पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. याचे पुरावे भारतीय सैन्य दलांनी तर दिलेच, शिवाय सोशल मीडियावरही ‘ऑपरेशन सिंदूर’चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. असे असतानाही कांग्रेस नेते भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनवर शंका उपस्थित करणारी वक्तव्ये करत आहेत. सुरुवातीला काँग्रेसच्या अधिकृत स्तरावर, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईला पाठिंबा दिला आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकारसोबत असल्याचेही स्पष्ट केले. शिवाय त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले. मात्र असे असताना आता कांग्रेस नेते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत.
ऑपरेशन सिंदूरचे जागतिक कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदुरचे जगभरात कौतुक होतं आहे. ऑपरेशन सिंदूरमधून भारताची लष्करी ताकदच नाही तर शस्त्र सज्जता देखील दिसून आली. एवढेच नाही तर भारताच्या शस्त्रसज्जेची ताकद संपूर्ण जगापर्यंत पोहचली. भारताच्या या मोहिमेवर प्रभावित होऊन जगभरातून आता भारताकडे शस्त्रांची मागणी देखील वाढली आहे. त्याबरोबर भारत सरकारही या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि परदेशात मोहीम राबवत आहे.
भारताची बाजू चूक कशी?
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. तसेच त्याला खऱ्या राजनैतिक प्रयत्नांऐवजी तो लक्ष विचलित करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात की दहशतवाद, पाकिस्तान, चीन यावर केंद्र सरकार खरे काम करत नाही, आणि संसदेत चर्चा टाळली जाते. पण प्रश्न असा आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताची भूमिका नीट समजावून देणे हे काय चुकीचे आहे का? चीन आणि पाकिस्तानबाबत गंभीर चर्चा आवश्यक आहे हे निश्चित. पण जिथे सरकार त्या दिशेने धोरणात्मक निर्णय घेतंय, तिथे हातभार लावण्याऐवजी फक्त उणे-दुणे काढणे ही देशहिताची नाही, तर पक्षहिताची चिन्हे आहेत. खरतर ही टीका राजकीय अपरिपक्वतेचे निदर्शक वाटते. देशहितापेक्षा पक्षहितावर भर दिला की असेच होते.
"Another attempt to divert attention": Jairam Ramesh criticises Centre's global outreach on Op Sindoor
Read @ANI Story l https://t.co/ia3LooCOAm#JairamRamesh #Congress #OperationSindoor pic.twitter.com/uYfHAZraYo
— ANI Digital (@ani_digital) May 21, 2025
राहुल गांधीं पाकिस्तानची भाषा बोलतायत?
तर, कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सरकारकडे या कारवाईचा हिशेब मागण्यात व्यस्त आहेत. ते म्हणाले की, भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची माहिती आधीच दिली होती. त्यानंतर या संघर्षात भारताने किती विमाने गमावली, याचा आकडाही जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली होती शिवाय मी केलेल्या आरोपावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बाळगलेले मौन ही गंभीर बाब असल्याचेही ते म्हणाले. त्यावर भाजपने तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटले की, राहुल गांधी हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. काँग्रेस पक्ष खरेच देशाच्या बाजूने आहे का, असा सवालही भाजपने केला आहे.
अली खानचे समर्थन, कितपत योग्य?
