छत्तीसगडच्या अतिदुर्गम अबूझमाड जंगलात नुकत्याच पार पडलेल्या “ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट” (Operation Black Forest) दरम्यान सुरक्षा दलांनी माओवादी चळवळीतील एक महत्त्वाचा अध्याय संपवला. तब्बल १ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा झालेला आणि अनेक हिंसक घटनांचा सूत्रधार असलेला नंबाला केशवराव उर्फ बसव राजू सुरक्षा दलाच्या चकमकीत ठार झाला. या ऑपरेशन दरम्यान बसव राजु बरोबरच त्याचे इतर सहकारी देखील ठार झाले आहेत. मात्र मात्र बसव राजूचा खात्मा हा माओवादी चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय सुरक्षा दलांनी ही कामगिरी कशी पार पाडली? सविस्तर जाणून घेऊयात.
ऑपरेशनची पार्श्वभूमी
अबूझमाड हा नक्षलवाद्यांचा ‘सेफ झोन’ म्हणून ओळखला जातो. येथे सुरक्षा यंत्रणांना बसव राजूच्या हालचालींची गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव येथून DRG (District Reserve Guard) च्या तुकड्या पाठवण्यात आल्या. जोरदार चकमकीनंतर एकूण २६ माओवादी ठार झाले, त्यात बसव राजूचा समावेश होता.
बसव राजू कोण होता?
बसव राजू हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमचा रहिवासी होता. शिक्षणाने तो B.Tech इंजिनीअर होता तसेच कधी काळी तो कबड्डीपटू म्हणून ओळखला जायचा. मात्र १९८० च्या दशकात CPI (ML) पीपल्स वॉर ग्रुपमध्ये सामील झाल्यावर त्याने हिंसेचा मार्ग स्वीकारला. २०१८ मध्ये गणपती उर्फ मुप्पला लक्ष्मण रावच्या जागी CPI (माओवादी) चा तो महासचिव झाला होता.
बसव राजूचा गुन्हेगारी इतिहास
२००३ मध्ये तेव्हाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर ११ IED च्या साहाय्याने घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये बसव राजूचा सहभाग होता. बसव राजू IED स्फोटक बनवण्यातही तरबेज होता. त्याच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमधील चिंतलनार येथे CRPF जवानांवर हल्ला झाला होता, ज्यात ७६ जवान शहीद झाले. त्याशिवाय झिरम घाटीतील काँग्रेस नेत्यांवरचा घातपात आणि तेलुगू देसमच्या दोन आमदारांच्या हत्या यामध्येही त्याचा थेट सहभाग होता. बसव राजू केवळ एक गुन्हेगार नव्हता, तर माओवादी विचारधारेचा कट्टर प्रचारक होता. त्याचे संबंध LTTE सारख्या दहशतवादी गटांशी असल्याचे तपास यंत्रणांनी उघड केले होते. त्याने ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनेक भूमिगत गटांचे नेतृत्व केले होते.
सुरक्षा दलांचे अतुलनीय धाडस
छत्तीसगडच्या कुर्रेगुट्टा डोंगरावर असलेल्या नक्षल मुख्यालयावर झालेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी अतुलनीय धाडस दाखवलं. DRG (District Reserve Guard), CRPF, कोब्रा कमांडो आणि स्थानिक पोलीस यांचं हे संयुक्त ऑपरेशन होतं. अबूझमाडसारख्या दुर्गम जंगलात २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करणे हे सोपे काम नव्हते पण सुरक्षा दलांनी ते करून दाखवले. बसव राजूच्या रूपाने महासचिव स्तराचा नेता ठार मारणे ही गेल्या ३० वर्षांतील पहिलीच वेळ आहे. खरं म्हणजे बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे एकप्रकारे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या यशाबद्दल सर्व सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे.
अमित शहा यांच्या मते, “ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट” दरम्यान छत्तीसगडमधील कुर्रेगुट्टा डोंगरावर असलेले नक्षल मुख्यालय उद्ध्वस्त केल्यापासूनच नक्षलवादी गट पूर्णपणे बिथरले आहेत. त्यांचे नेतृत्व कोलमडले असून, त्यांच्या हालचाली निष्प्रभ झाल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे, ऑपरेशन संपल्यानंतर अवघ्या १० दिवसांत ५४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून ८४ जणांनी आत्मसमर्पण केले आहे.या वर्षात आतापर्यंत ८०० हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, हे पाहता, ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद पूर्णतः संपवण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट आणि ठाम असल्याचेही अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1925436869321625956
माओवादी संघटनेवर परिणाम
या चकमकीमुळे माओवादी संघटनेचे मनोबल मोठ्या प्रमाणात खचत असल्याचे दिसून येत आहे. कारण बसव राजूच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीचं नेतृत्व अधिकाधिक तुटपुंजे आणि विस्कळीत होत चालले आहे. बस्तरमधील एका स्थानिक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नक्षल प्रवक्ते अभय यांनी सांगितले आहे की, सुरक्षा दलांचा चारही बाजूंनी प्रभाव इतका वाढलेला आहे, की मोठे नक्षलप्रमुख एकत्र येऊन बैठक घेणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ऑपरेशनना प्रत्युत्तर देण्यास ठोस योजना नाहीत. बसव राजूचा खात्मा ही केवळ एक व्यक्तीचा अंत नसून माओवादी हिंसक विचारसरणीच्या नेतृत्वाला मोठा धक्का आहे.
या मोहीमेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा आता नक्षल समस्येचा मुळापासून बंदोबस्त करण्याच्या दिशेने ठामपणे पावले उचलत आहेत. त्यामुळे २०२६ पूर्वी नक्षलवादाचा पूर्णतः नायनाट करणे हे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता अधिक स्पष्ट आहे.