नागपूर मध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग – द्वितीयच्या समारोप समारंभात एका प्रेरणादायी भाषणात, संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दुसऱ्या महायुद्धातील एक शक्तिशाली ऐतिहासिक प्रसंग सांगितला आणि एका भक्कम राष्ट्राच्या उभारणीत समाजाची ताकद अधोरेखित केली. त्यांचे शब्द हे केवळ भूतकाळातील घटनांचे प्रतिबिंब नव्हते तर सर्व भारतीयांना प्रतिकूल परिस्थितीत एकता, देशभक्ती आणि सामूहिक भावनेची शक्ती ओळखून एकत्र येण्यासाठीचे ते आवाहन होते.
काय होती ती चर्चिल यांची गोष्ट जी राष्ट्रीय इच्छाशक्तीची शिकवण ठरली
दुसऱ्या महायुद्धाच्या सर्वात काळ्या समजल्या जाणाऱ्या काळात, ब्रिटनवर हिटलरच्या सैन्याने जोरदार हल्ला केला होता. ज्या दरम्यान लंडनवर महिनाभर सतत बॉम्बहल्ला करण्यात येत होता. यामध्ये ब्रिटीश सैन्य जवळपास उद्ध्वस्त झाले होते, सैन्य थकले होते, हवाई दलाने मान टाकली होती. तर नौदलाची शक्ती जवळपास संपल्यात जमा होती. आपल्या धाडसी व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यावरही आत्मसमर्पण करण्याचा दबाव होता. त्यांच्या स्वतःच्या मंत्रिमंडळातील सदस्य त्यांना संपूर्ण विनाशाच्या भीतीने समोर आलेल्या करारावर वाटाघाटी करण्यास सांगत होते.
या संकटाच्या क्षणी, चर्चिल यांनी इंग्लंडच्या राजाशी संवाद साधला आणि सांगितले की ते स्वतः वैयक्तिकरित्या शरणागती पत्करू इच्छित नाहीत मात्र त्यांचे मंत्रिमंडळ त्यांना हार मानण्यास सुचवत आहे. त्यानंतर राजाने त्यांना एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारला: “तुमचे मंत्रिमंडळ कोणी निवडले?” त्यावर चर्चिल यांनी उत्तर दिले, “जनतेने निवडले.” या उत्तराने पुढचे चित्र पालटले.
जनतेचे मन जाणून घेण्यासाठी चर्चिल इंग्लंडमधील भुयारी मार्गावर फिरले.जिथे ते सामान्य ब्रिटिश नागरिकांना भेटले. हे पुरुष आणि महिला कोणी प्रशिक्षित सैनिक नव्हते. एवढेच नव्हे तर राष्ट्राची लष्करी रणनीती किंवा युद्धाच्या तांत्रिक बाबीही त्यांना माहित नव्हत्या. मात्र त्यांच्याकडे एक गोष्ट होती जी सर्वात महत्वाची होती ती म्हणजे देशभक्ती, आपल्या देशाबद्दल पराकोटीचे प्रेम.
त्यांनी चर्चिल यांना अढळ दृढनिश्चयाने सांगितले की ,”आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही. आपण लढू, रस्त्यावर उतरून लढू.गरज पडल्यास स्वयंपाकघरातील भांड्यांसहही आम्ही लढू.”जर आपल्याला आज असे लढावे लागले तर काय होईल? याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती पण त्यांचे धोरण धाडसी होते आणि इच्छाशक्ती प्रबळ होती. या क्षणाने हे दाखवून दिले की राष्ट्राच्या ताकदीचा खरा स्रोत त्याचे लोक आहेत. चर्चिल संसदेत पुन्हा एकदा नव्या धाडसाने परतले आणि त्यांनी ब्रिटनला उभे राहण्याची प्रेरणा देणारे त्यांचे प्रसिद्ध भाषण दिले:ज्याचा एका वाक्यात सारांश असा होता की,
“आपण हवेत लढू, गरज पडली तर समुद्रावर लढू, जमिनीवर लढू… पण कधीही हार मानणार नाही.”
डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात या गोष्टीचा शेवट एका प्रभावी चिंतनाने केला: ते पुढे म्हणाले की, या युद्धानंतर चर्चिल यांना Lion of England अर्थात “इंग्लंडचा सिंह” म्हणून सन्मानित करण्यात आले. मात्र चर्चिल यांनी ही पदवी नाकारली आणि स्पष्टीकरण देत म्हंटले की, “मी सिंह नाही. खरे सिंह इंग्लंडचे सामान्य लोक आहेत. मी फक्त त्यांच्या वतीने गर्जना केली.”
ही कथा सांगून सरसंघचालकांनी राष्ट्राचे भवितव्य घडवण्यात सामान्य नागरिकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी हे भाषण ऐकणाऱ्यांना आठवण करून दिली की नेते जनतेकडून त्यांची शक्ती प्राप्त करतात.आणि जेव्हा समाज धैर्याने भरलेला असतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही.
डॉ. भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे चर्चिलची कहाणी आधुनिक भारतासाठी एक महत्वाचा संदेश देते. ब्रिटनने ज्याप्रमाणे कठीण काळाचा सामना केला त्याचप्रमाणे भारतालाही सध्या दहशतवाद, बाहेरचे शत्रू आणि अंतर्गत फूट यांच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु या सर्व परिस्थितीत, भारतीय समाजाची ताकद ही अंतिम संरक्षण आहे.
आज जनता संरक्षणासाठी सरकार आणि सैन्याकडे आशेने पाहते पण त्याच काळात सरसंघचालकांचे शब्द आपल्याला आठवण करून देतात की खरी राष्ट्रीय सुरक्षा जनजागृती आणि सामूहिक इच्छाशक्तीतून येते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक आधुनिक मुद्दा मांडला आहे.
सरसंघचालकांनी चर्चिलच्या युद्धकाळातील नेतृत्वाचे पुनरुच्चार करताना देशभक्तीचे, जनतेच्या शक्तीचे आणि एकात्मिक राष्ट्राच्या अढळ भावनेचे महत्त्व यावर एक महत्वपूर्ण संदेश दिला. की, प्रत्येक नागरिक हा भारताच्या भविष्याचा रक्षक आहे आणि संकटाच्या वेळी, संघटित समाजाची गर्जना कोणत्याही शत्रूच्या शस्त्रापेक्षा अधिक ताकदवान ठरते.