गोव्यात येत्या २४ ते ३० या कालावधीत वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव होणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३०विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे ३८ प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आज येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे .
ही माहिती देताना हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी यांनी सांगितले की, ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत उभे राहिलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे; मात्र लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पाहता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची इकोसिस्टीम निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीच्या काळात जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० ते २०१५ या ६५ वर्षांच्या काळात हिंदूंची लोकसंख्या सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर त्या तुलनेत याच कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या सुमारे ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ अनैसर्गिक म्हणावी लागेल. कारण भारतात अवैध बांगलादेशी तसेच रोहिंग्या घुसखोरांची संख्या वाढत चालली आहे. त्यांना पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी भारतीय नागरिकत्वाची ओळखपत्रे बनवून देणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या वर्षी निवडणुकांमध्येही बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. मुंबईत अशा काही घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या अवैध घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान करणे हे भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे २०११ नंतर २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने मागील १३ वर्षांत भारताच्या जनसंख्येत काय पालट झाले, ते त्वरित जनगणना करून जनतेच्या पुढे मांडण्याची आवश्यकता आहे. तसेच CAA आणि NRC संपूर्ण भारतात त्वरित लागू केले पाहिजेत.
देशाच्या सुरक्षिततेचा विचार केला तर, माता वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांच्या बसवरील आतंकवादी हल्ल्यावरून समोर आले आहे की, काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदुबहुल जम्मूच्या दिशेने सरकत आहे. पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीसह राष्ट्रविरोधी आणि विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी जोमाने सक्रिय झाल्या आहेत. भारतासह जगभरातील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. अशा वेळी हिंदूंना जातीपातीच्या भांडणांत गुंतवून त्यांच्यात फूट पाडण्याचे षड्यंत्र आखले जात आहे; मात्र हिंदु राष्ट्राच्या मार्गात असे कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदूंच्या संघटनामुळे विरोधकांची षड्यंत्रे यशस्वी होणार नाहीत. जागतिक स्तरावर विविध देशांमधील वाढत जाणारी युद्धे-अस्थिरता पाहता हिंदू धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो. यासाठीच हिंदू राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे होणार आहे.
श्री. जोशी म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील. सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा, धर्म आणि राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हला प्रत्युत्तर, हिंदू समाजाच्या रक्षणाचे उपाय, हिंदू राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न, मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय, वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण, देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय, लँड जिहाद, काशी-मथुरा मुक्ती, गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदू राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील भगवान श्री परशुराम देवस्थानचे विश्वस्त आणि श्री सतनाम वारकरी संप्रदायाचे प्रमुख संयोजक अभय सहस्रबुद्धे, रत्नागिरी जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव, शिवप्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा प्रमुख गणेश गायकवाड,उद्योजक दीपक देवल यांच्यासह जिल्ह्यातील ३८ हिंदुत्वनिष्ठ महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. शिंदे म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, घाना, नेपाष आणि बांग्लादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदू संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगढ येथील शदाणी दरबारचे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आदी संतांची उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.
याशिवाय प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, हिंदू इकोसिस्टीमचे संस्थापक कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा सेव कल्चर सेव भारतचे संस्थापक उदय माहूरकर, वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या HinduJagruti या यू-ट्यूब’चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे .