कलम ३७० (Article370) हे एक दशकानुदशके चाललेले वादग्रस्त प्रकरण होते. एकीकडे याच्या अस्तित्वामुळे जम्मू आणि काश्मीरला भारतात विशेष दर्जा मिळाला होता, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून याच कलमाच्या छायेखाली फुटीरतावाद, हिंसाचार आणि वेगळेपणाच्या भावना वाढीस लागल्या होत्या. पण अखेर ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कलम ३७० हटवले. मात्र त्यानंतर या निर्णयावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या. विशेषतः काँग्रेसने सुरुवातीपासूनच याला विरोध केला होता मात्र, आता सलमान खुर्शीद, शशी थरूर यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाचे समर्थन करत केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केल्याने पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला आहे. यावरुन काँग्रेसमध्ये एक नवा विचार उगम पावत आहे का? की ही नेत्यांची वैयक्तिक भूमिका आहे? चला सविस्तर जाणून घेऊयात.
१.सलमान खुर्शीद यांनी केले मोदी सरकाचे कौतुक
पाकिस्तानमधून निर्माण होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी अनेक देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळांमध्ये पाच काँग्रेस नेते शशी थरूर, आनंद शर्मा, मनीष तिवारी, अमर सिंग आणि सलमान खुर्शीद यांचा समावेश आहे.यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी नुकतेच इंडोनेशियात एका शिष्टमंडळाशी संवाद साधताना ३७० कलम हटवल्यासंदर्भात एक मोठे भाष्य केले आहे. एक मोठी समस्या संपली असे म्हणत त्यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे खुलेपणाने कौतुक केले आहे. “काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून एक मोठी समस्या होती. कलम ३७० मुळे असे वाटत होते की हा भाग देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे. पण कलम ३७० रद्द करण्यात आल्यामुळे ही एक मोठी समस्या संपली आहे. या निर्णयानंतर तेथे निवडणुका झाल्या आहेत, त्या निवडणुकीत ६५ टक्के लोकांनी सहभाग घेतला. आज काश्मीरमध्ये निवडून आलेले सरकार सत्तेत आहे त्यामुळे जे काही घडले आहे त्यामुळे लोक आनंदी आहेत असं खुर्शीद त्यांनी म्हटले आहे. खरतर काँग्रेसमधील दुसऱ्या एका ज्येष्ठ नेत्याने मोदी सरकारचे थेट कौतुक करणे ही अलिकडच्या काळात दुर्मिळ गोष्ट होती. मात्र आता यामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
MASSIVE RESET: Salman Khurshid: Art 370 gave outsiders the impression J&K was separate from India, but its abrogation, high voter turnout & elected govt prove it is integral to India."
WHAT CONG BRASS HASN'T SAID TILL NOW CONG MPs SAYING ALOUD.
Tharoor, Khurshid, who's next? pic.twitter.com/qDAHLvmJMo— Rahul Shivshankar (@RShivshankar) May 30, 2025
२.हे वैयक्तिक मत की काँग्रेसचा बदलेला सूर?
याच मुद्द्यावर सर्वाधिक गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला व अमित मालवीय यांनी काँग्रेसला सवाल केला “शशी थरूर यांना जसे काँग्रेसने शिक्षा दिली, तसेच सलमान खुर्शीद यांच्यावरही कारवाई होणार का?” पण काँग्रेसने यावर संयमित प्रतिक्रिया दिली. पवन खेरा यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत राजनैतिक संपर्काचा भाग म्हणून परदेशात पाठवलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधील काँग्रेसचे सदस्य हे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांपेक्षा भारताची भूमिका चांगल्या प्रकारे मांडत आहेत. तर भाजपकडून ट्रोलिंग व दूषित राजकारण केले जात आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.पण काही का असेना, या पार्श्वभूमीवर खुर्शीद यांचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसमधील वैचारिक फाटाफूट उघड करणारा एक भाग असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. काही नेते भाजपच्या निर्णयाचे कौतुक करत असताना, दुसऱ्या बाजूला अनेक जुने नेते जसे की चिदंबरम, गुलाम नबी आझाद, जयराम रमेश अजूनही कलम ३७० ला विरोध करताना दिसून येत आहेत.
३.कलम ३७० हटवल्यानंतर प्रत्यक्षात काय बदल झालेत?
