आज, २८ मे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. देशभरात उत्साहात साजरा होणारा हा दिवस म्हणजे त्यांच्या अद्वितीय योगदानाची आठवण करून देणारा क्षण आहे. क्रांतीची धग, विचारांची धार आणि लेखणीची ताकद एकत्र असलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला केवळ बंदुकीने नव्हे, तर विचारांनीही उर्जा दिली. त्यांनी समुद्रात मारलेली उडी, हा केवळ एक प्रसंग नव्हता तर ती भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज जगभर पोहोचवणारी घटना होती. “लेखणी मोडा, बंदुका उचला!” असा त्यांचा मंत्र तरुणांच्या मनात आजही धगधगत असतो. त्यांच्या विचारांनी अनेकांना दिशा दिली. हिंदू संघटन, स्वाभिमान यांसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. तसेच राष्ट्रहितासाठी संसार, सुख, कुटुंब सर्व त्यागले. त्यांच्या या तेजस्वी कार्याचा सन्मान म्हणून २७ मे २०२५ रोजी त्यांच्या “अनादी मी… अनंत मी…” या गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार – 2025” देण्यात आला. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रेरणेचा एक नवा अध्याय लिहिला गेला. हे गीत म्हणजे सावरकरांच्या अमर विचारांचे जिवंत प्रतिबिंब आहे, ज्यातून पुढच्या पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची ऊर्जा मिळत राहील.
१. हा पुरस्कार प्रत्यक्षात काय आहे?
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार” चा उद्देश म्हणजे समाजमनाला स्फूर्ती देणाऱ्या आणि संघर्षाच्या काळात उभारी देणाऱ्या गीतांचा सन्मान करणे. या पुरस्काराला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे, जे स्वतः एक महान योद्धे, बुद्धिमान लेखक आणि कवी होते. या पुरस्काराचा उद्देश फक्त गीताच्या साहित्यिक सौंदर्याचा गौरव करणे नसून, त्या गीतातील प्रेरणादायी तत्त्वांचा समाजात प्रसार घडवणे हाही आहे. प्रत्येक वर्षी अशा एका प्रेरणादायी गीताची निवड करून त्यास हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
२. पुरस्काराची वैशिष्ट्ये आणि स्वरुप
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार खालील स्वरूपाचा आहे:
रक्कम: २ लाख रुपये रोख
स्मृतिचिन्ह: विशेष सन्मानचिन्ह
प्राप्तकर्ता: ज्या कवीचे गीत निवडले जाईल त्यांना. किंवा कवी हयात नसल्यास त्यांच्या कुटुंबीयांना अथवा त्यांचा वारसा जपणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया : सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया होते. या समितीत शासनाच्या विविध सांस्कृतिक विभागातील अधिकारी आणि तज्ज्ञ सदस्य असतात.
पुरस्काराच्या घोषणेसाठी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्यावरून अधिकृत माहिती दिली होती. याच ऐतिहासिक स्थळी सावरकरांनी ८ जुलै १९१० रोजी समुद्रात उडी घेऊन ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका केली होती.
३. या कवितेचा अर्थ काय आहे?
सावरकरांचे “अनादी मी… अनंत मी…” हे गीत म्हणजे एका अदम्य, अटळ, आणि अजेय आत्म्याची गर्जना आहे. या गीताच्या पहिल्या ओळी:
“अनादी मी अनंत मी अवध्य मी भला,
मारिल रिपु जगति असा कवण जन्माला?”
याचा साधा अर्थ असा आहे की “मला सुरुवात नाही तसाच अंतही नाही,मी म्हणजे एक विचार आहे. जो कालातीत आहे. तो विचार कधीही संपुष्टात येत नाही. असंख्य शत्रू निर्माण होतील, परंतु हा विचार समूळ नष्ट करणे कुणाला शक्य आहे? सावरकरांचा विचार नष्ट करणारा शत्रू अजूनही जन्माला आला नाही. या एका ओळीत केवढे सामर्थ्य, केवढा अर्थ भरलेला आहे याची प्रचिती येते. हे गीत आत्मबळ, राष्ट्रप्रेम, आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांचे प्रतीक आहे. सावरकरांनी हे गीत त्या प्रसंगी लिहिले होते जेव्हा ते ब्रिटिशांच्या तावडीतून पळून मार्सेलिसच्या समुद्रातून पोहत किनाऱ्यावर पोचले होते आणि पुन्हा पकडले गेले होते. तेव्हा, अपार मानसिक वेदना असूनही, त्यांनी स्वतःला प्रेरणा देण्यासाठी या ओळी लिहिल्या.
