Nagpur Varg Mohan Bhagvat Speech: नागपूर येथील संघ मुख्यालयात स्वयंसेवकांसाठी १२ मे रोजी सुरू झालेले २५ दिवसांचे ‘प्रशिक्षण शिबिर’ 5 जून रोजी संपले. यानिमित्ताने नागपूर येथील संघ मुख्यालयात काल ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोप(Vikas Varg Nagpur) कार्यक्रम’ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम(Arvind Netam) उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत(Mohan Bhagwat) उपस्थित होते. या समारोपाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी धर्मांतर आणि विशेष करून सामाजिक एकतेच्या मुद्याकडे लक्ष वेधले. याच पार्श्वभूमीवर आपण आजच्या लेखात आपण मोहन भागवत यांच्या भाषणातील सामाजिक एकतेच्या मुद्द्याची सविस्तर माहिती घेऊयात.
मोहन भागवत यांचे विकास वर्ग समारोप कार्यक्रमातील ‘सामाजिक एकते’ विषयीचे भाष्य:
-मोहन भागवत समारोपाच्या भाषणात एकते विषयी बोलताना म्हणाले की, समाजात मतमतांतर निर्माण होऊ द्यायचे नाहीत. कारण समाजात काही लोक भांडण लावणारे, तर काही लोकांना भडकवणारे आहेत.
-देशात वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या पूजा पद्धतीच्या लोकांमध्ये आपापसात सहयोग करण्याची गरज आहे आणि या ऐक्यामध्येच आपले हित आहे.
सर्वांना आपापले वैविध्य प्रिय आहे. परंतु आपली विविधता म्हणजेच आपली भाषा, आपली पूजा पद्धती कायम ठेवत आपले ऐक्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण एकच आहोत, आपले पूर्वज एक आहेत. परंतु इंग्रजानी आपल्यात भ्रम निर्माण केले आहे. ऐक्याच्या आधारावर विकासाचे मार्ग निर्माण करणे आवश्यक आहे.
– विकास आणि पर्यावरण यांच्यात अंतर्विरोध का? दोन्ही एकासोबत चालू शकत नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
– देशहितापुढे काही नाही. समाजातील दोन वर्गात लढाई न होता आपापसांत सद्भावना असायला हवी. भडकाऊ भाषण करणाऱ्यांना कोणीही बळी पडू नये. एकमेकांसोबत सद्भावना, सदाचार, सद्विचार, सहयोग करण्याची आवश्यकता आहे. कारण आपली मुळे एकतेत आहेत, विविधतेत नव्हे. आपली मुल्यव्यवस्था एक आहे. याच एकतेचे भान साऱ्या विश्वाला देणे गरजेचे आहे.
-अर्थातच मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातील सामाजिक एकतेच्या मुद्द्यातून एक महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला तो म्हणजे, ‘समाजाची सजगता’ आणि ‘आत्मभान’ हेच देशाच्या स्थिरतेचे मुख्य आधार आहेत.
खरेतर सरसंघचालक हे नेहमीच समाजिक एकतेवरती भाष्य करत आले आहेत. आपण त्यांच्या यापूर्वीच्या भाषणातील सामाजिक एकतेविषयीच्या विचारांचा आढावा घेऊयात.
हिंदू समाजाला जातीभेद संपवण्याचे आवाहन :
एप्रिल २०२५ मध्ये, मोहन भागवत पाच दिवसांच्या अलिगड दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी तेथील विविध शाखांमधील स्वयंसेवकांना संबोधित केले होते. यावेळीही त्यांनी सामाजिक एकतेच्या गरजेवर भर दिल्याचे दिसून आले. यावेळी ‘एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी’ या धोरणाचा अवलंब करून सर्व वर्गांमध्ये सुसंवाद आणि समानता आणण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अर्थातच त्यांनी हिंदू समाजाला जातीभेद संपवण्याचे आवाहन केले होते.
-पुढे ते असेही म्हणाले होते की, आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे, जो केवळ सक्षमच नाही तर सर्व वर्गांना सोबत घेऊन जाईल.
-आपले सण हे केवळ उत्सव नाहीत तर ते सामाजिक एकतेचे प्रसंग देखील आहेत. तसेच त्यांनी सर्व वर्गातील लोकांना एकत्र येऊन सण साजरे करण्याचे आवाहनही यावेळी केले होते.
