पारंपरिक भारतीय मिठाई हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण सध्या जयपूरच्या मिठाईच्या दुकानांमध्ये या गोडव्याला देशभक्तीची नवी चव मिळत असल्याचे दिसून येत आहे. कारण पारंपरिक मिठाईंच्या नावांतून ‘पाक’ हा शब्द काढून त्याऐवजी ‘श्री’ किंवा ‘भारत’ असे शब्द वापरण्याची एक अनोखी चळवळ सुरू झाली आहे. या नामांतराचा उद्देश केवळ ब्रँडिंग नाही, तर देशप्रेमाची जाणीव, लष्करातील जवानांप्रती आदर आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणे हा आहे. अशा छोट्या पण अर्थपूर्ण उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचताना दिसून येत आहे.
1.मिठाईतून एकतेचा गोड संदेश: म्हैसूर ‘पाक’ झाला म्हैसूर ‘श्री’
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले. त्यानंतर देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरलेले देखील पहायला मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर जयपूरमधील काही प्रसिद्ध मिठाई विक्रेत्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी एक अनोखी पद्धत निवडली. त्यांनी आपल्या मिठाईंची नावे बदलून त्याचे प्रतीकात्मक पुनर्ब्रँडिंग केले. ही अनोखी कृती केवळ निषेध नाही, तर राष्ट्रीय अभिमान आणि एकजुटीचे प्रतीक ठरली आहे. देशातील अनेक लोक या उपक्रमाचे कौतुक करत आहेत तर सोशल मीडियावरही या बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे.
ऑपरेशन सिंदूर के बाद मिठाइयों से हटाया गया ''पाक'' नाम, अब ''श्री'' नाम से होगी पहचान, मोतीपाक अब मोतीश्री और मैसूरपाक मैसूरश्री के नाम से मिलेगी#opreationsindoor #Sweet #Jaipur pic.twitter.com/5DHrTOlJw8
— Zee Business (@ZeeBusiness) May 22, 2025
‘तोहार स्वीट्स’चा पुढाकार
या गोड बदलाची सुरुवात जयपूरमधील ‘तोहार स्वीट्स’ या प्रसिद्ध दूकानाने केली आहे. दुकानाच्या मालकीण अंजली जैन यांनी म्हैसूर पाक, मोती पाक, आम पाक, गोंड पाक अशा पारंपरिक नावांमध्ये बदल करत त्या मिठाईंचे नाव ‘म्हैसूर श्री’, ‘मोती श्री’, ‘आम श्री’, ‘गोंड श्री’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला.”देशभक्तीची भावना केवळ सीमेवरच नाही तर प्रत्येक भारतीय घरात आणि हृदयात वास करायला हवी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नामांतरित केलेल्या मिठाईंची लिस्ट:
-म्हैसूर पाक- म्हैसूर श्री
-आम पाक- आम श्री
-गोंड पाक- गोंड श्री
-स्वर्ण भस्म पाक – स्वर्ण श्री
-चंडी भस्म पाक- चंडी श्री
-मोती पाक- मोती श्री
अशा तब्बल १२५ पेक्षा जास्त मिठाईंची नावे बदलण्यात आली आहेत.
इतर दुकानदारांचाही प्रतिसाद
केवळ ‘तोहार स्वीट्स’च नाही, तर शहरातील अनेक प्रतिष्ठित दुकानांनीही ही देशप्रेमाची भावना आपल्या ब्रँडिंगमध्ये उतरवली आहे. बॉम्बे मिष्टान भंडार आणि अग्रवाल केटरर्ससारख्या जुन्या आस्थापनांनीही मिठाईंच्या नावांतून ‘पाक’ शब्द वगळला आहे. बॉम्बे मिष्टान भंडारचे व्यवस्थापक विनीत त्रिखा म्हणतात, “ही एक गोड, प्रतीकात्मक सूडाची कृती आहे. आम्ही अशा देशांशी जोडलेली नावे ठेवू शकत नाही, जे आमच्या देशाविरुद्ध षडयंत्र रचतात.” तसेच शेवटी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला एक स्पष्ट संदेश द्यायचा होता की जे लोक भारताविरुद्ध डोळे उघडण्याचे धाडस करतील त्यांची नावे पुसून टाकली जातील आणि प्रत्येक भारतीय त्यांच्या पद्धतीने प्रतिसाद देईल.”
