Karani Mata Temple: भारत पाकिस्तानच्या सीमेवर म्हणजेच राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील ‘देशनोक’ गावात करणी माता देवीचे एक आगळे वेगळे मंदिर आहे. खरेतर हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध नाही तर त्याच्या अनोख्या परंपरेमुळे देशभर प्रसिद्ध आहे. कारण हे मंदिर २० हजारांहून अधिक उंदरांचे निवासस्थान आहे. त्यामुळे हे मंदिर ‘उंदरांचे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे.त्यातच २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी या मंदिराला भेट देते तेथे पूजा-अर्चना करत करणी मातेचे दर्शन घेतले. या निमित्ताने श्री करणी माता मंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अर्थातच मोदींनी भेट दिल्यानंतर देशभरात या अनोख्या मंदिराची चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे या मंदिराच्या अनोख्या परंपरेविषयी सविस्तर जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहे. याच पार्श्वभूमीवर आपण या मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
करणी मातेच्या जन्माविषयी:
धार्मिक मान्यतेनुसार, करणी मातेचा जन्म १३८७ मध्ये एका चरण कुटुंबात झाला होता. करणी मातेचे बालपणी ‘ रिघुबाई’ असे नाव ठेवण्यात आले होते. तिचे लग्न साठिका गावातील देपाजी चरण यांच्याशी झाले होते. परंतु त्या सांसारिक आयुष्य जगल्या नाहीत. रिघूबाई त्यावेळी चमत्कार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जात होत्या, म्हणून लोक त्यांना ‘करणी माता’ म्हणून संबोधू लागले होते, असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्षे तपश्चर्या आणि सेवाभावामध्ये व्यतीत केली. करणी माता १५१ वर्षे जगल्या असे देखील म्हटले जाते. करणी मातेच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांची मूर्ती स्थापित केली तेव्हापासून तिथे त्यांची पूजा होऊ लागली.
करणी माता मंदिराचा सांस्कृतिक वारसा:
करणी माता मंदिराची वास्तुकला राजस्थानी शैलीत बांधली गेली आहे. त्यामुळे मंदिरात सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते. मंदिराचे मुख्य दरवाजे चांदीचे बनलेले आहेत आणि त्यावर देवी, देवता आणि पौराणिक कथांचे सुंदर कोरीवकाम आहे. मंदिरासमोर एक सुंदर मरवरी दर्शनी भाग आहे. देवीची प्रतिमा आतील गर्भगृहात स्थापित आहे. त्यामुळे करणी माता मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे देखील प्रतीक मानले जाते.
करणी मातेचे मंदिर कसे बनले उंदरांचे मंदिर:
विकिपीडियावरील उपलब्ध माहितीनुसार, करणी माता सांसारिक जीवानापासून लांब राहिली. त्यामुळे करणी माताने तिच्या धाकट्या बहिणीचा विवाह तिचे पती देपाजीशी केला. जेणेकरून त्याचा वंश चालू राहील. करणी मातेच्या बहिणीला तिचा पती देपाजींपासून चार मुले झाली होती. त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाचे नाव लक्ष्मण होते. करणी मातेचा हा सावत्र मुलगा लक्ष्मण एकदा कोलायत येथील कपिल सरोवरात स्नान करत असताना पाण्यात बुडाला. तेव्हा करणी मातेच्या धाकट्या बहिणीने करणी मातेकडे लक्ष्मणाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली. त्यानंतर करणी मातेने मुलाचा मृतदेह आपल्या हातांनी उचलला आणि ती मृत्युदेवता यमराजाकडे गेली. यमराजाकडे करणी मातेने लक्ष्मणाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली. परंतु यमराज करणी मातेला म्हणाले की, जर असे केले तर पुनर्जन्माचे चक्र कसे चालू राहील? . त्यानंतर करणी मातेने घोषित केले यानंतर की, तिचे कुटुंब आता यमराजाकडे जाणार नाही. जेव्हा तिच्या कुटुंबातील लोक मरतील तेव्हा ते करणी माता जिथे आहे तिथेच राहतील. यासाठी तिने म्हटले की, जेव्हा तिच्या कुटुंबातील लोक मरण पावतील तेव्हा ते उंदिर म्हणून पुनर्जन्म घेतील आणि ते तिच्या जवळ राहतील आणि जेव्हा हे उंदीर मरतील तेव्हा मानवी चरण म्हणून पुनर्जन्म घेतील.
अशाप्रकारे सध्या करणी मातेच्या मंदिरात २० हजारहून अधिक उंदिरे आहेत. मंदिरातील उंदरांना ‘काबा’ असे देखील म्हटले जाते.
-मंदिरात भाविक करणी मातेला लाडू , काजू , नारळ आणि साखरेचे स्फटिक तसेच दूध , रोटी , धान्य , फळे , भाज्या प्रसाद म्हणून अर्पण करत असतात. देवीला अर्पण केलेला प्रसाद सर्वप्रथम उंदरांना खायला दिला जातो. त्यानंतर तोच प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. उंदरांचा उष्टा प्रसाद खायला मिळणे म्हणजे एकाप्रकारे करणी मातेचा आशिर्वाद मिळाला असे भाविक मानतात.
-आणखी एक विशेष बाब म्हणजे मंदिरातील हजारो उंदरांपैकी काही पांढरी उंदरे आहेत. ही पांढरी उंदरे म्हणजे स्वतः करणी माता आणि तिच्या चार मुलांचे प्रकटीकरण असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांचे दर्शन घेणे हा एक विशेष आशीर्वाद मानला जातो.
दरम्यान, या मंदिरात असलेल्या उंदरांच्या वासामुळे हे मंदिर एक अनोखे मंदिर ठरते. त्यामुळे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील पर्यटक या मंदिराला भेट देतात.