दरम्यान, अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांची अटक आणि सशस्त्र दलांवरील टिप्पणीप्रकरणी भाजपची भूमिका धोकादायक असल्याचे सांगताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भाजपवर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले. कोणत्याही विरोधी मताला भाजप घाबरतो असे सांगून खर्गे म्हणाले की राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे, पण त्याचा अर्थ सरकारला प्रश्न विचारू नये असा होत नाही. जे लोक लोकशाहीचे संरक्षण करत आहेत, त्यांनाच राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. पण आता जे खर्गे अली खान महमूदाबाद यांचा हवाला देत आहे ते खर्गेंना अली खान यांनी सोशल मिडिया पोस्ट मध्ये ऑपरेशन सिंदूरला “डॉग व्हिसलिंग” असे म्हटले होते याचा विसर तर पडला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे
टीका आहे, पण उपाय नाहीत
कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी या कारवाईवरच शंका व्यक्त केली आहे. “हा फक्त कारवाईचे ढोंग होते त्यामुळे पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाला नाही. त्यांना जो दिलासा मिळायला हवा होता, तो मिळाला नाही”, असे म्हणत त्यांनी ऑपरेशनची किंमतच कमी करुन टाकली. मंजुनाथ म्हणाले “काहीही झाले नाही. फक्त दिखाव्यासाठी वरून तीन-चार विमाने पाठवून परत बोलावण्यात आली. याने पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26-28 लोकांना न्याय मिळेल का? अशा प्रकारे त्या महिलांचे दु:ख कमी होईल का? त्यांचा आदर करण्याचा हाच मार्ग आहे का?” मंजूनाथ यांना नेमके काय म्हणायचे आहे? पाकिस्तानने भारतीय नागरिकांवर हल्ला केला तर प्रतिकार न करता भारताने शांत रहावे हेच ते एकप्रकारे सुचवू पाहत आहेत. आता या कारवाईने लोकांना न्याय मिळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.पण मग काय करायला हवे हे देखील स्पष्ट करत नाहीत म्हणजे बोलण्यातही स्पष्टता आणि ठामपणा दिसून येत नाही.
विजय वडेट्टीवार यांचे वादग्रस्त विधान
विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये बोलताना ‘ऑपरेशन सिंदूर’वर सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. त्यांनी म्हटले की पाकिस्तानने १५,००० रुपयांचे ५,००० ड्रोन पाठवले, आणि त्यांना पाडण्यासाठी आपण १५ लाखांचं क्षेपणास्त्र वापरलं. हे चीनच्या रणनीतीचा भाग आहे. त्यांनी ३-४ राफेल जेट्स पाडल्याची चर्चा असल्याचेही नमूद केले. त्यामुळे ऑपरेशनमध्ये काय निर्णय घेण्यात आले, किती खर्च झाला आणि काय परिणाम झाला, हे सरकारने स्पष्ट करावे, असं ते म्हणाले. पूर्वीही त्यांनी दहशतवाद्यांकडून हल्ला करताना धर्म विचारुन हल्ला केला होता यावर “दहशतवाद्यांना धर्म नसतो,” असे वक्तव्य करुन त्यांनी वाद ओढवून घेतला होता.
मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रतिहल्ला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन शेंदूर संदर्भात शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा चांगल्याच खरपूस शब्द समाचार घेतला. प्रामुख्याने विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जसे मी आधीही सांगितले होते, मूर्खांना काय सांगायचे? काँग्रेसच्या नेत्यांना काहीच फरक कळत नाही, शेतकरी शेतात वापरतो त्या ड्रोनमध्ये आणि लढाऊ ड्रोनमध्ये काय फरक आहे, हेच त्यांना कळत नाही. मग अशा लोकांना काय उत्तर द्यायचे? काँग्रेसचे एकमेव काम म्हणजे भारतीय सैन्याचे मनोबल तोडणे.” असा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.
एकुणच काँग्रेसचा विरोध हा केवळ राजकीय हेतूने चाललेला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरं म्हणजे अशी अशी वक्तव्ये करुन देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या मनोबलावर पाणी फेरण्याचे काम काँग्रेसचे नेते करत आहेत. सरकारवर प्रश्न विचारणे योग्य आहे, पण ते प्रश्न राष्ट्रहिताच्या चौकटीत असायला हवेत. शंका निर्माण करणे, गोंधळ उडवणे हीच काँग्रेसची दिशा असेल, तर लोकांचा विश्वास मिळवणे अशक्य आहे.