ग्राहकांकडून स्वागत
अनेक ग्राहकांना या बदलाचा अभिमान वाटतो. व्यापारी रमेश भाटिया म्हणाले की अशा कृती एकता दर्शवतात.“ही एक छोटी गोष्ट वाटू शकते, परंतु मिठाईची नावे बदलणे हा एक मजबूत सांस्कृतिक संदेश आहे. हे दर्शवते की आपण आपल्या सैनिकांसोबत आहोत.” निवृत्त शिक्षिका पुष्पा कौशिक पुढे म्हणाल्या, “जेव्हा मी ‘म्हैसूर श्री’ हे नाव ऐकले तेव्हा मला अभिमानाने हसायला आले. जयपूरमधील लहान मिठाईची दुकाने देखील या ट्रेंडचे अनुसरण करत आहेत. हे आपल्या शूर सैनिकांना गोड सलाम असल्यासारखे वाटते.”
पाक शब्दाचा अर्थ
जरी सध्याच्या भावनिक वातावरणात ‘पाक’ या शब्दावर टीका केली जात असली तरी, तज्ञ सांगतात की या शब्दाचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. ‘पाक’ हा शब्द प्राचीन संस्कृतमधील ‘पका’ किंवा ‘पक्व’ यावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे शिजवलेला किंवा गोड साखरेचा पाक. तर कन्नड भाषेत ‘पाक’ म्हणजे साखरेचे पाण्यात उकळून तयार केलेले गोड द्रव्य. शेफ रणवीर ब्रार सांगतात, की “पाक हा शब्द स्वयंपाकाशी निगडित आहे. त्याचा देशांशी संबंध लावणे चुकीचे आहे. पाकशास्त्र, पाकदर्पण यासारखी अनेक भारतीय ग्रंथसंपदा याच शब्दावर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
2.म्हैसूर पाकचा इतिहास
म्हैसूर पाक या प्रसिद्ध मिठाईची सुरुवात एकदम खास शाही स्वयंपाकघरात झाली होती. कर्नाटकातील वोडेयार राजवंशातील राजा कृष्ण राजा वोडियर चतुर्थ यांच्या काळात – म्हणजे १९०२ ते १९४० या काळात – हा गोड पदार्थ पहिल्यांदाच बनवण्यात आला होता. हा राजा केवळ दूरदर्शी नव्हता, तर तो खाण्याचा शौकीन सुद्धा होता. त्यावेळी त्यांच्या अंबा विलास राजवाड्यात एक मोठं आणि भव्य स्वयंपाकघर होतं. या स्वयंपाकघरात काम करणारे एक काकासुर मडप्पा नावाचे शाही शेफ होते . एकदा त्यांनी बेसन, तूप आणि साखर यांचा वापर करून एक नवीन गोड पदार्थ तयार केला. जेव्हा राजाने तो पदार्थ चाखला, तेव्हा तो खूप खुश झाला. पण राजाने जेंव्हा त्या पदार्थांचे नाव विचारले. तेंव्हा मडप्पा गप्प उभे राहिले, कारण त्यांनी तो गोड पदार्थ तयार करताना नावच ठेवले नव्हते. मग राजाने आपल्या शहराचे नाव वापरून या नव्या पदार्थाचे “म्हैसूर पाक” असे नामकरण केले.
त्यानंतर ही मिठाई घराघरात पोहोचली आणि विशेष प्रसंगी बनवली जाऊ लागली. दक्षिण भारतात आजही ती एक घरगुती मिष्टान्न म्हणून बनवली जाते. विशेष बाब म्हणजे मडप्पा यांचे कुटुंब आजही म्हैसूरमध्ये मिठाईचे दुकान चालवत आहेत. मिठाईच्या नावावरील वादाबद्दल बोलताना, मडप्पाचे पणतू नटराज यांनी माध्यमांना सांगितले की, “म्हैसूर पाक हे नाव बदलू नये. ही आमच्या वारशाची ओळख आहे.” ते म्हणाले की, “मिठाईचं नाव केवळ भाषिक किंवा राजकीय कारणांमुळे बदलणं योग्य नाही.” या गोड पदार्थामागे एक शाही इतिहास आहे, आणि तो आजही तितकाच खास आहे.
म्हैसूर पाकचे सांस्कृतिक महत्त्व
म्हैसूर पाक ही केवळ एक मिठाई नाही, तर ती दक्षिण भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सण, उत्सव, लग्न आणि इतर खास प्रसंगी ही मिठाई दिली जाते आणि अनेक घरांमध्ये ती खास आवडीने बनवली जाते. काही ठिकाणी तर मंदिरांमध्येही म्हैसूर पाक प्रसाद म्हणून देवाला अर्पण केला जातो.
म्हैसूर पाकचे वेगवेगळे प्रकार
आजच्या काळात म्हैसूर पाकची पारंपरिक रेसिपी अनेक नव्या स्वरूपात पाहायला मिळते. वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांनी त्यांच्या आवडीनुसार या गोडात थोडेसे बदल केले आहेत. काही प्रसिद्ध प्रकार असे:
1.चॉकलेट म्हैसूर पाक– खासकरून लहान मुलांसाठी लोकप्रिय.
2.ड्रायफ्रूट म्हैसूर पाक – बदाम, काजू, पिस्ते घालून अधिक पौष्टिक बनवला जातो.
3.मिल्क म्हैसूर पाक – दूध घालून बनवलेला हा म्हैसूर पाक अधिक मऊसर आणि गोड असतो.
4.क्रिस्पी म्हैसूर पाक – पारंपरिक म्हैसूर पाकपेक्षा थोडा कुरकुरीत, ज्यामुळे त्याचा पोत वेगळा वाटतो.
3.या आधी कोणकोणत्या पदार्थांची नावे बदलली आहेत
खरतर या चळवळीच्या आधीही काही परदेशी पदार्थांना भारतीय नावे देण्यात आली आहेत. अर्थात थेट त्यांची नावे बदलली नसली तरी ते पदार्थ भारतीय नावानेच ओळखले जातात.
‘बखलावा’चे देशी रूप म्हणजे ‘शहद पत्ता मिठाई’
बखलावा ही एक पारंपरिक मिठाई असून तिचे मूळ मध्यपूर्व आणि पर्शियन (आजचे इराण) प्रदेशात आहे. ती मुख्यतः तुर्की, ग्रीक आणि अरबी देशांमध्ये प्रसिद्ध आहे. तिच्यात पातळ पीठाचे थर असतात तसेच ती सुकामेवा आणि मधाचा वापर करुन बनवली जाते. म्हणून भारतात काही ठिकाणी तिला ‘शहद पत्ता मिठाई’ असं नाव दिले गेले आहे. ‘शहद’ म्हणजे मध आणि ‘पत्ता’ म्हणजे थर त्यामुळे हे नाव मिठाईच्या घटकांशी सुसंगत आहे. विदेशी वाटणाऱ्या ‘बखलावा’ या नावाऐवजी ‘शहद पत्ता’ हे नाव अधिक भारतीय वाटते आणि ग्राहकांनाही सहज समजते.
‘स्वीट कॉर्न नाही, मसाला भुट्टा
‘स्वीट कॉर्न’ हा मूळतः एक पाश्चात्य खाद्यपदार्थ असून भारतात त्याला देसी रूप दिले गेले आहे. त्यामुळे तो फक्त “कॉर्न विथ बटर” न राहता, “मक्का भुट्टा मसाला” किंवा फक्त मसाला भुट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. यामागे काही खास कारणे आहेत यातले पहिले कारण म्हणजे उकडलेल्या कॉर्नमध्ये लाल तिखट, मीठ, चाट मसाला, लिंबू, किंवा लोणचे मसाला घालून दिले जाते, ज्यामुळे त्याला भारतीय चव येते. दूसरे कारण म्हणजे ‘स्वीट कॉर्न’सारख्या इंग्रजी शब्दांऐवजी “मक्का भुट्टा” हे नाव ग्रामीण व स्थानिक ग्राहकांना अधिक समजते आणि आपले वाटते. थोडक्यात, ‘स्वीट कॉर्न’चे ‘मक्का भुट्टा मसाला’ हे नामांतर म्हणजे भारतीय चवीनुसार केलेले स्वादिष्ट ब्रँडिंग आहे.
जयपूरमधील ही नामांतराची मोहिम देशभक्तीचे गोड आणि प्रतीकात्मक रूप आहे. जरी भाषातज्ञ व पाककलेतील तज्ञ यावर वेगळे मत मांडत असले, तरी ग्राहकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. ‘म्हैसूर श्री’ सारख्या नावांमधून मिळणारा अभिमान, लष्करातील सैनिकांच्या साहसाला मिळणारी दाद, आणि गोड पदार्थांच्या नव्या ओळखीमधून उलगडणारी संस्कृती या सर्व गोष्टी आपल्या भारतीयतेच्या विविधरंगी पटावर एक अनोखा रंग भरत आहेत हे नक्की.