India Turkey Relation: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवादा विरोधात मोठी कारवाई केली. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली आणि नंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्विकारली. परंतु या सगळ्यात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. तर चीन आणि तुर्कीने, अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला याचे एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे तु्र्कीही मुस्लिमबहुल देश आहे. पण तुर्कीने केवळ हाच उद्देश समोर ठेवून पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही तर आणखी एक महत्वाचे कारण आहे. मग नेमका तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा देण्यामागचा उद्देश काय होता, याचा सविस्तर आढावा आपण आजच्या लेखातून घेऊयात.
पाकिस्तान तुर्कीचा शस्त्र खरेदी करणारा सर्वात मोठा ग्राहक:
तुर्की शस्त्र निर्यातीमध्ये आघाडींच्या देशांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात तुर्की त्यांच्या संरक्षण निर्यातीला आणखी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यातच पाकिस्तान हा संरक्षण क्षेत्राच्या निर्मितीत खूप कमकुवत आहे. पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रे इतर देशांकडून आयात करावी लागतात. त्यातील अनेक संरक्षण शस्त्रे पाकिस्तान तु्र्कीकडून आयात करतो. पाकिस्तान आणि तुर्कीत झालेल्या संरक्षण करारानुसार तुर्की पाकिस्तानला युद्धनौका आणि विविध प्रकारच्या ड्रोनसोबतच इतर शस्त्रांचा पुरवठा करते. यातून तुर्कीला अब्जावधी डाॅलर्सचा फायदा मिळतो.
– तुर्कीचा संरक्षण क्षेत्रातील पाकिस्तान हा तिसऱ्या नंबरचा ग्राहक आहे.
– अर्थातच पाकिस्तानला समर्थन केल्याने तुर्कीच्या संरक्षण कंपन्याच्या एकाप्रकारे व्यापार वाढीची संधी मिळत असते.
तुर्कीला शस्त्र निर्यातीत मजबूत व्हायचे आहे:
-जगात संरक्षण निर्यातीत फ्रान्स, अमेरिका, रशिया, इटली, दक्षिण कोरिया, चीन, जर्मनी, स्पेन, इस्राएल आणि ब्रिटन हे देश आघाडीवर आहेत तर तुर्कीचा अकरावा क्रमांक लागतो.
– उपलब्ध माहितीनुसार 2014 ते 2018 या चार वर्षांच्या तुलनेत 2019 ते 2023 या वर्षांच्या दरम्यान तुर्कीची शस्त्रास्त्रांची निर्यात दुप्पट झाली आहे. म्हणजेच या चार वर्षांच्या काळात तुर्कीच्या डिफेन्स एक्सपोर्टमध्ये तब्बल 106 टक्के वाढ झाली आहे.
– गेल्या काही वर्षात असे जाणवत आहे की, तुर्की आपल्या डिफेन्स बाजाराचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.
– अर्थातच संरक्षण निर्यातीत आपली विस्तार कायम ठेवण्याच्या उद्देशाने तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला अशा चर्चा सुरू आहेत.
दरम्यान आता पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कित जेव्हा २०२३ मध्ये भूंकपामुळे हाहाकार माजला होता तेव्हा भारताने तुर्कीला मदत केली होती. भारताने तुर्कीला मदत करण्यासाठी एनडीआरएफचे शोध-बचाव पथक पाठवले होते. तसेच वैद्यकीय मदत पथके आणि इतर आवश्यक उपकरणे देखील पाठवली होती. तर पाकिस्तानने तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला होता. त्यावेळी भारतातले तुर्कस्तानचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारताचे आभार मानताना म्हटले होते की, “गरजेच्या वेळी मदतीला येईल तोच खरा मित्र.” मात्र याच तुर्कस्तानने भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानला शस्रे पुरवली. एवढेच नाहीतर पाकिस्तानला मदत करण्यासाठी तुर्कस्तानकडून तुर्की कार्यकर्त्यांचा पाकिस्तानला पुरवठा केल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे तुर्कस्तान आता विश्वास ठेवण्याच्या पात्र देश राहिला नाही असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता भारताने देखील तुर्कस्तानविरोधात स्पष्टपणे कणखर भूमिका घेण्यास सुरवात केल्याचे दिसते.