नागपूर, ५ जून – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील द्वितीय ‘कार्यकर्ता विकास वर्गाचा’ समारोप सोहळा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देशभरातून आलेल्या ८४० स्वयंसेवकांच्या समारोपानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि आत्मविकास या मूल्यांचा भक्कम संदेश दिला.
२५ दिवसांचा अनुशासित अभ्यासक्रम:
१२ मेपासून सुरु झालेला हा कार्यकर्ता विकास वर्ग तब्बल २५ दिवस चालला. देशाच्या विविध राज्यांतून आलेले, विशेषतः ४० वर्षांखालील स्वयंसेवक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. यामध्ये जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागातून आलेल्या स्वयंसेवकांचाही समावेश होता, हे विशेष उल्लेखनीय. आधीच जिल्हा आणि प्रांतस्तरीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास करून त्यांना पुढील कामासाठी तयार करणे, हा या विकास वर्गाचा उद्देश होता.
स्मरण आणि सादरीकरणाने सुरुवात:
समारोप सोहळ्याची सुरुवात संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर (गुरूजी) यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर स्वयंसेवकांनी सरसंघचालक आणि प्रमुख पाहुण्यांसमोर शिस्तबद्धपणे शारीरिक दंडप्रयोग, घोषवादन, योगासने आणि सामूहिक गायन सादर केले. भारतीय परंपरेला अनुसरून परदेशी वाद्यांना भारतीय नावे देऊन त्यांचं घोषवादन सादर करण्यात आले.
संघाची व्यापकता आणि मूल्यप्रधान कार्य:
समारोप कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकतेचे आणि सामाजिक सजगतेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपली खरी ताकद समाजात आहे. शासनं बदलत राहतात पण देशाची खरी उभारणी समाज करत असतो.” यादरम्यान पहलगाम हल्ल्यावरही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. भारतीय लष्कराची विरता आणि चमक ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमातून उठून दिसली. असे ते म्हणाले. युद्धाचे प्रकार बदलले आहेत, शत्रू आता समोरासमोर लढत नाहीत, तर दहशतवाद्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे आपल्याशी लढत आहे. त्यामुळे समाजालाही अधिक सजग, संघटित आणि आत्मनिर्भर व्हावे लागेल. सत्य आणि अहिंसा यांचा आपण स्वीकार करतो, पण त्याचवेळी दुष्ट शक्तींशी सामना करण्यासाठी सज्जं राहावे लागेल.
अरविंद नेताम यांचे स्पष्ट आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे मुद्दे:
माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांनी आपल्या भाषणात अनेक ज्वलंत सामाजिक मुद्द्यांना हात घातला. बस्तरमधील नक्षलवाद, आदिवासींच्या समस्या, धर्मांतर, औद्योगीकरणामुळे होणारे विस्थापन या सर्व बाबी त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. तसेच संघाच्या कार्याचे कौतुक देखील केले. नेताम यावेळी म्हणाले, की देशाची सेवा, एकता अखंडता आणि सामाजित समरसतेचे ज्या स्तरावरचे कार्य संघाने केले, ते इतर कुठलीही संघटना नाही करू शकली. धर्मांतरणावर बोलताना ते म्हणाले की “धर्मांतर हा विषय कोणत्याही सरकारने गांभीर्याने घेतलेला नाही. फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले, पण ठोस उपाय झाले नाहीत. मात्र मला वाटते संघ यामध्ये समाजाचा विश्वास मिळवून प्रभावी भूमिका बजावू शकतो.” धर्मांतरणाच्या विरोधात कठोर कायदा व्हायला हवा. समाजाला विश्वासात घेऊन हा कायदा बनवावा अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
धर्मकोड या विषयाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की जनजातींमध्ये धर्मकोडची चर्चा सध्या सुरु आहे. देशात जनजाती समाजाची ओळख हळूहळू संपत चालली आहे, परंतु येणाऱ्या पिढीला या समाजाबाबत माहिती व्हावी यासाठी धर्मकोड स्वरूपात माहिती उपलब्ध असली तर अधिक उपयुक्त ठरेल. राष्ट्रस्तरावर आणि विशेषतः छत्तीसगडच्या दृष्टीने याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त त्यांनी आदिवासी समाजातील एकतेच्या अभावाची खंतही व्यक्त केली. छत्तीसगडसारख्या राज्यांतील जमिनी, जंगल, आणि पाण्याच्या मालकी हक्कांवर बोलताना ते म्हणाले की, “औद्योगीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांची जमिनींशी नाळ तुटते, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. हे अधिग्रहण न होता लीजवर द्यावे आणि कालांतराने ती जमीन त्यांना परत मिळावी.
संघ आणि आदिवासी समाज यामधील नाते:
कार्यक्रमाच्या शेवटी सरसंघचालक भागवत यांनी आदिवासी समाजाविषयी आपली भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, आदिवासी समाज हा भारताच्या मुख्य प्रवाहाचाच भाग आहे. त्यांचे निसर्गाशी असलेले नाते, झाडांना व देवतांना वंदन करणे ही भारतीय परंपरेची मूळ ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत सांगितले की, धर्मांतर हा एक प्रकारचा मानसिक आणि सामाजिक हिंसाचार आहे. ‘कन्व्हर्जन इज व्हायलन्स’ असे ते ठामपणे म्हणाले.
राष्ट्र आणि समाज या दोघांची समांतर वाटचाल:
मोहनजी भागवत यांनी भाषणात एक महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला की समाजाची सजगता आणि आत्मभान हेच देशाच्या टिकावाचे मुख्य आधार आहेत. ते म्हणाले, “आपण एक आहोत हे विसरून गेलोय, हा भ्रम इंग्रजांकडून तयार केला गेला होता. पण आता समाजाला सजग राहावे लागेल एक व्हावे लागेल.पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय समाज विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या समस्याही निरनिराळ्या आहेत. कधी एकाची समस्या दुसऱ्याला समजून येत नाही. अशाने समाजात निश्चितच असंतोष निर्माण होतो. मात्र देशहितापूढे काही नाही. समाजातील दोन वर्गात लढाई न होता आपापसांत सद्भावना असायला हवी. भडकाऊ भाषण करणाऱ्यांना कोणी भूलू नये. एकमेकांसोबत सद्भावना, सदाचार, सद्विचार, सहयोग करण्याची आवश्यकता आहे. कारण आपली मुळे एकतेत आहेत, विविधतेत नव्हे. आपली मुल्यव्यवस्था एक आहे. याच एकतेचे भान साऱ्या विश्वाला द्यायचे आहे. त्यांनी चर्चिलचे उदाहरण देत सांगितले की, दुसऱ्या महायुद्धात विजय मिळाल्यावरही चर्चिलने सगळे श्रेय समाजाला दिले. यातून समाजाचे महत्त्व अधोरेखित होते.
भावनिक उद्गार आणि समाजाविषयीची आस्था:
कार्यक्रमाच्या शेवटी सरसंघचालकांनी उपस्थित स्वयंसेवकांना उद्देशून सांगितले की, “संघ कोणत्याही विशिष्ट गटासाठी नसून, तो सर्वसमाजाचा आहे. आदिवासी समाज, वंचित घटक, सर्वसामान्य नागरिक जो कोणी देशासाठी काही करू इच्छितो त्याच्या पाठीशी संघ उभा आहे.” त्यांनी हेही अधोरेखित केले की, जर समाज आपले नशीब सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, तर यश निश्चित आहे. त्यासाठी संघ सर्वांना आपली साथ देईल.
एकुणच ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ हा सामाजिक जागृती, राष्ट्रीय अस्मिता, आणि वैचारिक बांधिलकी यांचे एक जिवंत उदाहरण ठरला. सरसंघचालक मोहन भागवत आणि अरविंद नेताम यांच्या भाषणांनी संघाच्या कार्याची व्यापकता, सामाजिक जबाबदारी, आणि राष्ट्रीय सुरक्षेविषयी असलेल्या दृष्टिकोनाचं ठळकपणे चित्र उभे केले. या वर्गातून बाहेर पडणारे स्वयंसेवक केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही तयार झाले आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी. राष्ट्रभक्तीच्या आधारावर उभा असलेला आणि सामाजिक समरसतेचा ध्यास घेणारा हा कार्यक्रम निश्चितच नव्या भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मजबूत पाऊल ठरेल.
नागपुर में “कार्यकर्ता विकास वर्ग – द्वितीय” का समापन समारोह। मंच पर उपस्थित पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी व मुख्य अतिथि श्री अरविंद नेताम।
840 शिक्षार्थी, 118 शिक्षक, व 43 प्रांत प्रमुखों व अन्य कार्यकर्ताओं सहित कुल 1,093 स्वयंसेवकों ने इस वर्ग में सहभागिता की।… pic.twitter.com/ijcrbm6ZF7
— Friends of RSS (@friendsofrss) June 5, 2025