, त्याच्यावरच आता प्राणघातक हल्ला झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हमजाची प्रकृती अतिशय गंभीर असून तो कधीही अखेरचा श्वास घेऊ शकतो, असंही समजतंय. खरं म्हणजे दहशतवाद पेरणाऱ्यांवरच अशा प्रकारे दहशतीचे सावट कोसळणे, हे त्यांच्या हिंसक विचारधारेचे दाहक वास्तव अधोरेखित करते. असो नमके प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.
प्रथम सामान्य रुग्णालयात, नंतर सैन्य रुग्णालयात हलवले
आपल्याकडे एक म्हण आहे “जशी करणी तशी भरणी” हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, त्याचे झाले असे की दहशतवादी आमिर हमजावर मंगळवारी (तारीख २० मे) जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर सायंकाळी काही व्यक्ती हमजाला लाहोरमधील एका रुग्णालयात घेऊन आले. त्याच्या शरीरावर जबर मारहाणीचे स्पष्ट खुणा आढळल्या असून, डोक्यावर, नाकावर आणि शरीराच्या विविध भागांवरून रक्तस्त्राव होत होता. गंभीर स्थितीमुळे त्याला तात्काळ लाहोरमधील सैन्यच्या बेस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एक भारत रत्न गुमनाम को दे देना चाहिए
लश्कर-ए-तैयबा के सह-संस्थापक और हाफिज सईद के करीबी सहयोगी मौलाना आमिर हमजा को लाहौर में उनके घर के अंदर 'अज्ञात बंदूकधारियों' ने गोली मारकर घायल कर दिया। https://t.co/2G0drdtVzR— Sumit upadhyay 🇮🇳 (@Sumitupa05) May 20, 2025
मुंबई हल्ल्याचा मोस्ट वाँटेड आरोपी
आमिर हमजा हा 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मोस्ट वाँटेड आरोपी आहे. अमेरिकेने 2012 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाल्याचा रहिवासी असलेल्या हमजाला हाफिज सईदचा अतिशय जवळचा सहकारी मानले जाते. एवढेच नव्हे तर दहशतवादी हमजा हा लष्करच्या आघाडीच्या संघटनेचा, जमात-उत-दावाचा प्रमुखही आहे, ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी फंडिंग उभारण्याचे काम करते. मात्र, गेल्या काही काळापासून हाफिज सईद आणि आमिर हमजा यांच्यात पैशावरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे.
आमिर हमजाची दहशतवादी पार्श्वभूमी
1980 च्या दशकात आमिर हमजाने हाफिज सईद व अब्दुल रहमान मक्कीसोबत ‘लष्कर-ए-तैयबा’(LeT) ची स्थापना केली. त्यांचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आणि विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणे हा होता. मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड्सपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमजाने अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामध्ये 2024 साली, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करणे असेल,जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करणे असेल, किंवा ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवण्यात सहभाग घेणे असेल या सगळ्या कटकारस्थानामध्ये त्याचा हात होता.
त्याचा खरा प्रभाव मात्र ‘पडद्यामागे’ अधिक होता. लष्कर-ए-तैयबासाठी तो निधी उभारत असे, आणि नव्या तरुणांना धर्माच्या नावाखाली अतिरेकी बनवत असे. आमिर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचे मुखपत्र देखील चालवतो. संपादक म्हणून त्याने सातत्याने कट्टरपंथी, भारतविरोधी आणि हिंसक मजकूर प्रसारित केला आहे. २००२ मध्ये त्याने लिहिलेले “काफिला दावत और शहादत” हे पत्रक म्हणजे जणू जागतिक जिहादासाठी एक जाहिरातच होती. धर्माच्या नावावर जगभर हिंसा भडकवण्यासाठी लष्करच्या विचारसरणीला त्याने सातत्याने खतपाणी घातले.
