नुकताच भारताने 2025 या वर्षात \$4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विशेष बाब म्हणजे जपानला मागे टाकून भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर हे यश म्हणजे आपल्या देशाच्या कठोर परिश्रम, धोरणात्मक निर्णय आणि अनेक क्षेत्रांतील एकत्रित प्रगतीचे प्रतीक आहे. भारताने गेल्या तीन दशकांत ज्या पद्धतीने आर्थिक, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगती केली, त्यामुळे तो आज जागतिक व्यासपीठावर एक मजबूत आणि विश्वासार्ह राष्ट्र म्हणून उदयास आला आहे.
भारताची अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांमध्ये कशी वाढली?
भारताच्या आर्थिक यशामागे विविध क्षेत्रांचे योगदान आहे. कृषी, उद्योग आणि सेवा हे तीनही प्रमुख क्षेत्र एकमेकांच्या समांतर वाढले. 2023-24 मध्ये कृषी क्षेत्राने 8.2% वाढ नोंदवली. ही वाढ ग्रामीण भारतात मागणी वाढवणारी ठरली. शेतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली आणि स्थानिक रोजगार निर्माण झाले. याचवेळी उद्योग क्षेत्रात 9.9% इतकी उल्लेखनीय वाढ झाली. विशेषतः बांधकाम आणि रिअल इस्टेटमध्ये सरकारी गुंतवणुकीमुळे मोठा विकास झाला. सेवा क्षेत्रानेही 8.2% वाढ दाखवली, ज्यामध्ये आयटी, आरोग्य, शिक्षण, वित्तीय सेवा आणि पर्यटन यांचा मोठा वाटा आहे.
डिजिटल क्षेत्राने सुद्धा भारताच्या वाढीला वेग दिला. 2014 मध्ये जी डिजिटल अर्थव्यवस्था 4.5% इतकी होती, ती आता 11% वर पोहोचली आहे आणि 2030 पर्यंत 20% होण्याचा अंदाज आहे. ई-गव्हर्नन्स, ई-कॉमर्स, डिजिटल हेल्थ, फायनान्स आणि मोबाईल आधारित सेवा यामुळे नवे उद्योग उभे राहत आहेत तसेच लाखो रोजगार देखील निर्माण होत आहेत.
सरकारच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला?
केन्द्रातील मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत जे धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला झाला. ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ या योजनांनी केवळ नावापुरत्या नव्हत्या, तर त्यांनी खरोखरच देशातील उद्योग आणि नवकल्पनांना चालना दिली. उत्पादन क्षेत्रात वाढ झाली, विदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढली, आणि स्थानिक आणि परकीय उद्योजकांना देखील नव्या संधी मिळाल्या. उदाहरणार्थ, Apple आणि Foxconn सारख्या कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भारताची उत्पादन क्षमता वाढली आणि निर्यातीतही वाढ झाली. अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारताची जीडीपी 2025 मध्ये 6.4% दराने वाढणार आहे. सरकारने पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली असून, त्यामुळे अनेक नवीन प्रकल्प सुरू झाले आहेत.
भारत जागतिक गुंतवणूकदारांना कसा आकर्षित करत आहे?
भारतात गुंतवणूक करणे आता सोपे आणि फायदेशीर झाले आहे. सरकारने परकीय गुंतवणुकीसाठी नियम सुलभ केले आहेत. भारताचा लोकसंख्यात्मक फायदा, वाढती खरेदी क्षमता, तंत्रज्ञानविषयक प्रगती आणि नियामक सुधारणा हे सर्व गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. भारत हा आता केवळ “उत्पादनाचे केंद्र” नाही तर “नवोन्मेषाचे केंद्र”देखील बनत आहे. स्टार्टअप्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे एवढेच नाही तर भारत युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे.
जागतिक स्तरावर भारताची भूमिका काय आहे?
भारताची वाढती आर्थिक ताकद ही केवळ देशांतर्गत विकासापुरती मर्यादित नाही, तर तिचा प्रभाव जागतिक स्तरावर जाणवत आहे. भारत आता G20, IMF, WTO सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताने G20 मध्ये अफ्रिकन युनियनला सदस्यत्व देण्यास मदत केली, ‘Global Biofuel Alliance’ आणि ‘Global Initiative on Digital Health’ सारखे महत्त्वाचे उपक्रम सुरू केले. तसेच, ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या भारताने जागतिक औषधपुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. जगातील 50% लसी भारतात तयार होतात, आणि अमेरिका वापरत असलेल्या 40% जनरिक औषधांचा पुरवठा भारतातून होतो. या प्रगतीमुळे भारताचे जागतिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्व वाढले आहे.
सामान्य माणसासाठी काय बदलले?
\$4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होतो आहे. रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, डिजिटल सेवा सहज उपलब्ध झाल्या आहेत, आणि महागाईचे प्रमाण काहीसे स्थिर राहिले आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वाढत असून शिक्षण आणि आरोग्यसेवांचा दर्जा सुधारतो आहे. मोबाईल इंटरनेट, UPI सारख्या डिजिटल पेमेंट प्रणाली, सरकारी योजनांची थेट खात्यावर जमा होणारी रक्कम हे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्याला अधिक सोयीस्कर आणि सशक्त बनवत आहेत. यामुळे सामाजिक समावेशही वाढतो आहे.
भारताच्या पुढील आर्थिक वाटचालीत अनेक संधी आहेत, पण काही आव्हानांचाही सामना करावा लागेल. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, पर्यावरणीय प्रश्न, आणि तांत्रिक कौशल्यांची कमतरता ही काही प्रमुख आव्हाने आहेत. मात्र भारताच्या युवा लोकसंख्येचा प्रभाव, धोरणात्मक नेतृत्व, आणि उद्योजकतेला चालना देणारी संस्कृती यामुळे भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, \$4 ट्रिलियन अर्थव्यवस्था ही भारताच्या आत्मविश्वासाची पावती आहे. आणि या वाटचालीत प्रत्येक भारतीयाचा वाटा आहे.
🚨India overtakes Japan to become world's 4th largest economy pic.twitter.com/MZAQISVlOX
— India & The World (@IndianInfoGuid) May 25, 2025