संपूर्ण कविता:
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला |
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||ध्रु||
अट्टहास करित जाई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी
अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळा रिपु तया स्वये
मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये ||१||
लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी
हटुनी भवति रचिल शीत सुप्रभावती
आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाहला त्रिनेत्र तो
मी तुम्हासी तैसाची गिळुनी जिरवितो ||२||
संपूर्ण कवितेचा अर्थ
मला सुरुवात नाही, अंत नाही. मला मारले जाऊ शकत नाही. मला मारणारा शत्रू अजून जन्माला आलेला नाही. मी हट्टाने युद्धक्षेत्रात प्रवेश करीन. मृत्यूशी लढण्यासाठी मी युद्धक्षेत्रात उतरेन. आग मला जाळू शकत नाही, तलवार मला कापू शकत नाही. भ्याड मृत्यू माझ्या नजरेपासून पळून जातो. आणि हा मूर्ख शत्रू मृत्यूच्या भीतीने मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे ! जर तू मला भयंकर सिंहाच्या पिंजऱ्यात ढकललेस तर तो गुलामासारखा माझा पराक्रम पाहील. जर तुम्ही मला अग्नीच्या ज्वाळांमध्ये फेकले तर त्या स्वतःहून दूर जातील आणि शीतल तेज मला घेरून राहील. तुझे तोफगोळे, तुझे भयंकर सैन्य, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान किंवा आग फेकणारी शस्त्रे घेऊन ये – जसे त्रिनेत्र म्हणजेच (भगवान शिवाने) प्राणघातक विष हलाहलाला गिळून टाकले, त्याचप्रमाणे मी तुला गिळून टाकीन आणि तुझा अहंकार चिरडून टाकीन.
४.स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून आजपर्यंत या गाण्याने लोकांना कसे प्रेरित केले आहे
“अनादी मी… अनंत मी…” हे गीत केवळ सावरकरांच्या आत्मबळाचे नाही, तर संपूर्ण भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रतीक आहे. हे गीत त्या काळात अनेक क्रांतिकाऱ्यांसाठी उर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत ठरले. यातील शब्द स्फोटक होते, ज्यांनी न थकता, न झुकता स्वातंत्र्याची मशाल पेटवत ठेवली. याचा उपयोग बंदीगृहात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आत्मबल वाढवण्यासाठी केला. ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीला तोंड देताना या गीतातील शब्द त्यांना खंबीर राहण्याची ताकद देत होते. स्वातंत्र्यानंतरही हे गीत राष्ट्रभक्ती, आत्मसन्मान आणि आत्मशक्तीचा प्रेरणास्रोत ठरले आहे. आजही अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये हे गीत विद्यार्थ्यांना आत्मबल व सकारात्मकता मिळावी यासाठी वाचले किंवा गायले जाते. बेरोजगारी, नैराश्य आणि मानसिक तणाव अशा समस्यांशी सामना करताना हे गीत “मी संपणार नाही, मी हरणार नाही” असा आत्मविश्वास देतं.
एकूणच “अनादी मी… अनंत मी…” हे गीत म्हणजे एका असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या असामान्य विचारांची अमर ध्वनी आहे. सावरकरांची लेखणी ही केवळ लेखन नव्हे, ती क्रांती होती. त्यांच्या गीताला राज्य शासनाने दिलेला हा सन्मान म्हणजे त्यांच्याशी जोडलेल्या विचारांना दिलेली मान्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव लाभलेला हा पुरस्कार केवळ साहित्याची नव्हे तर आत्मबळाची, राष्ट्रभक्तीची आणि प्रेरणादायी विचारांची प्रतिष्ठा आहे. हे गीत पुढील अनेक पिढ्यांना “मी हरू शकत नाही, कारण मी अनादी आहे… अनंत आहे…” हे शिकवत राहील.