2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (simhastha kumbh mela) पार्श्वभूमीवर रविवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. देशातील सर्वांत मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक असलेल्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सुरक्षित व सोयीचे होण्यासाठी प्रशासनाने विस्तृत पातळीवर तयारी सुरू केली आहे.
1.मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्णय आणि धोरणात्मक दृष्टीकोन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जलसंपदा, नगर विकास, पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्य निर्णयांमध्ये गोदावरी नदीची स्वच्छता, नदीत मिसळणारे नाले बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, मलनिस्सारण प्रकल्प उभारणे, आणि साधुग्रामसाठी जागेचे अधिग्रहण यांचा समावेश आहे. “गोदावरी निर्मळ आणि वाहती ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. या योजनेस जलसंपदा विभागाने मंजुरी दिली असून, लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल,” असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय नियोजनात सुसूत्रता आणण्यासाठी सिंहस्थ प्राधिकरणाच्या स्थापनेलाही मंजुरी देण्यात आली आहे,
2.कसे असेल सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन?
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकूण 6000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी 4000 कोटींच्या निविदा आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित 2000 कोटींच्या कामांवर लवकरच निविदा (Tender) काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या नियोजनात पुढील घटकांचा समावेश असणार आहे.
1.संपूर्ण साधुग्रामासाठी आरक्षित जागा अधिग्रहित केली जाणार आहे.
2.कुशावर्त तीर्थस्थानाला पर्यायी व्यवस्था उभारण्यात येईल.
3.गोदावरी नदीत पाणीप्रवाह कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
4.भाविकांसाठी वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारली जाणार आहे.
5.13 आखाड्यांच्या महंतांशी समन्वय साधून अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. बहुतांश निर्णयांवर एकमत झाले असून, धार्मिक श्रद्धांचा मान राखून नियोजन करण्यात येत आहे.
3.सिंहस्थ कुंभमेळ्याचा गौरवशाली इतिहास
सिंहस्थ कुंभमेळ्याचा इतिहास फार जुना असून त्याची मुळे पौराणिक कथांमध्ये दडलेली आहेत. पौराणिक कथेनूसार समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दैत्य यांच्यात अमृत कलश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झाला. या संघर्षात अमृताचे काही थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे नाशिक. याच गोष्टीचे स्मरण म्हणून या ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो. नाशिकमध्ये कुंभमेळा मुख्यतः दोन पवित्र ठिकाणी होतो.त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड. या काळात शाही स्नान हा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. शाही स्नानाच्या दिवशी देशभरातून लाखो साधू-संत, महंत आणि कोट्यवधी भाविक गोदावरीच्या तीरावर एकत्र येतात. या धार्मिक परंपरेचा उल्लेख मत्स्य पुराण, स्कंद पुराण आणि महाभारत यांसारख्या पुराणग्रंथांमध्येही आढळतो. इतकंच नाही तर मुघलकालात, म्हणजेच १५ सप्टेंबर 1622 रोजी, नाशिकच्या कुंभमेळ्याचा उल्लेख करणारे ऐतिहासिक दस्तऐवजही सापडले आहेत. त्यामध्ये “सिंहस्थ पटी” आणि “सिंहस्थी माफ” अशा शब्दांचा उल्लेख आहे, ज्यावरून या कुंभमेळ्याची परंपरा त्या काळातही अस्तित्वात होती, हे स्पष्ट होते. या सर्व माहितीवरून असे दिसून येते की सिंहस्थ कुंभमेळा हा हजारो वर्षांपासून सुरू आहे.
4.सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी
ज्योतिषशास्त्रीय महत्त्व:
सिंहस्थ कुंभमेळा त्या वेळी आयोजित केला जातो जेव्हा गुरु (बृहस्पती) ग्रह सिंह राशीत (Leo) आणि सूर्य मेष राशीत (Aries) प्रवेश करतो. या ज्योतिषीय संयोगामुळे या मेळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते.
पवित्र शाही स्नान:
मेळ्याच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे पवित्र नद्यांमध्ये स्नान. उज्जैन, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंड आणि कुशवर्त येथे लाखो भाविक स्नान करण्यासाठी एकत्र येतात. शाही स्नानांच्या दिवशी साधू-संत आणि अखाड्यांचे सदस्य विशेष पद्धतीने स्नान करतात, ज्यामुळे त्या दिवशीचे धार्मिक महत्त्व वाढते.
अखाड्यांची उपस्थिती आणि नागा साधूंचे स्नान:
सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध अखाड्यांचे साधू-संत सहभागी होतात. नागा साधू, जे शंकर संप्रदायाचे सदस्य आहेत, त्यांचे शाही स्नान विशेष आकर्षण असते. ते नग्न अवस्थेत आणि शस्त्रांसह स्नान करतात, ज्यामुळे या मेळ्याला एक अद्वितीय धार्मिक आणि सांस्कृतिक रंग प्राप्त होतो.
सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता:
सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा संगम असतो. उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिर, सिद्धवट, राम मंदिर घाट, आणि पिर मच्छिंद्रनाथ यांसारख्या धार्मिक स्थळांचे महत्त्व आहे. याशिवाय नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आणि रामकुंड यांसारख्या स्थळांनाही धार्मिक महत्त्व आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो भारतीय संस्कृती, परंपरा, आणि एकात्मतेचा प्रतीक आहे. या मेळ्यात सहभागी होणे म्हणजे एक अद्वितीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव घेणे आहे.
5.कुंभमेळ्याला सुरुवात कधी होणार आहे?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 रोजी रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळ्याने औपचारिक सुरुवात होईल. त्यानंतर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाड्यांचे ध्वजारोहण होईल. कुंभमेळा तब्बल 24 जुलै 2028 पर्यंत म्हणजे 21 महिने चालणार आहे. हा कालखंड आधीच्या सिंहस्थ कुंभांपेक्षा मोठा आहे, ज्यामुळे प्रशासनाला योग्य व्यवस्थापनासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
शाही स्नानाच्या अधिकृत तारखा जाहीर
नाशिक:
ध्वजारोहण: 31 ऑक्टोबर 2026
पहिलं अमृतस्नान: 2 ऑगस्ट 2027 (सोमवार)
दुसरं अमृतस्नान: 31 ऑगस्ट 2027
तिसरं अमृतस्नान: 11 सप्टेंबर 2027
त्र्यंबकेश्वर:
ध्वजारोहण: 24 जुलै 2027
पहिलं अमृतस्नान: 2 ऑगस्ट 2027
दुसरं अमृतस्नान: 31 ऑगस्ट 2027
तिसरं अमृतस्नान: 12 सप्टेंबर 2027
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2026-28 या कालखंडात केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव न राहता, एक सांगोपांग व्यवस्थापनाचा आणि पर्यावरण साक्षरतेचा आदर्श ठरेल. गोदावरीच्या स्वच्छतेपासून ते साधुग्रामच्या नियोजनापर्यंत सर्व स्तरांवर प्रशासनाने दृढ पावले उचलली आहेत. हे नियोजन भाविकांमध्ये सुरक्षिततेचा, श्रद्धेचा आणि सरकारच्या कार्यक्षमतेचा विश्वास निर्माण करणारे ठरेल. असे बोलले जात आहे.
#WATCH | Maharashtra CM Devendra Fadnavis holds a meeting with the chiefs of various akhadas to discuss preparation ahead of the upcoming Simhastha Kumbh Mela 2027 in Nashik.
(Source: District Information Office, Nashik) pic.twitter.com/loMlVAZV11
— ANI (@ANI) June 1, 2025