राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS, ही भारतातली एक अत्यंत प्रभावी आणि मोठी स्वयंसेवी संघटना आहे. तिची स्थापना 1925 साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. त्या काळात देश स्वातंत्र्याच्या लढा देत होता.तसेच समाजात अनेक प्रकारची अस्थिरता होती. हे लक्षात घेऊन, डॉ. हेडगेवार यांनी एक असा गट तयार केला, जो समाजात शिस्त, एकता आणि राष्ट्रभक्ती वाढवेल. हिंदू समाजाला संघटित करणे, त्यांच्यात एकात्मता निर्माण करणे आणि देशासाठी समर्पित कार्यकर्ते घडवणे. हा त्यांचा स्पष्ट हेतू होता. RSS सुरुवातीला अगदी थोड्या लोकांपासून सुरू झाली होती, पण आज ती भारतभर पसरलेली आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संघ कार्य करत आहे. आजवर संघाचे सहा सरसंघचालक झाले आहेत. प्रत्येक सरसंघचालकाने आपल्या काळात संघाच्या विचारधारेत आणि कार्यपद्धतीत काही ना काही महत्त्वपूर्ण भर घातली आहे. या संपूर्ण लेखामध्ये त्यांच्या कार्यकाळातील खास पैलूंवर मुद्देसूदपणे प्रकाश टाकला आहे.
1.सरसंघचालक पदाचे महत्त्व आणि सरसंघचालकांची सुची
सरसंघचालक हे आरएसएसच्या सर्वोच्च नेतृत्वाचे स्थान आहे. हा पद संघटनेच्या धोरणनिर्मिती, कार्यपद्धती आणि दीर्घकालीन दृष्टीकोनासाठी महत्त्वपूर्ण आहे. सरसंघचालक हे संघटनेच्या सर्व शाखांचे मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य करते.
1.डॉ. केशव बळीराम हेडगेवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक होण्याचा मान डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना मिळाला. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1889 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील पं. बळीराम पंत हेडगेवार आणि आई रेवतीबाई यांचे 1902 मध्ये प्लेगमुळे निधन झाले. त्यांच्या दोन मोठ्या भावांनी त्यांचे पालनपोषण केले.
व्यक्तिमत्व (Personality)
डॉ. हेडगेवार यांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत प्रभावशाली, समग्र आणि आदर्शवादी होते. लहानपणापासूनच त्यांच्यात देशभक्तीची जाणीव होती. त्यांची राष्ट्रप्रेमाची भावना इतकी तीव्र होती की शाळेत ‘वंदे मातरम्’ म्हणाल्यामुळे त्यांना निष्कासित करण्यात आले, तरीही त्यांनी आपली तत्त्वनिष्ठा सोडली नाही. त्यांच्यात कठोर शिस्त, त्याग, आत्मविश्वास आणि परिवर्तनशील विचार होते. त्यांनी जुन्या विचारसरणीला आव्हान देत नव्या कार्यपद्धती स्वीकारल्या. भारतीय संस्कृतीशी त्यांचा दृढ नातेसंबंध होता, आणि त्यांनी गीतेतील विचारांप्रमाणे समाजाला दिशा दिली.
नेतृत्व (Leadership):
डॉ. हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना करून एक संघटित, राष्ट्रभक्त कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यांनी संघाला राजकारणापासून दूर ठेवले, पण राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सामाजिक जागृतीद्वारे सहभागी होण्यावर भर दिला. त्यांचे नेतृत्व केवळ आदेश देणारे नव्हते, तर आचार-विचारांनी मार्गदर्शन करणारे होते. त्यांनी युवकांना एकात्मता, शारीरिक कणखरता, आणि चारित्र्यनिर्माण या मूल्यांच्या आधारे घडवले.
सामाजिक कार्य ( Social work)
डॉ. हेडगेवार यांचे कार्य मूलत: राष्ट्रनिर्माणाभोवती केंद्रित होते. त्यांनी कोलकात्यात वैद्यकीय शिक्षण घेतले असले, तरी देशसेवेसाठी डॉक्टरकीचा मार्ग सोडला आणि क्रांतिकारी कार्यात उतरले. अनुशीलन समिती आणि युगांतरसारख्या गटांमधून त्यांचा सहभाग होता, पण नंतर त्यांच्या लक्षात आले की सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनच शाश्वत आहे. त्यामुळे, संघाच्या माध्यमातून त्यांनी शाखा कार्यपद्धती सुरू करून समाजामध्ये संघटन, शिस्त, सेवा आणि संस्कार रुजवले. त्यांच्या कार्याने हजारो युवकांना देशसेवेच्या मार्गावर आणले. त्यांनी समाजातील व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करत त्यांना आदर्श नागरिक बनवले.
2.श्री. माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी)
श्री गुरुजी, म्हणजेच माधव सदाशिव गोळवलकर, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी 1906 रोजी एकादशीच्या दिवशी झाला. ‘गुरुजी’ हे नाव त्यांना बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आदराने दिले होते, आणि तेच नाव सर्वत्र प्रचलित झाले.
व्यक्तिमत्व (Personality)
गोळवलकर गुरुजींचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, संयमी आणि राष्ट्रनिष्ठ विचारसरणीने परिपूर्ण होते. तसेच त्यांचे जीवनही साधेपणाचे, शिस्तबद्ध त्यागमय आणि सहनशील होते. एके दिवशी, त्यांच्या पायाच्या अंगठ्याला विंचूने चावा घेतला, पण त्यांनी अगदी सहजतेने त्यांच्या पायाचा तो भाग कापला, तो पाय पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणात बुडवला आणि पुन्हा अभ्यास सुरू केला. हे ऐकून आश्चर्यचकित होऊन त्यांच्या एका मित्राने विचारले, “एवढ्या तीव्र वेदना असूनही तुम्ही अभ्यास कसा करता?” माधवराव म्हणाले, “बरं, विंचूने माझ्या डोक्याला नाही तर माझ्या पायाला चावले आहे!” नंतरही, लोकांनी अनेकदा अत्यंत वेदनादायक शारीरिक वेदनांमध्ये त्यांची शांत सहनशीलता पाहिली आहे.
त्यांनी कधीही वैयक्तिक लाभाचा विचार केला नाही. ते अत्यंत बुद्धिमान आणि प्रखर विचारवंत होते. त्यांच्या भाषणांमध्ये तर्कशुद्धता, स्पष्टता आणि प्रेरणादायी विचार यांचा संगम असे. अध्यात्मिकतेचा त्यांच्या जीवनावर खोल प्रभाव होता. त्यांच्या वागणुकीत आणि विचारांत भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असे. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाने हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आणि संघकार्याला मजबूत पाया मिळवून दिला.
नेतृत्व (Leadership)
गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभावी आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी संघाच्या कार्याचा देशभर मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे संघ ग्रामीण व शहरी भागात पोहोचला. “Bunch of Thoughts” यासारख्या पुस्तकांद्वारे त्यांनी संघाचा विचारसिंद्धांत स्पष्ट केला, जो आजही कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरतो. त्यांनी संघ कार्यात आधुनिक दृष्टिकोन आणत नव्या पिढीला संघाशी जोडले. गुरुजींच्या नेतृत्वात संघ केवळ संस्था न राहता एक विशाल राष्ट्रहिताच्या विचारप्रवाहात परिवर्तित झाला.
सामाजिक कार्य (Social Work)
गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संघाने शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती मदत यांसारख्या विविध सामाजिक क्षेत्रांत कार्य सुरू केले. त्यांनी वनवासी वस्ती विकासासाठी विशेष प्रयत्न केले आणि सेवाभावी संस्थांच्या स्थापनेला मोठी चालना दिली. गुरुजींनी युवकांना देशसेवेची प्रेरणा दिली व त्यांना समाजासाठी झटण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या विचारांमध्ये सामाजिक ऐक्याला व हिंदू समाजाच्या संघटनाला विशेष महत्त्व होते. समाजातील विविध वर्गांमध्ये समरसतेचा संदेश देत त्यांनी एकात्मतेचा पाया घातला. त्यांच्या कार्यामुळे संघाचे सामाजिक योगदान व्यापक आणि प्रभावी बनले.
3.बाळासाहेब श्रीहरि देवरस
बाळासाहेब देवरस (मधुकर दत्तात्रय देवरस) यांचा जन्म 11 डिसेंबर 1915 रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल, मॉरिस कॉलेज आणि नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुरुवातीपासूनच जोडले गेले होते. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने त्यांनी संघासाठी जीवन समर्पित केले.
A.व्यक्तिमत्व (Personality)
बाळासाहेब देवरस यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू, संयमी आणि स्पष्टवक्ते असे होते. ते समाजातील सर्व स्तरांशी खुलेपणाने संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि त्यावर उपाय सुचवत. त्यांची विचारसरणी परिवर्तनशील होती. काळानुसार विचार व धोरणे बदलण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी सहकार्य आणि समन्वयावर नेहमी भर दिला, त्यामुळे विविध विचारधारांतील लोकांशीही त्यांनी चांगले संबंध ठेवले. त्यांचे नेतृत्व समंजस, समावेशक आणि व्यावहारिक विचारांनी भरलेले होते. त्यामुळे ते संघटन आणि समाजासाठी प्रभावी मार्गदर्शक ठरले.
नेतृत्व (Leadership)
1973 ते 1994 पर्यंत त्यांनी संघाचे तिसरे सरसंघचालक म्हणून काम पाहिले. बाळासाहेब देवरस हे एक कुशल संघटक होते. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात संघाच्या लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले. त्या काळात सरकारने आरएसएसवर बंदी घातली होती आणि बाळासाहेबांसह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले होते. तरीही, बाळासाहेबांच्या सक्रिय आणि व्यावहारिक नेतृत्वाखाली संघाने या अन्यायाविरुद्ध जोरदार संघर्ष केला. आणि संघ कार्य सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय केले.
सामाजिक कार्य (Social Work)
बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक कार्याला विशेष महत्त्व दिले. त्यांनी दलित आणि वंचित समाजासाठी अनेक सेवा प्रकल्प सुरू केले. त्यांच्या प्रेरणेतून सेवा भारती, एकल विद्यालय यांसारख्या संस्थांनी ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी काम सुरू केले. त्यांनी सामाजिक समरसतेचा आग्रह धरला आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यतेविरुद्धही त्यांनी ठाम भूमिका घेतली. बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक प्रश्नांवर जागरूकता कशी निर्माण करावी, धर्माबाबतची भूमिका काळाच्या गरजेनुसार कशी असावी, संघर्ष सर्वसमावेशक कसा असावा, आणि राजकीय निर्णय कसे घ्यावे या सगळ्या गोष्टी संघटनेला शिकवल्या.
4.प्रो.राजेंद्रसिंह (रज्जू भैया)
प्रोफेसर राजेंद्र सिंह यांचा जन्म 29 जानेवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथे झाला. रज्जू भैया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व शास्त्रज्ञ, शिक्षक, आणि संघटनात्मक नेतृत्व यांचे उत्तम मिश्रण होते. त्यांनी आपल्या जीवनात शास्त्रज्ञतेला समाजसेवेसाठी समर्पित केले आणि संघाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
व्यक्तिमत्व (Personality)
रज्जू भैया हे इलाहाबाद विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांची शास्त्रज्ञ म्हणून ओळख होती, आणि नोबेल विजेते सी. व्ही. रमन यांनी त्यांना अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून गौरवले होते.पण त्यांनी आपले शास्त्रज्ञतेचे करिअर सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे जीवन साधेपणाने आणि समाजसेवेच्या भावनेने परिपूर्ण होते.
नेतृत्व (Leadership)
रज्जू भैया यांनी 1994 मध्ये सरसंघचालकपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सामाजिक समरसता, ग्रामीण विकास आणि स्वदेशी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले. 1975 ते 77 च्या आपत्कालीन काळात त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सक्रिय भूमिका घेतली. दिल्लीतील मानवाधिकार संमेलनाचे आयोजन करून त्यांनी आपत्कालीन काळातील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला.
सामाजिक कार्य (Social Work)
रज्जू भैया यांनी स्वदेशी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने, ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक होते. त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामध्ये त्यांनी रामाला केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानले. रज्जू भैया यांचे जीवन हे शास्त्रज्ञतेपासून समाजसेवेपर्यंतच्या प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या कार्यामुळे संघ आणि समाज दोन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल घडले.
5.कुप्पाहली सीतारामय्या सुदर्शन
१९३१ रोजी रायपूर येथे जन्मलेले के सी सुदर्शन वयाच्या नऊ व्या वर्षीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेत सामील झाले.
पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक झाले. त्यांनी विज्ञान, विचार आणि संघटनात्मक नेतृत्व यांचा उत्कृष्ट समन्वय साधत संघ कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
व्यक्तिमत्त्व (Personality)
सुदर्शन हे उच्चशिक्षित आणि तज्ज्ञ संघटक होते. त्यांनी सागर विद्यापीठातून टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली. केवळ नऊ वर्षांचे असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत भाग घ्यायला सुरुवात केली, ज्यामुळे संघाचे विचार त्यांच्या मनात लहानपणापासूनच बिंबले. ते अत्यंत विवेकशील आणि विचारवंत होते. हिंदुत्व, स्वदेशी अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर त्यांचे सखोल चिंतन असायचे. त्यांनी सामाजिक समरसता आणि पर्यावरणीय संवेदनतेला नेहमी महत्त्व दिले. त्यांचे जीवन साधेपणाने परिपूर्ण होते आणि त्यांनी संयम, शिस्त आणि मूल्याधिष्ठित जीवन जगले.
नेतृत्व (Leadership)
सुदर्शन यांनी 2000 साली राजेंद्रसिंह (रज्जू भैया) यांच्या निधनानंतर संघाचे पाचवे सरसंघचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वात संघाने नव्या युगानुसार विचारांचा आणि कार्यपद्धतींचा विकास केला. 2009 मध्ये आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी सरसंघचालकपदाचा राजीनामा दिला आणि डाॅ मोहन भागवत यांच्याकडे नेतृत्व सोपवले. त्यांच्या कार्यकाळात संघाच्या धोरणांमध्ये ठळकपणे बदल दिसून आले. स्वदेशी अर्थव्यवस्थेचा आग्रह, पर्यावरणीय जागरूकता आणि सामाजिक समरसता या मुद्द्यांवर त्यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये शिस्त, साधेपणा आणि सेवाभाव यांची जाणीव जागवली.
सामाजिक कार्य (Social Work)
सुदर्शन यांनी स्वदेशी चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आणि स्थानिक उत्पादन व वापराला महत्त्व दिले. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी संघातून अनेक उपक्रम राबवले, ज्यात जलसंधारण, वृक्षारोपण, आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यांचा समावेश होता. सामाजिक समरसतेचा प्रचार हा त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा होता. त्यांनी विविध धार्मिक, सामाजिक व जातीय घटकांमध्ये संवाद वाढवण्याचे कार्य केले. त्यांनी समतेचा विचार मांडत समाजात ऐक्य आणि समरसता निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
6.डॉ. मोहन मधुकरराव भागवत:
डाॅ मोहन भागवत यांचा जन्म 11 सप्टेंबर 1950 रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे झाला. त्यांचे वडील मधुकर राव भागवत हे देखील एक समर्पित स्वयंसेवक होते, सध्या डॉ. मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहावे सरसंघचालक आहेत. त्यांनी संघाच्या विचारधारेला आधुनिकतेसह सामाजिक समरसता, पर्यावरणीय जागरूकता आणि राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने पुढे नेले आहे.
व्यक्तिमत्त्व (Personality)
डॉ. मोहन भागवत हे पशुवैद्यकशास्त्रज्ञ असून, त्यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठातून बी.व्ही.एस्सी.अँड डी.एच. ही पदवी संपादन केली. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळात त्यांनी संघाच्या भूमिगत कार्यात सक्रिय सहभाग घेऊन संघाशी आपली नाळ जोडली.त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टवक्तेपणा, संयम, आणि सामाजिक बांधिलकी यांचे मिश्रण आहे. त्यांनी “विविधता ही आपली अंतर्गत एकतेची अभिव्यक्ती आहे” असे प्रतिपादन केले आहे, ज्यामुळे सामाजिक समरसतेचा संदेश दिला जातो.
नेतृत्व (Leadership)
डॉ. भागवत यांनी 2009 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहावे सरसंघचालकपद स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमठवला. त्यांनी “पंच परिवर्तन” या संकल्पनेद्वारे सामाजिक समरसता, पर्यावरणीय जागरूकता, कुटुंब साक्षात्कार, स्वत्व आणि नागरिक कर्तव्य यांना महत्त्व दिले. त्यांच्या मते, “विविधतेत एकता” हे हिंदुत्वाचे प्रमुख तत्त्व आहे, जे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणते.
सामाजिक कार्य (Social Work)
डॉ. भागवत यांनी पर्यावरणीय संवेदनशीलतेला महत्त्व दिले आणि “वसुंधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. त्यांच्या मते, भारताची संस्कृती सर्वसमावेशक आहे आणि तीच जगाला शांतता आणि सहअस्तित्वाचा संदेश देऊ शकते. त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक समुदायांमध्ये संवाद वाढवण्याचे कार्य केले, ज्यामुळे समाजात ऐक्य आणि समरसता वाढण्यास मदत झाली.
2.संघाची भविष्यातील दिशा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही केवळ एक सांस्कृतिक संघटना न राहता, आता समाजाच्या सर्व स्तरांत सक्रिय भूमिका बजावणारी संस्था बनली आहे. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी संघ सातत्याने नवी दिशा ठरवत आहे. खाली संघाच्या भविष्यातील तीन महत्त्वाच्या दिशा सविस्तर दिल्या आहेत:
शैक्षणिक संस्थांमध्ये कार्याची वाढ
संघाची शैक्षणिक क्षेत्रातील भूमिका दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे संघ मानतो. त्यामुळे विद्या भारती, सरस्वती शिशु मंदिर, एकल विद्यालये यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून शाळांमधून राष्ट्रनिष्ठ, संस्कारक्षम आणि समाजाभिमुख विद्यार्थ्यांचे घडवणूक करण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात संघ अधिकाधिक शैक्षणिक संस्थांमध्ये आपले कार्य वाढवणार आहे. हे केवळ पुस्तकापुरते शिक्षण न राहता, विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये, देशाभिमान, आणि सामाजिक समरसतेचे संस्कार रोवण्याचे कार्य असेल.
ग्रामीण भागातील विस्तार
ग्रामीण भारत हा संघाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. संघाने गावोगावी शाखा स्थापनेचा संकल्प केला आहे. यामुळे ग्रामीण युवकांमध्ये संघटना, सेवा आणि संस्कार यांचा प्रसार होईल. ग्रामविकास, महिला सबलीकरण, आरोग्य, आणि शेतीविषयक उपक्रमांद्वारे संघ गावागावात पोहोचत आहे. सेवा भारती, एकल विद्यालये, व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने हा विस्तार होत आहे. भविष्यात हा विस्तार अधिक संघटित व परिणामकारक होईल.अशी आशा आहे.
सामाजिक समरसतेचा प्रचार
संघाने जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक भेदाभेद संपवण्याचा देखील दृढ निश्चय केला आहे. “समाज एकसंध आणि समरस असला पाहिजे,” हा संदेश संघ सातत्याने देत आहे. विविध जाती, पंथ, व समाजघटकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी संघ कार्य करत आहे. कानपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मंदिर प्रवेशावर कोणतीही बंदी असणे चुकीचे आहे.”हे विधान संघाच्या आधुनिक, समावेशक दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. त्यांनी असेही सांगितले की, “आपण जर देवाला सर्वांचा मानत असू, तर सर्वांनाच मंदिरात जाण्याचा अधिकार असला पाहिजे.” ही भूमिका संघाच्या सामाजिक समरसतेच्या प्रयत्नांना पुष्टी देणारी आहे.
एकुणच संघाची भविष्यातील दिशा ही केवळ एका विचारप्रवाहापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्कारयुक्त शिक्षण, ग्रामीण भागात सेवा-कार्याचा विस्तार आणि समाजात समरसता यामुळे संघ एक व्यापक राष्ट्रहितकारी चळवळ म्हणून उभा आहे आणि भविष्यातही तोच मार्ग दृढपणे चालणार आहे.