एकमेकांशी सतत संवाद साधून सद्भावनेने राहण्याचे आवाहन:
-५ ऑक्टोबर २०२४ रोजी, सरसंघचालक मोहन भागवत हे राजस्थानमधील बारन येथे गेले होते त्यावेळी त्यांनी हिंदू समाजाला एकतेचा संदेश दिला होता. यावेळी ते म्हणाले होते की, हिंदू समाजाला भाषा, जात आणि प्रांतावर आधारित मतभेद आणि वाद दूर करून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एकत्र यावे लागेल. समाज असा असावा की, ज्यामध्ये एकता, सद्भावना आणि बंधनाची भावना असेल.”
-पुढे ते असेही म्हणाले होते की, “भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. आपण प्राचीन काळापासून येथे राहत आहोत. हिंदू हे नाव नंतर जरी आले असले तरी येथे राहणाऱ्या भारतातील सर्व पंथांसाठी ‘हिंदू’ हा शब्द वापरला जात असे. हिंदू सर्वांना आपले मानतात आणि सर्वांना स्वीकारतात. यावेळी हिंदू समाजाची भूमिका मांडताना ते म्हणाले की, हिंदू समाज म्हणतो की आम्ही आमच्या जागी योग्य आहोत आणि तुम्हीही तुमच्या जागी योग्य आहात,म्हणूनच एकमेकांशी सतत संवाद साधून सद्भावनेने राहणे गरजेचे आहे.
समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक:
ऑक्टोबर २०२२ मध्ये, संघाच्या विजायादशमी सोहळ्यात बोलतानाही मोहन भागवत म्हणाले होते की, “बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की, समाजात सामाजिक समता असली पाहिजे आणि विषमता गेली पाहिजे. खरेतर विषमता ही आपल्या मनात असते. ती विषमता मनातून गेली पाहिजे. समाजातले आपले सगळेच मित्र असले पाहिजेत. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाला काम करावे लागेल. तेव्हाच आपली सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल.”
सामाजिक सदभाव गरजेचा:
डिसेंबर २०१५ मध्ये, संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूर नागरिक सहकारी बँकेने व्याख्यान समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘सामाजिक सद्भावना’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी मोहन भागवत आपल्या भाषणात बोलताना म्हटले होते की, “देशाच्या विकासासाठी सामाजिक एकता आवश्यक आहे. समाजात एकतेची पूर्वअट ‘सामाजिक समता’ आहे. जेव्हा समाजात समानता येईल तेव्हा सामाजिक एकता आपोआप येईल आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
-पुढे ते असेही म्हणाले होते की, आपल्या देशातील सर्व विविधतेमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली जातिव्यवस्था आहे. जातिवादामुळे सामाजिक समस्या उद्भवतात आणि या समस्या असमानतेला जन्म देतात आणि यातून संघर्ष निर्माण होतो. म्हणून समाजातून जातिवाद दूर करावा लागेल. विशेष म्हणजे या सगळ्यावरती उपाय हा ‘सामाजिक सद्भाव’ आहे असे देखील त्यांनी सांगितले होते.
मोहन भागवतांच्या ‘यशस्वी भारत’ या पुस्तकातही सामजिक एकतेवर भर:
डाॅ. मोहन भागवत यांचे ‘यशस्वी भारत’ हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी समृद्ध आणि सुसंवादी भारतासाठी त्यांच्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली आहे. या पुस्तकातही मोहन भागवत यांनी सामाजिक एकता, सांस्कृतिक जतन, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा यासह राष्ट्र उभारणीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. अर्थातच या पुस्तकातही त्यांनी एकतेच्या संकल्पनेला महत्त्व दिले आहे.भारतीयांनी एकत्र येऊन एक मजबूत राष्ट्र निर्माण केला पाहीजे, अशी शिकवण या पुस्तकात आहे.
दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत हे अलीकडील व मागील काही भाषणांमधून सतत सामाजिक एकतेचा स्पष्ट आणि सातत्यपूर्ण संदेश देत आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सगळ्यात त्यांनी धर्मांतर, जातीभेद, भाषिक-प्रांतीय मतभेद, आणि सामाजिक विषमता यासारख्या विभाजनात्मक मुद्द्यांवर भाष्य करत, भारतीय समाजाला ऐक्य, सहिष्णुता, संवाद आणि सद्भावनेच्या आधारे एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, आपली ओळख विविधतेमध्ये नसून एकतेमध्ये आहे आणि हीच एकता भारताच्या विकासाचा मुख्य आधार आहे. सामाजिक समता, आत्मभान आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन हे यशस्वी भारतासाठी आवश्यक मूल्य असल्याचे त्यांनी वारंवार अधोरेखित केल्याचे दिसून येते.