तिरुमला येथील पवित्र तिरुपती बालाजी मंदिरात २२ मे रोजी घडलेली एक घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या दिवशी एका मुस्लिम व्यक्तीने मंदिराच्या परिसरात नमाज अदा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र यामुळे मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
वास्तविक तिरुपती बालाजी मंदिर हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धेची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. विशेषतः मंदिरात बिगर-हिंदूंनी प्रवेश करण्यासाठी विशिष्ट घोषणापत्रावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. अशा पार्श्वभूमीवर एका इस्लामीक समर्थक व्यक्तीने मंदिर परिसरात नमाज अदा केल्याची घटना हिंदू समुदायाच्या भावनांना धक्का देणारी ठरली आहे.
ALERT: A man offered Namaz for more than 10 mins near the Tirumala Kalyana Mandapam wearing a Hazrat cap. Shocked by the provocation, especially in the backdrop of Pahalgam attack, TTD Vigilance is engaged in identifying the person who offered Namaz. Car number plate noted. pic.twitter.com/v9ZJafDDIT
— Rahul Shivshankar (@RShivshankar) May 22, 2025
१. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशी घटना घडू शकते, हेच मंदिर प्रशासनासाठी धक्कादायक ठरले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती कार (नोंदणी क्रमांक TN 83 T 6705) बाहेर नमाज अदा करताना स्पष्टपणे दिसत आहे. तपासात असेही समोर आले की तो व्यक्ती भाविकांच्या एका गटासोबत आलेला ड्रायव्हर होता. या दरम्यान काही उपस्थित भाविकांनी आक्षेप घेतला पण मंदिर प्रशासनापर्यंत ही बाब पोहचेपर्यंत ती व्यक्ती तिथून निघून गेली. खरं म्हणजे मंदिर परिसरात प्रवेश करताना सुरक्षेचे अनेक स्तर पार करावे लागतात, पण तरीही ही घटना का घडली? याच घटनेची चौकशी करण्यासाठी तेंव्हा तिरुपतीचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन राजू त्वरित घटनास्थळी पोहोचले होते.
२. TTD (तिरुमला तिरुपती देवस्थानम) ची भूमिका
टीटीडी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू केला आहे. मंदिराच्या आचारसंहितेचा आणि नियमांचा भंग झाल्याने, संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे टीटीडीने स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मंदिर परिसरात सर्व धर्मांचा आदर राखला जातो, मात्र या ठिकाणच्या परंपरांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही.” टीटीडीने यापूर्वी मंदिराच्या परंपरा अबाधित राखण्यासाठी विविध नियम लागू केले आहेत. मात्र आता या घटनेमुळे त्यांची अंमलबजावणी आणि पालन यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
३. गैर-हिंदूंच्या प्रवेशासाठी असलेले नियम
तिरुपती मंदिरात बिगर-हिंदू व्यक्तींनी दर्शन घेण्याआधी विशेष घोषणापत्र भरून भगवान वेंकटेश्वरावर श्रद्धा असल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ‘एपी महसूल समझोता-१’ अंतर्गत करण्यात येते. संबंधित घोषणापत्र वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्समधील १७ व्या खोलीत सादर करावी लागते. या नियमांचा उद्देश म्हणजे मंदिराच्या धार्मिक शुचिता आणि भाविकांच्या श्रद्धेचे रक्षण करणे आहे, मात्र, २०२० मध्ये वायव्ही सुब्बा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली या नियमात सवलत देण्यात आली होती, ज्यामुळे विरोध झाला. अखेर, लोकभावनांचा विचार करून नियम पुन्हा लागू करण्यात आला. पण आता तिरुमला मंदिरातील ही समोर आलेली घटना हिदूंच्या श्रद्धास्थानावर अशांती पेरुन देशात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा एक संघटीत प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अशा घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत.
४. याआधी अशा घटना कुठे घडल्या आहेत?
तिरुपतीसारख्या पवित्र स्थळी अशा घटना दुर्मिळ आहेत, पण काही मंदिरांमध्ये यापूर्वीही धार्मिक संकेतांचे उल्लंघन झाल्याचे प्रकार घडले आहेत. मागच्याच महिन्यात पिंपरी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा लगतच्या पार्किंगमध्ये काही इस्लाम समर्थक महिला नमाज अदा करतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता. याव्यतिरिक्त पुण्यातील सारस बागेत देखील असाच प्रकार घडला होता. तर काही वर्षांपूर्वी हरिद्वारमधील एका मंदिरात गैर-हिंदूंनी परवानगीशिवाय प्रवेश केला होता, ज्यावर स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये अमेठीतील गौरी गंज मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक इस्लाम समर्थक नमाज अदा करताना आढळून आला होता. जानेवारी २०२२ मध्ये देखील अलीगढच्या हिंदू मंदिरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यावर नमाज पठण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एवढेच नाही तर एप्रिल २०२३ रोजी भूतेश्वर महादेव मंदिर मथुरा येथे मंदिर संकुलात नमाज पठण करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची नोंद आहे.
वास्तविक भारतात सुमारे तीन ते चार लाख मशीदी, दर्गे आणि इतर इस्लामीक धार्मिक स्थळे आहेत. अगदी गावखेड्यात देखील एक दोन मशीदी सहज दिसून येतात. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, जेव्हा इस्लामिक प्रार्थनेसाठी स्वतंत्र स्थळे भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना काही व्यक्ती मंदिरांसारख्या हिंदू धार्मिक स्थळी नमाज अदा करण्याचा प्रयत्न का करतात? भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचा मूलभूत सिद्धांत स्वीकारते हे निर्विवाद सत्य आहे मात्र तिचा उद्देश सर्व धर्मांच्या श्रद्धा आणि धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हाच आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की मुस्लिम बहुल भागातून एखादी हिंदूंची मिरवणूक न्यायची म्हटली तर लवकर परवानगी मिळत नाही आणि जर मिळालीच तर त्या मिरवणुकीवर दगडफेक होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आले आहेत. जेंव्हा अशा घटना समोर येतात तेंव्हा धार्मिक सलोखा आणि सहिष्णुतेवरही परिणाम होतो.
५. गेल्या वर्षी लाडूंमध्ये चरबी असल्याचा आरोप
तिरुपती मंदिराशी संबंधित आणखी एक वाद १८ सप्टेंबर २०२४ रोजी घडला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला होता की, मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल मिसळले जात आहे. या आरोपामुळे मंदिर प्रशासनाला जबरदस्त टीका सहन करावी लागली होती. यामागे पुरवठादार कंपन्यांच्या निवडीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विशेषतः एआर डेअरी फूड्स या तामिळनाडूस्थित कंपनीवर संशय घेतला गेला. त्यावेळी टीटीडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींची ओळख पटवण्याचे आश्वासन दिले होते.
एकूणच तिरुपती मंदिरातील नमाज प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या कृतीपुरते मर्यादित नसून, यामधून मंदिराच्या व्यवस्थापनातल्या त्रुटी, आणि धार्मिक सहिष्णुतेचा सीमारेषा ठळकपणे समोर येतात. टीटीडी आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळांच्या पवित्रतेचा अपमान टाळण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर भविष्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यासाठी सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी सर्व धर्मीयांनी एकमेकांच्या श्रद्धांचा सन्मान राखणे अत्यंत आवश्यक आहे. तिरुपतीसारख्या जागतिक धार्मिक स्थळांवर अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मंदिर प्रशासन आणि सरकार दोघांनीही एकत्रितपणे ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.