राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे.या निमित्ताने संघ कार्याचा विस्तार तसेच मजबूतीकरणाचे उद्दिष्ट संघाने डोळ्यासमोर ठेवले आहे. मात्र त्याचबरोबर संघाचा उद्देश्य केवळ शताब्दी वर्षांचा उत्सव साजरा साजरा करणे नसून आत्मचिंतन करणे,संघ कार्यासाठी समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार प्रकट करणे राष्ट्र तसेच समाजाला एकसंघ करण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करण्याचे संघाचे ध्येय आहे.जे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह अनेक वरिष्ठांनी बैठकांमधून स्पष्ट केले आहे.
संघ शताब्दी वर्षाच्या संदर्भात संघाने संघटनात्मक दृष्टिकोनातून दोन ध्येय समोर ठेवली आहेत. संघाच्या शाखांचा विस्तार हे पहिले ध्येय आहे आणि दुसरे ध्येय आहे संघ कार्याची गुणवत्ता आणि विस्तार वाढवणे. कार्याची गुणवत्ता वाढली तर कार्याचा समाजात प्रभाव वाढेल. म्हणूनच संख्यात्मक विस्तारासोबतच संघकार्यात गुणात्मक वाढ होण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.
शतकाच्या उंबरठ्यावर असतानाही, संघाने व्यक्तिमत्त्व विकासाच्या मूलभूत कार्यात फारसा बदल केलेला नाही. परंतु व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यासोबतच त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ते म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे कार्य. यासाठी त्यांनी पंचपरिवर्तनाची संकल्पना समाजासमोर मांडली आहे.
सामाजिक दृष्टिकोनातून ‘पंच परिवर्तन’ हाही महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. संघाचे स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन, ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना घेऊन पुढे जाण्याचा विचार संघाने केला आहे. गेली अनेक वर्षे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम संघ करत आहे. त्याला चालना मिळावी, गती मिळावी या उद्देशाने संघाने समाजात काही महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे स्वयंसेवकांना आवाहन केले आहे. त्यात प्रामुख्याने समरसतेचा आग्रह, पर्यावरणपूरक जीवनशैली, कुटुंब प्रबोधन, ‘स्व’ अर्थात भारतीयत्वाचा आग्रह म्हणजेच स्व-बोध आणि नागरी कर्तव्य या पाच मूल्यांचा समावेश आहे. हे ‘पंच परिवर्तन’ कार्यक्रम राबवून समाजात मोठा बदल घडवून आणता येईल, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.पंच परिवर्तनाची कल्पना म्हणजे संघ आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना त्याचे पथदर्शी बनून समाजातील मूलभूत सुधारणांकडे आपला दृष्टिकोन अधिक सजग करणे अशी संघाची यामागची भूमिका असणार आहे.
येणाऱ्या काळात, समाजातील गरीब बांधवांची सेवा करण्यासोबतच, संघाचे स्वयंसेवक स्वतः या पाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करतील आणि समाजाला त्यात सहभागी आणि समर्थक बनवण्याचा प्रयत्न करतील. सरकार, प्रशासन आणि समाजाची उदात्त शक्ती समाजाच्या हितासाठी जे काही करत आहे किंवा करू इच्छित आहे, त्यातही संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान नेहमीप्रमाणे सुरू राहील.
पंच परिवर्तन हा केवळ चिंतन आणि शैक्षणिक चर्चेचा विषय नाही तर कृती आणि वर्तनाचा विषय असेल. पंच परिवर्तनामध्ये नमूद केलेल्या सर्व आयामांमध्ये संघाचे स्वयंसेवक पुढे येतील यासाठी संघाकडून प्रयत्न केले जात आहेत.
समाजात पाच टप्प्यात परिवर्तन घडवून आणणे ही पंच परिवर्तन यामागची नेमकी संकल्पना आहे. कौटुंबिक मूल्य संवर्धन करणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्व ओळखत ती आत्मसात करणे, सामाजिक सौहार्द वाढवणे,नागरी कर्तव्ये ओळखून त्याचा अवलंब करणे,स्वदेशीचा स्वीकार करत स्वतः ची भारतीय म्हणून ओळख प्रस्थापित करणे
पंच परिवर्तनाची गरज का आहे ?
भारत आज एका नव्या जागृतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे सामाजिक समरसतेतून ऐक्य, कुटुंब प्रबोधनातून मूल्यसंस्कार, पर्यावरण संरक्षणातून जागरूकता, स्वाधारित जीवनशैलीतून आत्मनिर्भरता आणि नागरिक कर्तव्यबोधातून जबाबदारीची भावना हीच नव्या विकसित भारताची ओळख ठरणार आहे. यासाठी ‘पंच परिवर्तन’ ही आज सर्वसामान्य समाजाची गरज आहे. समाजातील समरसतेचा आग्रह, पर्यावरणपूरक जीवनशैली, कौटुंबिक मूल्यांना चालना देण्यासाठी कौटुंबिक प्रबोधन, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये ’स्व’ अर्थात भारतीयत्वाचा आग्रह आणि नागरी कर्तव्यांच्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन, यांसारखे आयाम ‘पंच परिवर्तना’चे आहेत, जे समाजाशी जोडले जातील.
दरम्यान राजस्थान मध्ये एका भाषणात संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी पंच परिवर्तनाची संकल्पना स्पष्ट करताना नमूद केले होते की, हिंदू समाजाला बळकटी देणे ही काळाची गरज आहे. कारण हिंदूचे एक अतिशय चांगले रूप भारताला एक चांगला देश बनवेल. तरच ते भारतात राहून स्वतःला हिंदू न म्हणवणाऱ्यांना सोबत घेऊन जाऊ शकेल. तसेच जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला तर जगभरातील हिंदूंना आपोआपच त्या ताकदीचा फायदा होईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्षे मांडत असलेल्या विचारांमध्ये आणि संघ स्वयंसेवकांच्या आचारामध्ये पंच परिवर्तनाचे मूळ दडलेले आहे. ही संकल्पना संघासाठी अजिबात नवी नाही. उलट दैनदिन चालू असलेल्या शाखांमधून विविध उपक्रमांमधून संघ ह्या संकल्पनेवर गेली अनेक वर्ष काम करत आहे.
सामंजस्यपूर्ण समाज ही कोणत्याही समाजाची आदर्श अवस्था असते असे संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार म्हणत असत. अस्पृश्यता कोणत्याही भाषणाने किंवा संघर्षाने नष्ट करता येत नाही; तर ती नैसर्गिक जीवनातूनच नष्ट करावी लागते हे स्पष्टपणे ओळखून, डॉक्टरांनी नेहमीच संघात एकसमान हिंदुत्वाच्या भावनेवर भर दिला.समाजात एकी निर्माण करणे, समाजाला संघटित करणे तसेच समाजात समरसता निर्माण करणे यासाठी संघ आणि संघाचे स्वयंसेवक नेहमीच कार्यशील राहिले आहेत.
१९६९ मध्ये उडुपी येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रांतीय परिषदेत सामाजिक सुसंवादाच्या मुद्द्यावर ऐतिहासिक परिषद झाली होती. १५,००० हून अधिक प्रतिनिधी असलेल्या या परिषदेत, संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली, समाजातून अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हिंदू धर्माच्या सर्व पंथांच्या धर्माचार्यांनी हजेरी लावली होती.
तर अलीकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर त्यांच्या “आरएसएस: 21 वी सदी के लिए रोडमॅप” (पृष्ठ 9) या पुस्तकात म्हणतात की, संघाला समाजावर राज्य करणारी वेगळी शक्ती व्हायचे नाही. तर समाजाला मजबूत बनवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
संघाने आतापर्यंत शेकडो सामाजिक परिवर्तनाच्या कामांचा उल्लेख करण्याइतके काम केले आहे. जे कदापि मोजता येणे शक्य नाही. मात्र आता संघाने पंच परिवर्तनाच्या माध्यमातुन समाजाला संघटित होण्याची आणि राष्ट्राप्रती कृतज्ञ बनण्याची संधी दिली आहे.
पंच परिवर्तन संकलपना प्रत्यक्षात कशी येणार ?
पंच परिवर्तना’ची चर्चा राष्ट्रीय दृष्टिकोनातून पुढे नेण्यात यावी, असा आमचा आग्रह आहे. समाजातील सज्जन शक्ती आणि संस्थांची ताकद यादृष्टीने एकत्र यावेत. त्यामुळे संघ शताब्दी वर्षात या सर्व विषयांवर संघटनात्मक आणि सामाजिक पातळीवर पुढाकार घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे विषय वैयक्तिक, कौटुंबिक आणि आपल्या शाखांपर्यंत म्हणजेच व्यापक समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. हा मुद्दा कार्यकर्त्यांसमक्ष ठेवण्यात आला आहे. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले आहे.
हा केवळ वैचारिक विचारमंथनाचा विषय नाही, तर तो आचरण आणि व्यवहाराचा विषय आहे. या सोबतच सामाजिक समरसतेचा विषय घेऊन, सामाजिक वर्ग प्रमुखांच्या बैठका घेतल्या जातील. संघाचा व्यापक समाजापर्यंत संपर्क असल्याने, त्यांच्यापर्यंत हा विषय नेऊन यादृष्टीने आग्रह केला जाईल.संघाला समाजात केवळ संघटना म्हणून काम करायचे नाही, तर समाजाला संघटित करण्याचे काम करायचे आहे. संघ आणि संपूर्ण समाज यांत फरक नसावा. या दृष्टिकोनातून सर्व सज्जन शक्तीला या राष्ट्रीय चळवळीचा भावार्थ समजून या आंदोलनात अग्रेसर व्हावे लागेल. जेणेकरून शिस्त आणि देशभक्तीने भारलेले तरुण आपल्या देशाला शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेण्याचे काम करतील.असेही होसबळे यांनी स्पष्ट केले आहे.
पंच परिवर्तनातून काय साध्य होणार ?
या पंच परिवर्तनात पाच आयाम समाविष्ट करण्यात आले आहेत – (१) स्वतःची जाणीव म्हणजेच स्वदेशी, (२) नागरी कर्तव्य, (३) पर्यावरण, (४) सामाजिक सौहार्द आणि (५) कुटुंबाचे ज्ञान.
या पंच परिवर्तन कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी करून समाजात मोठा बदल घडवून आणता येईल. स्वतःची जाणीव झाल्याने नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव होईल. नागरी कर्तव्याची जाणीव झाल्याने म्हणजेच कायद्याचे पालन केल्याने राष्ट्र समृद्ध आणि प्रगतीशील होईल. सामाजिक सौहार्द आणि सद्भावनेमुळे उच्च-नीच जातीचा भेदभाव संपेल. पर्यावरणामुळे निर्मितीचे रक्षण होईल आणि कुटुंब प्रबोधनामुळे कुटुंबांचे रक्षण होईल आणि मुलांमध्ये मूल्ये वाढतील. समाजात विभक्त कुटुंबांची वाढती प्रवृत्ती थांबवण्याची आणि भारताच्या प्राचीन कुटुंब परंपरेला प्रोत्साहन देण्याची आज खूप गरज आहे.
समाजात बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतलेली ही कामे आहेत. जर ही सर्व कामे समाजाने स्वीकारली आणि त्यांचे पालन केले तर समाजात आमूलाग्र बदल घडू शकतो.राष्ट्र तसेच समाजाला एकसंघ करण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करण्याचे ध्येय्य असल्याचे होसबाळे यांनी यावेळी सांगितले.
समाजाची एकता, सर्व दिशांमध्ये जागरूकता आणि निस्वार्थी उपक्रम, लोककल्याणकारी प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासन हे स्वतःच्या पायावर उभे राहून एकत्र काम करत राहतील, तरच राष्ट्रीय शक्ती समृद्ध होते. जेव्हा शक्ती आणि वैभवाने संपन्न असलेल्या राष्ट्राकडे आपल्या सनातन संस्कृतीसारखी संस्कृती असते जी सर्वांना आपले कुटुंब मानते, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे आणि मृत्युच्या जीवनातून अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाते, तेव्हा ते राष्ट्र जगाचे हरवलेले संतुलन परत आणते आणि जगाला शांती आणि आनंदाच्या नवीन जीवनाचे वरदान देते. अलिकडच्या काळात आपल्या अमर राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचा हाच उद्देश आहे.आपली पंच परिवर्तनामागची भूमिका स्पष्ट करताना संघाने असे म्हंटले आहे.
(या लेखमालेच्या पुढील भागांमधून आपण पंच परिवर्तनाच्या सर्व आयामांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकाल)