Contribution Of RSS to India: 27 सप्टेंबर 1925 रोजी डाॅ. केशव बळीराम हेडगेवार(Keshav Baliram Hedgewar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना नागपूरमध्ये केली. मराठी तिथीनुसार संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी झालेली आहे. अर्थातच भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संघाची स्थापना झाली आहे. त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार, ‘भारताचे स्वातंत्र्य’ हे केशव हेडगेवार यांचे ध्येय होते. हेडगेवार इंग्रज सरकारविरोधात आक्रमक भाषण देत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर भाषणबंदी लादलीहोती. मात्र, हेडगेवारांनी हार मानली नव्हती. त्यांनी भाषणे देणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आणि त्यांना एका वर्षाचा तुरुंगवास सुनावला होता. १९२२ मध्ये ते तुरूगांतून बाहेर आले आणि १९२५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांचे वक्तव्य:
“हिंदू संस्कृती हिंदुस्तानाचा श्वास आहे. त्यामुळे जर हिंदुस्तानाचे संरक्षण करायचे असेल, तर आपल्याला हिंदू संस्कृतीचे संवर्धन करावे लागेल, हे स्पष्ट आहे.”
-अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एक ‘सांस्कृतिक संघटना’म्हणून पाहिले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेपासूनच देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यातील काही महत्वाच्या घटनेंचा आढावा घेऊयात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४७ मध्ये काश्मिरी सीमेवर केली होती देखरेख:
१९४७ मध्ये एकीकडे भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळत होते तर दुसरीकडे धर्माच्या आधारावर पाकिस्तान हा दुसरा देश उदयास येत होता. मुस्लिम आक्रमकांच्या हल्ल्यांमुळे आणि छळामुळे भारताची भूमी रक्ताने माखली होती. सर्वजण आपली घरे सोडून जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळत होते. भारताची ही फाळणी जगाच्या रक्तरंजित इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक मानली जाते. अशा परिस्थीती नेहरू सरकार पूर्णपणे गोंधळलेले होते. मात्र अशा परिस्थीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी लाखो हिंदू आणि शीखांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण संघाने ‘पंजाब मदत समितीची’ स्थापना केली होती. संघाने विविध ठिकाणी ३००० हून अधिक मदत छावण्या उघडल्या आणि ज्या गावांत हिंदू सुरक्षित नव्हते त्या हिंदूंना या छावण्यांमध्ये आणले आणि छावनीमधून भारतीय सैनिकांच्या मदतीने भारतात आणले. स्वयंसेवकांनी हिंदूंना केवळ भारतात आणलेच नाही तर त्यांचे जेवण, वैद्यकीय मदत, कपड्यांचीही व्यवस्थाही केली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी वाचवलेल्या लोकांमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबांचाही समावेश होता.
विशेष म्हणजे संघाने अशा परिस्थीत कर्तव्य बजावताना धर्मांमध्ये फरक केला नाही असे म्हटेल जाते. प्राध्यापक ए.एन. बाली त्यांच्या ‘नाऊ इट कॅन बी टेल’ या पुस्तकात अशी माहिती देण्यात आली आहे की, काही मुस्लिम महिला आणि मुलांना हिंदूंंच्या ठिकाणांहून सुरक्षितपणे बाहेर काढून स्वयंसेवकांनी त्यांना लाहोरममधील मुस्लिम लीग केंद्रात पाठवले होते.
-विशेष म्हणजे फाळणीदरम्यान जेव्हा पाकिस्तानी सैन्याने काश्मीरची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थीती बिकट झाली तेव्हा स्वयंसेवक कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय शस्त्रे हातात घेऊन आपले प्राण पणाला लावून सीमेवरती लढण्यासाठीही उभे राहिले होते. यामध्ये काही स्वयंसेवकांचे प्राणसुद्धा गेले आहे.
संघाचे दुसरे सरसंघचालक एम.एस. गोलवलकर (M. S Golwalkar) यांनी स्वयंसेवकांच्या शौर्याबद्दल एका लेखामध्ये लिहिले होते की, फाळणीच्या वेळी स्वयंसेवकांनी अनेक कुटुंबांना वाचवण्यात अतुलनीय धैर्य आणि क्षमता दाखवली. संघाने केलेले चांगले काम पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी अमृतसरमध्ये राहिलो होतो, तेव्हा तेथील काही छावण्यांना भेट दिली. तेव्हा तेथील काही पुरूष माझ्यासमोर नतमस्तक होऊन म्हटले, तुमचा संघ नसता तर आम्ही आमच्या महिला आणि मुले वाचली नसती.
१९६२ च्या युद्धात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सीमेवर देशसेवा बजावली:
१९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते. त्यावेळीती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू(Jawaharlal Nehru) होते. एक महिना चाललेल्या या युद्धात २००० हून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले होते.तर ४००० हून अधिक सैनिकांना युद्धकैदी बनवण्यात आले होते. अशा बिकट परिस्थीतीत संघाच्या स्वयंसेवकांनी सीमेवर सैन्याला रेशन पुरवले होते, जखमी सैन्याची देखभाल केली तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेतली होती. तसेच भारतीय सैन्याच्या गाड्या ज्या मार्गावरून जात होत्या त्या मार्गाचे रक्षण करण्याची जबाबदारीही स्वयंसेवकांनी घेतली होती.
-विशेष म्हणजे तत्कालीन नेहरू सरकारसोबत संघाचे तीव्र वैचारिक मतभेद होते. परंतु तरीही देशासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी नेहरू सरकारच्या युद्ध प्रयत्नांना पाठिंबा दिला होता.
-१९६२ च्या युद्धातील स्वयंसेवकांचे काम पाहून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रभावित झाले होते. याच पार्श्वभूमीवर नेहरूंनी २६ जानेवारी १९६३ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केले होते. त्यावेळी प्रजासत्ताकच्या परेडमध्ये ३,००० हून अधिक स्वयंसेवकांचा एक गट सहभागी झाला होता.
–१९६५ च्या युद्धात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात कायदा सुवव्यस्था राखून ठेवली
१९६५ मध्ये जेव्हा काश्मिरमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा १७ दिवस भारत-पाकिस्तान युद्ध चालले होते. या युद्धामध्ये चिलखती वाहने आणि रणगाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. या युद्धात भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे घुसखोरांना माघार घ्यावी लागली होती आणि पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती. परंतु युद्धादरम्यान तत्कालीन लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadu Shastri) सरकारचे सर्व लक्ष सीमेवरती होते कारण देश संकटात होता. तेव्हा सरकारसमोर अंतर्गत अशांततेच्या धोक्याचा प्रश्नही उभा होता. तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोलवलकर यांच्यासोबत बैठक घेतली आणि दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत मागितली. यामध्ये दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेच्या कामकाजावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील वाहतूक व्यवस्थापन स्वयंसेवकांनी स्वत:च्या हातात घेतले आणि ते व्यवस्थित पार पाडले. युद्धादरम्यान दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेवर कसलाही परिणाम झाला नव्हता यातून स्वयंसेवकांची कामगिरी अधोरेखीत होते.
-तसेच १९६५ च्या युद्धात काही स्वयंसेवक सीमेवरतीही गेले होते. या युद्धात काश्मीरच्या हवाई पट्ट्यांवरून बर्फ काढण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले होते.
– तसेच युद्धादरम्यान स्वयंसेवकांनी सीमेवरती सैनिकांना रेशन वाटले होते.
-या युद्धात जखमी सैन्यांना रक्तदान करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवकांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.
आणीबाणी दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका:
जून १९७५ मध्ये इंदिरा गांधी (Indira Gandi) सरकारने आणीबाणी(Emergency) लागू केली. त्यामुळे लोकशाही आणि लोकांचे मूलभूत हक्कही धोक्यात आले होते. अशा परिस्थीतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणीबाणीविरुद्ध सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी भूमिगत चळवळ म्हणून यशस्वीरित्या काम केले.
आणीबाणी दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रस्त्यावर आणीबाणीविरुद्ध पोस्टर्स चिकटवली. तसेच लोकशाहीची हत्या, ‘सत्याग्रहासाठी बाहेर पडा’ अशी पत्रके राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी देशभर पसरवली. अर्थातच जनतेला आणीबाणीची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी केले.
-तुरुंगातील बंदिस्त विविध राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये ‘संवाद दुवा’ म्हणूनही स्वयंसेवकांनी काम केले.
-आणीबाणीच्या काळात १०० हून अधिक स्वयंसेवकांचे प्राणही गेले होते.
-विशेष म्हणजे आणीबाणी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ४ जुलै १९७५ रोजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. तरीही स्वयंसेवकांनी आपले काम चालूच ठेवले होते.
आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेले काम:
-आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग होते. आणीबाणीवेळी संघातील अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यामुळे आणीबाणीविरोधी चळवळीचे समन्वय साधण्याची जबाबदारी मोदींवर आली होती.
यावेळी मोदींनी आणीबाणी विरोधातल्या चळवळीची गती कायम ठेवण्याचे महत्वाचे काम केले. तसेच ज्या घरातल्या पुरूषांना तुरूंगात टाकले आहे किंवा जे लोक पोलिसांच्या भीतीने लपून बसले आहेत. अशा सर्व कुटुंबांना मोदी भेटायचे, त्यांच्या गरजा समजून घ्यायचे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचे आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करतही करायचे.
मोदी अटक टाळण्यासाठी दोन वर्षांमध्ये वेष बदलूनही आणीबाणी विरोधात काम करत होते. कधी साधूच्या वेशात, कधी अगरबत्ती विक्रेता, कधी शीख तरूणाच्या वेशात मोदी फिरत असायचे. एकदा नरेंद्र मोदी आणीबाणी विरोधातले काही साहित्य घेऊन रिक्षातून प्रवास करत होते, तेव्हा पोलिसांच्या एका पथकाने रिक्षा थांबवली. परंतु नरेंद्र मोदी यांनी सतर्क होत पोलिसांना सांगितले की, ते विद्यापीठात काम करतात आणि विद्यापीठातील परीक्षेचे पेपर घेऊन चाललेआहेत. विशेष म्हणजे पोलिसांना शंका येऊ नये म्हणून मोदींनी पोलिसांना त्यांच्या जवळील साहित्य उघडून तपासणी करण्यास सांगितले, परंतु प्रश्नपत्रिका गोपनीय असल्याने त्यांना विद्यापीठात जाऊन विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती द्यावी लागेल आणि कारणे स्पष्ट करावी लागतील असेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मोदींजवळ असलेल्या आणीबाणी विरूद्धचे साहित्य तपासून पाहिले नाही. एकंदरित नरेंद्र मोदी यांच्या सतर्कतेमुळे आणि हुशारीमुळे संपूर्ण आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली नाही आणि त्यांनी संघाचे काम व्यवस्थित चालू ठेवले.
दरम्यान, १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी जो धैर्यशीलपणा दाखवला आणि निर्णायक संघर्ष केला, तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासात कायम स्मरणात राहणारा आहे. या काळात संघाने स्वतंत्रता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष भूमिगत काम केले, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्षमतेचे आणि निष्ठेचे स्पष्ट उदाहरण आहे. या सगळ्यावरून स्पष्ट होते की, जेव्हा जेव्हा देशावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आली आहे, तेव्हा तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी सरकारसोबत पूर्ण ताकदीने त्याचा सामना केला आहे.