सणांचे स्वरूप ही समाजाची संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतिक असते. मात्र जेव्हा एखादा सण प्राण्यांच्या सामूहिक कत्तलीशी जोडला जातो, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की,हा खरंच सण आहे की क्रौर्य? अनेक महत्वाच्या सणांपैकी एक असलेला बकरी ईद (Eid al-Adha) हा सण इस्लाम धर्मातील एक पवित्र सण आहे. ही परंपरा हजरत इब्राहिम यांनी अल्लाची आज्ञा मानून आपल्या मुलाला बळी देण्यासाठी तयार राहिल्याच्या श्रद्धेवर आधारित, जी गेल्या अनेक शतकांपासून चालू आहे. परंतु आजच्या काळात, लाखो प्राण्यांची एकाच दिवशी कत्तल केली जाते. असे असताना त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक, पर्यावरणीय आणि कायदेशीर प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खरंच “ईद” म्हणजे आनंदाचा दिवस आहे की अत्याचाराचा? असा सवाल अनेकदा उपस्थित केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गोवा प्रांतातील विश्व हिंदू परिषदेचे मंत्री गोविंद शेंडे (govind shende) यांनी नुकतेच मध्यप्रदेशातील उंटाच्या कत्तलीचे उदाहरण देत म्हटले की ही बकरी ईद आहे की उंट ईद? खरं म्हणजे या गोष्टींमुळे बकरी ईदच्या मूळ धार्मिक तत्त्वाशी अनेक वेळा विसंगती जाणवते.
१. बकरी ईदला बकरी कापण्याची प्रथा कोणी आणि का सुरु केली?
बकरी ईद, ज्याला ‘ईद-उल-अधा’ किंवा बलिदानाचा सण म्हणतात, या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातो हे आपल्याला ठाऊक आहे, मात्र असे असले तरीसुद्धा मुळात हा त्यागाचा सण आहे तसेच हा सण हजरत इब्राहिम यांच्या जीवनातील एका पवित्र घटनेवर आधारित आहे. कुराणानुसार, इब्राहिम यांनी अल्लाच्या आज्ञेनुसार आपला मुलगा इस्माईल याचा बळी देण्यासाठी तयारी दर्शवली. परंतु शेवटी अल्लाने त्यांच्या समर्पणाची परीक्षा पूर्ण झाल्याचे मानून एका प्राण्याच्या बळीची व्यवस्था केली.
या घटनेच्या स्मरणार्थ, मुस्लिम समाजात बकरी, मेंढी, बैल, उंट आदी प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली. ही कुर्बानी श्रद्धेचे समर्पणाचे आणि त्यागाचे प्रतिक समजली जाते. मात्र, ही कुर्बानी “शुद्ध” हेतूने आणि इस्लामिक कायद्यानुसार व्हावी, असे कुराणात नमूद आहे. आजही बकरी ईद दरम्यान, जगभरातील मुस्लिम समुदाय बकरी किंवा इतर प्राण्यांची कुर्बानी देतात आणि त्यांचे मांस तीन भागांमध्ये वाटतात एक कुटुंबासाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी. वास्तविक हा सण सामाजिक समरसतेचा संदेश देतो.
पण कुर्बानीचा उद्देश केवळ प्रथा पाळणे नाही, तर त्याग, समर्पण आणि समाजातील गरजू लोकांसाठी मदत करण्याचा आहे. या सणाबाबत इस्लामचे अभ्यासक माजिद पारेख म्हणतात की,आजकाल ही केवळ प्रथा म्हणून पाळली जाते. समाजाच्या भल्यासाठी त्याग करणे हा यामागील आध्यात्मिक संदेश आहे. या सणामागील हा संदेश समजून घ्यावा, असे आवाहनही पारेख यांनी केले आहे.
२.बकरी ईदच्या नावाखाली गायींचीही कत्तल
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशसारख्या अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या (गाय, वासरू, बैल) पूर्णतः बंद आहे. तरीही काही ठिकाणी गुप्तपणे गायींची कत्तल केल्याच्या तक्रारी सातत्याने येतात. विश्व हिंदू परिषद, अनेक हिंदू संघटना आणि भाजपा नेते याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. गोविंद शेंडे म्हणाले की, बकरी ईदच्या निमित्ताने गायी, बैलही कापले जातात. सरकारने हे सगळं थांबवावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले आहे की, यंदा अमरावतीत गाईची कत्तल होणार नाही. प्रशासन, पोलीस यंत्रणा सजग राहतील आणि गोवंश हत्या बंदी कायद्याचे काटेकोर पालन केले जाईल. परंतु हे आश्वासन पुरेसे आहे का? धार्मिक उत्सवाच्या आड काही घटक कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. यासंदर्भात मुस्लीम धर्मगुरूंनीही गोवंश हत्या टाळण्याचे आवाहन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
३. प्राण्यांच्या कत्तलीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो आहे
प्राण्यांच्या कत्तलीचा फक्त धार्मिक दृष्टिकोनातून विचार न करता पर्यावरणीय परिणामांचाही अभ्यास होणे आवश्यक आहे. बकरी ईदच्या दिवशी लाखो बकरे, मेंढ्या, उंट कापले जातात. ही प्रक्रिया योग्य व्यवस्थापनाशिवाय झाली, तर अनेक पर्यावरणीय समस्या उद्भवतात:
रक्ताचे सांडपाणी
कत्तलीनंतर मोठ्या प्रमाणात रक्त सांडले जाते. अनेक ठिकाणी ते वाहून जाऊन नाल्यांमधून नदी-नाल्यांमध्ये मिसळते. हे सांडपाणी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते, जे जलजीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.
जैविक कचरा आणि मृदा प्रदूषण
कत्तलीनंतर उरलेले शरीराचे भाग, हाडे, कातडे आणि इतर अवशेष योग्य पद्धतीने निपटले जात नाहीत. यामुळे वास, रोगांचा प्रसार आणि मृदेवरील जैविक प्रदूषण वाढते. IntechOpen च्या अभ्यासानुसार, स्लॉटरहाऊस वेस्टवॉटरमुळे मृदावरील नायट्रेट आणि फॉस्फेटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मृदावरील जैवविविधता आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो.
प्रदूषण आणि अस्वच्छता
कत्तलीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक, गंध, आवाज आणि कत्तलीचा प्रकार यामुळे शहरी भागात अस्वच्छता आणि प्रदूषण वाढते. SafeEnvironment च्या अहवालानुसार, स्लॉटरहाऊस वेस्टवॉटरमुळे पाणी, हवा आणि मृदावरील प्रदूषण वाढते, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो.
पाण्याची नासाडी
प्रत्येक कत्तलीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. PETA India च्या अहवालानुसार, १ किलो गोमांस उत्पादनासाठी सुमारे १५,४१५ लिटर पाणी लागते, तर १ किलो गहू उत्पादनासाठी फक्त १,०२० लिटर पाणी लागते. भारतासारख्या पाण्याच्या संकटग्रस्त देशात याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे.
४.पर्यावरणपूरक उत्सव आणि धार्मिक समर्पण
सण साजरे करताना आपण फक्त श्रद्धेचा नव्हे तर निसर्गाचा, कायद्याचा आणि इतर धर्मीयांच्या भावना यांचाही आदर केला पाहिजे. हिंदू सणांवर अनेकदा पर्यावरणाच्या नावाने टीका केली जाते. फटाक्यांवर बंदी, रंगांच्या वापरावर सल्ले, यामध्ये अनेक सजगता असते. भाजपा मंत्री नितेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नाचा सूरही हाच होता ते म्हणाले बकरी ईद व्हर्चुअली साजरी करा, असा कोणी सल्ला का देत नाही?
मोरोक्को या इस्लामिक देशाने यावर्षी ईद-उल-अजहानिमित्त बकऱ्यांची कत्तल टाळण्याचे आवाहन केले. कारण देशात ३८% प्राण्यांची संख्या घटली आहे, तसेच ५३% कमी पाऊस, चाऱ्याची टंचाई आणि मांसाचे दर गगनाला भिडलेले आहेत. राजा मोहम्मद सहावा यांनी जनतेला सांगितले की धार्मिक समर्पण महत्त्वाचं आहे, पण कठीण काळात समजूतदारी दाखवणे अधिक आवश्यक आहे. १९६६ मध्ये जेव्हा मोरोक्कोमध्ये दीर्घकाळ दुष्काळ पडला होता. तेव्हा राजा मोहम्मद सहावा यांचे वडील हसन द्वितीय यांनीही अशीच विनंती केली होती. सध्या मोरोक्कोमध्ये मांसाचे भाव गगनाला भिडत असताना देशांतर्गत बाजारपेठेत मांसाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी मोरोक्कन सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात गुरेढोरे, शेळ्या-मेंढ्या, उंट आणि लाल मांसावरील आयात शुल्क आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द केला आहे.
शेवटी बकरी ईद म्हणजे केवळ प्राण्यांचा बळी नाही. त्याग, समर्पण, समाजसेवा आणि समतेचा संदेश हा या सणाचा खरा आत्मा आहे. हजरत इब्राहिम यांनी दिलेला खरा संदेश होता स्वतःचे सुख, अभिमान, हक्क सोडून मानवतेसाठी काहीतरी देणे. त्यामुळे आजच्या युगात, हे बलिदान फक्त प्राण्यांपुरते मर्यादित राहू नये. ते सामाजिक समजूतदारपणा, पर्यावरणपूरकता आणि कायद्याच्या पालनाच्या रूपातही असावे. सण हे विभाजनाचे माध्यम नसून, समर्पणाचे आणि सहअस्तित्वाचे प्रतीक असावे.
अफ्रीकी देश मोरक्को ने 'ईद अल अजहा' पर बकरीद पर कुर्बानी पर लगाई रोक
◆ भयंकर सूखे के चलते देश में कम हुई पशुओं की संख्या को देखते हुए सरकार ने लिया फ़ैसला
◆ मोरक्को में 99 फीसदी आबादी इस्लाम को मानने वाली है#EidAlAdha | Eid al-Adha | Bakrid pic.twitter.com/YZP8Qtu1Ur
— News24 (@news24tvchannel) June 2, 2025