१. निवडणुकीतील सहभाग:
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक निवडणुका पार पडल्या, ज्या ६५% मतदानासह शांततेत पार पडल्या. हे फुटीरतावादी मानसिकतेला दिलेले एक प्रकारचे उत्तर मानले जात आहे.
२. पर्यटन वाढ:
आतापर्यंत सुमारे 1.5 कोटी पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली, ज्यात २५,००० विदेशी पर्यटक होते. ही आकडेवारी काश्मीरमध्ये स्थिरतेचा संकेत मानली जाते.
३. सरकारी नोकर्या व प्रकल्प:
29,813 स्थानिक तरुणांना सरकारी नोकर्या मिळाल्या, 92,560 प्रकल्प पूर्ण झाले (२०१८ मध्ये केवळ ९२२९), आणि ५० हून अधिक नवीन महाविद्यालये सुरू झाली.
४. गुंतवणूक संधी
जवळपास २६,६५० कोटींच्या प्रस्तावांवर काम सुरू आहे. मात्र अनेक भागात अद्याप मूलभूत सुविधा – रस्ते, वीज, पाणी नसल्याने गुंतवणूक अद्याप अपेक्षेपेक्षा संथ आहे. एमार कंपनीसारखे प्रकल्प घोषणांवर थांबले आहेत. पण त्यावरही लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंतिम मुदत २०२६ असून या यातून १३,५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
५. उद्योजकता व उत्पादन:
इथे स्टील, हॉस्पिटल, आयटी पार्कसारख्या प्रकल्पांची गती संथ असली तरी काही उद्योगांनी काम सुरु केले आहे. याशिवाय शीतगृह क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.
४.कलम ३७० वर काँग्रेसच्या नेत्यांचे विचार
गुलाम नबी आझाद: “५ ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील काळा दिवस” असे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते.
पी. चिदंबरम: “भारतीय संविधानाच्या इतिहासातला सर्वांत वाईट दिवस” आहे असे म्हटले होते.
जयराम रमेश: ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका करत इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचे म्हटले.
जनार्दन द्विवेदी: “स्वातंत्र्याच्या वेळी एक चूक झाली होती, ती आता सुधारली गेली.”
भुवनेश्वर कलिता: काँग्रेसच्या भूमिकेवर नाराज होत राज्यसभेतील व्हिप पदाचा राजीनामा दिला.
हे दाखवते की काँग्रेसमध्ये काश्मीर व कलम ३७०वर एकसंध मत नाही. पक्षात विचारधारेचा संघर्ष अजूनही पाहायला मिळत आहे.
५.शशी थरूर, ऑपरेशन सिंदूर आणि काँग्रेसचा ‘नवा चेहरा’?
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी थरूर हे चर्चेत आहेत. खरं म्हणजे शशी थरूर यांना ऑपरेशन सिंदूरच्या आंतरराष्ट्रीय प्रचारासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. ते देखील अलीकडे मोदी सरकारबद्दल सकारात्मक बोलताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या वक्तव्यांनी काँग्रेसचे पक्ष नेतृत्व मात्र प्रभावित झाले नाही.उलट ते थरुर यांच्यापासून काहीसे दूरच राहिले इतके की काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश म्हणाले की, “जेव्हा थरूर साहेब बोलतात तेव्हा ते पक्षाचे मत नसते.” पण शशी थरूर यांची बदलती भुमिका हा काँग्रेससाठी नवा विचारसरणीचा आरंभ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकुणच कलम ३७० वर काँग्रेसचे मतभेद काही लपून राहिलेले नाहीत. सलमान खुर्शीद व शशी थरूर यांच्यासारखे नेते भाजप सरकारच्या धोरणांना समर्थन देत आहेत, तर काही नेते अजूनही विरोध करत आहेत. भाजपकडून हे एकप्रकारे काँग्रेसचा आत्मसमर्पण समजले जात आहे, पण वास्तविकता अधिक गुंतागुंतीची आहे. काँग्रेसमध्ये एक नवा विचार तयार होत आहे का? की काही नेते फक्त वैयक्तिक अनुभव व जागतिक व्यासपीठावर भारताची बाजू समर्थपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत? या सर्व घडामोडी देशासाठी सकारात्मक संकेत असतील, तर काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे.