Maharashtra Temple Development plan:मे महिन्यात महाराष्ट्राच्या महायुती सरकारची आहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक(Important cabinet meeting) पार पडली होती. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि या बैठकीत खेड्यापाड्यांच्या विकासावर भर देण्यात आला होता. तसेच या मंत्रीमंडळ बैठकीत सरकारने राज्यातील स्मारके आणि मंदिरांच्या विकासाबाबतही मोठी घोषणा केली आहे. सरकारने या बैठकीत मंदिरांच्या संवर्धन आणि नूतनीकरणासाठी ४८२० कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण राज्यात कोणकोणत्या मंदिराचे काम केले जाणार आहे, कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. याची सविस्तर माहिती घेऊयात.
महालक्ष्मी मंदीर कोल्हापूर: Mahalaxmi Temple Kolhapur
महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील महालक्ष्मी मंदीर एक मोठे शक्तीपीठ आहे. केवळ महाराष्ट्रातील नाहीतर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी महालक्ष्मी मंदिर एक असून हे मंदिर ‘अंबाबाई मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
-महालक्ष्मी मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडपंथी शैलीतील आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात बांधले गेले आहे. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत. मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीव काम आणि देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचा मुख्य कळस ६० फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे. मंदिराच्या चारही बाजूंना चार प्रवेशद्वारे आहेत म्हणून या देवस्थानाला ‘चतुर्मुखी’असेही म्हणतात.
-आता महाराष्ट्र सरकारकडून कोल्हापूर मंदिरांच्या संवर्धनासाठी १४४५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी आता मंदिराचा विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्यात मंदिराची दुरूस्ती व संवर्धन, दर्शनासाठी अच्छादित मंडप, लाॅकर्स शू स्टॅड,किरणोत्सव मार्गातील अडथळे, अतिक्रमांचे निर्मूलन, मंदिर परिसरातील दुकानांचा विकास अशा गोष्टींचा समावेश आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या विकास आराखड्यासाठी मंदिर परिसरातील साडेचार एकर जमीनीचे संपादन केले जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध आहे.
ज्योतिबा मंदिर: Jyotiba Temple
ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही ओळखले जाते. श्री ज्योतिबा हा देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जाते. असे मानले जाते की, विष्णू, ब्रह्मा आणि शिव यांनी एकत्र येऊन ज्योतिबाचा अवतार घेतला आणि दुष्ट रत्नासुराचा नाश केला. ज्योतिबाने अंबाबाईला राक्षसांशी लढण्यास मदत केली असेही म्हटले जाते. हे मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मंदिरावर मराठा वास्तुशैलीचा प्रभाव दिसून येतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता मंदिराच्या आसापासच्या डोंगरात सापडणाऱ्या काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.
-सरकारने ज्योतिबा मंदिराच्या संवर्धनासाठी २६० कोटी रूपयांच्या विकास आराखड्याला मंजूरी दिली आहे. या विकास आराखड्यामध्ये मंदिराचे संवर्धन, पायवाटांचे जतन, भाविकांसाठी विविध सुविधा, वाहनतळ, अपारंपारिक उर्जस्त्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती, घनकचरा व सांडपाणी प्रकल्प यांचा समावेश आहे.
-तूळजाभवानी मंदिर: Tuljabhavani Temple Tuljapur
-श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तसेच तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत असे इतिहासकार सांगतात. तुळजाभवानी मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी मंदिरा संदर्भात संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात आढळतो.
-तुळजाभवानीच्या दर्शनासीठ दरवर्षी लाखो भाविक तुळजापूरला येतात. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने तुळजापूर मंदिरांच्या विकासासाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. तुळजापूर मंदिरासाठी १८६५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखडा तेथील स्थानिक लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे आता. आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी, नवरात्र उत्सव या दृष्टिकोणातून तुळजापूर मंदिराचा विकास आराखडा महत्वाचा मानला जात आहे.
विशेष म्हणजे विकास आराखड्यातील कामे करताना मंदिराच्या मूळ शैलीला जपण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाची मदत घेतली जाणार आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग: Trimbakeshwar Jyotirling Temple
-नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील एक ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. तसेच गोदावरी नदीचा उगमही येथेच झाला आहे. यामुळे हे ठिकाण धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे मानले आहे.
-आता या तीर्थस्थानासाठी सरकारने २७५ कोटींची विकास आराखड्याला मंजूरी दिली आहे.
-विकास आराखड्यानुसार, दर्शनपथांचे सुशोभीकरण, स्वच्छतागृहांची वाढ, नूतनीकरण, पुरतान मंदिर व कुंडांची देखभाल दुरूस्ती, वाहनतळांची उभारणी, अतिक्रमि दुकानदारांचे पुनर्वसन, शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे.
तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकूण 6000 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी 4000 कोटींच्या निविदा आधीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित 2000 कोटींच्या कामांवर लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. या निधीतून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पूर्ण साधुग्रामासाठी आरक्षित जागा ठेवल्या जाणार आहेत, कुशावर्त तीर्थस्थानाला पर्यायी व्यवस्था उभारण्यात येणार आहे, गोदावरी नदीत पाणीप्रवाह कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे भाविकांसाठी वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे धार्मिक श्रद्धांचा मान राखून पूर्ण नियोजन करण्यात येणार आहे.
अष्टविनायक मंदिर: Ashtavinayak Temples
अष्टविनायक हा शब्द महाराष्ट्रातील आठ खास गणेश मंदिरांच्या तीर्थ क्षेत्रासाठी एकत्रित वापरला जातो हे आपण जाणतोच. आठ मंदिरांपैकी प्रत्येक मंदिराची खास कथा आणि इतिहास आहे. अष्टविनयाकांपैकी श्री मयुरेश्वर मंदिर मोरागावमध्ये, सिद्धिविनायक मंदिर हे अहमदनहर जिल्ह्यातील सिद्धटेक, रायगड जिल्ह्यातील बल्लाळेश्वर पाली मंदिर, रायगड जिल्ह्यातील महाड येथे वरदविनायक गणपती, थेऊर येथे चिंतामणी, लेण्याद्री येथे गिरिजात्मक मंदिर, विघ्नेश्वर मंदिर ओझर येथे आहे तर रांजन गाव येथे महागणपती आहे. या अष्टविनायकावर लोकांची विशेष श्रद्धा आहे. त्यामुळे या अष्टविनायकाच्या स्थळांना भाविक मोठ्या संख्येने भेट देतात.
-याच पार्श्वभूमीवर लेण्याद्री येथील तीर्थक्षेत्र वगळता इतर सात ठिकाणांच्या विकास आराखड्यासाठी सरकारने १४७ कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. यापैकी, पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख, श्रीचिंतामणी मंदिरासाठी 7 कोटी 21 लाख, श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख रुपये, श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख, श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख रुपये, श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
-अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच मंदिर परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, सरकारने धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना देऊन सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा आणि भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या विकास आराखड्यामुळे आता तीर्थक्षेत्रांच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. एकाप्रकारे सरकारने धर्म आणि विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पर्यटनाच्य विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्यातून फडणवीस सरकारची (Devendra Fadnvis) धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासाद्वारे राज्याच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येत आहे.