आमिर हमजा आणि हाफिज सईदचा वाद
खरंतर 2018 साली आमिर हमजा आणि हाफिज सईद यांच्यात निधीच्या विषयावर मोठा वाद झाला होता. लष्कर-ए-तैयबासाठी जमा होणाऱ्या पैशांवरून त्यांच्यात मतभेद झाले. त्याच सुमारास, आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तान सरकारने लष्करवर निधी गोळा करण्यावर बंदी घातली. हमजाला वाटायचे की, हाफिज सईदने सरकारवर दबाव टाकला असता, तर ही बंदी लागू झाली नसती. या मतभेदांनंतर हमजाने लष्करपासून वेगळे होऊन ‘जैश-ए-मनकाफा’ नावाची नवीन संघटना तयार केली. तिचे मुख्य काम म्हणजे दहशतवादासाठी पैसे जमवणे. प्रत्यक्ष कारवायांपासून दूर राहूनही हमजा दहशतवादी विचारसरणी पसरवण्यात सक्रिय होता. आता तो मरणासन्न अवस्थेत आहे, पण त्याच्यावर हल्ला नेमका कोणी आणि का केला हे अजूनही समोर आलेले नाही. शिवाय पोलिस किंवा लष्कराकडून यावर कोणताही खुलासा झालेला नाही.
दोन दिवसांपूर्वीच हाफिजचा आणखी एक साथीदार ठार
आमिर हमजावर हल्ला होण्यापूर्वी रविवारी पाकिस्तानातील सिंध प्रांतात आणखी एक “महत्त्वाची” म्हणजेच दहशतवादी गोटासाठी धक्का देणारी घटना घडली. लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ दहशतवादी अबू सैफुल्ला खालिद, ज्याला रजाउल्लाह निजामानी खालिद म्हणूनही ओळखले जाते, त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या घरातच गोळीबार केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. 2000 पासून भारत-नेपाळ सीमेवर दहशतवाद्यांची भरती, पैशांचा पुरवठा आणि हालचाली यांचे कामकाज सांभाळणारा हा खालिद, अखेर स्वतःच्या घरातच गोळ्यांचा मारा झेलून मेला. खालिदचा दहशतवादी ‘कारकीर्दीचा’ इतिहासही काही कमी नाही. 2005 मध्ये बंगळुरूच्या IISc वरील हल्ला असो, किंवा 2006 मध्ये नागपूरच्या RSS मुख्यालयावरचा हल्ला असो, या सगळ्यामागे त्याचा हात होता. पण आज त्याच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना पाकिस्तान सरकार मात्र नेहमीप्रमाणे यावर मौन बाळगून आहे.
या घटनेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, ती म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये सध्या काहीतरी अंतर्गत घुसमट आहे. एकामागोमाग एक दहशतवादी अज्ञात हल्ल्यांमध्ये ठार होतायत, आणि तरीही सरकार, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा काहीच बोलत नाहीत. हे चित्र हेच सुचित करते की आता दहशतवाद्यांच्या घरातच दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
भारतावर आरोप करणाऱ्या पाकिस्तानला आत्मपरीक्षणाची गरज
जम्मू-काश्मीरमध्ये सतत हिंसा भडकवणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच दहशतवादाने वेढले आहे. मागील काही वर्षांत पाकिस्तानमध्ये झालेले बॉम्बस्फोट, हल्ले, हत्या या घटना पाकिस्तानच्या अस्थिर आणि गोंधळलेल्या कारभाराकडे अंगुलीनिर्देश करतात. दुसरीकडे भारताने मात्र कधीही हिंसेचे समर्थन केले नाही, ना अशा संघटनांना पाठिंबा दिला. पण आता पाकिस्तानातीलच दहशतवाद्यांच्या हत्या, हल्ले हे त्यांच्या स्वतःच्या कुचेष्टेचा परिणाम असल्याचे चित्र उभे राहत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या धोरणकर्त्यांनी आज स्वतःला एकच प्रश्न विचारावा. हे सगळं कशासाठी?
काश्मीरवर दावा, भारताविरुद्ध असंतोष, धार्मिक युद्ध यांची व्याख्या करत करत त्यांनी आपल्या देशालाच एक दहशतवादी कार्यशाळा बनवले आहे, आणि आता त्या कार्यशाळेतच स्फोट होतोय. ज्या देशात दहशतवाद्यांना संरक्षण मिळते तेथे नागरिक कितपत सुरक्षित राहतील? हा खरा सवाल आहे. आज जग पाकिस्तानला संशयाच्या नजरेने पाहतंय. अमेरिका, युरोप, अगदी सौदी अरेबियासारख्या देशांनीही दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आहे. एक चीनचा अपवाद वगळला तर अन्य देश पाकिस्तानला फारसे सिरियस घेत नाहीत पण तरीही या देशाने अजूनही आत्मपरीक्षण न करणे हीच त्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे.