भारतासारख्या विशाल आणि लोकशाहीप्रधान राष्ट्राला आतून अस्थिर करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत. विशेषतः नक्षलवाद (Naxalism) आणि दहशतवाद (Terrorism) हे दोन्ही असे सशस्त्र संघर्षाचे प्रकार आहेत, जे देशाच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरले आहेत. हे दोन्ही प्रवाह हिंसक असले तरी त्यांचा उगम, उद्दिष्टे, विचारसरणी, कार्यपद्धती, प्रभाव आणि समाजातील स्थान या बाबतीत लक्षणीय फरक आहे. या लेखामध्ये आपण नक्षलवाद आणि दहशतवाद यांच्यातील मूलभूत भिन्नता, त्यांची सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी, कार्यशैली, त्यांचा लोकांवर होणारा प्रभाव, तसेच राष्ट्रीय सुरक्षेवर होणारे परिणाम यांची सविस्तर माहिती घेणार आहोत.
1.उगम व उद्दिष्टे:
नक्षलवादाचा उगम 1967 साली पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात झाला. सुरुवातीला सामाजिक न्यायासाठी सुरू झालेली ही चळवळ पुढे हळूहळू हिंसक मार्गाकडे वळली. एप्रिल 1969 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ या राज्यांतील नक्षलवादी गट एकत्र आले आणि त्यांनी मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे उद्दिष्ट ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मदतीने सशस्त्र लढे उभारून सत्ता मिळवणे होते. ते निवडणुका, लोकशाही प्रक्रिया आणि जनआंदोलनांना विरोध करत होते. चारू मजुमदार हे या चळवळीचे मुख्य विचारवंत होते. माओ-त्से-तुंग यांचे विचार आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी निष्ठा ठेवून भारतात अशाच प्रकारे क्रांती घडवावी, हे या नक्षलवादाचे प्रमुख तत्त्व होते.
याउलट, दहशतवादाची सुरुवात फ्रेंच क्रांती (1789) नंतर झाली, जिथे सरकारने आपल्या विरोधकांवर हिंसक कारवाई केली. यानंतर 19व्या आणि 20व्या शतकात राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कारणांमुळे वेगवेगळ्या देशांमध्ये दहशतवादी गट निर्माण होऊ लागले. आधुनिक दहशतवाद म्हणून ज्याला आपण आज ओळखतो तो 1970 नंतर वाढू लागला. यामध्ये इस्लामिक गट जसे की अल-कायदा, आयसिस अशा संघटनांचा समावेश आहे. यांचा उद्देश बहुधा धार्मिक, सांप्रदायिक किंवा राजकीय असतो. ते जनतेमध्ये भीती निर्माण करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात.
2.विचारधारा
नक्षलवाद हा मुख्यतः वर्गसंघर्षावर आधारित असून त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे, तर दहशतवाद धार्मिक अतिरेकी विचारांवर आधारलेला असतो. मात्र या दोन्हींचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि देशाच्या एकात्मतेवर होत असतो.
नक्षलवाद
नक्षलवाद कम्युनिस्ट विचारसरणीवर आधारित असून मार्क्स, लेनिन व माओ यांच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला आहे. त्याचे मुख्य तत्त्व म्हणजे वर्ग संघर्ष आहे. 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता. तेंव्हा झालेल्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुर्दैवाची गोष्ट अशी या युद्धादरम्यान आणि युद्धानंतर आपल्याचा देशातील काही लोक वामपंथी म्हणजेच डाव्या विचारसरणीच्या नावाखाली चीनचे समर्थन करत होते. आणि भारताला विरोध करत होते. त्यांची अशी इच्छा होती की चीनने भारतावर वर्चस्व प्रस्थापित करावे पण सुदैवाने असे झाले नाही.त्यामुळे या लोकांनी 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी गावतून एका अशा आंदोलनाची सुरुवात केली ज्यामागे पिंपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे संस्थापक माओत्से तुंग यांचा विचार होता. त्यांचे मत होते की राजकीय सत्ता ही बंदुकीच्या नळीमधून वाहते’ माओच्या याच विचारांवर प्रभावीत होऊन नक्षलवादी संघटना त्यांच्या तत्वज्ञानानुसार काम करत आहे.
दहशतवाद
दहशतवाद कोणत्याही ठोस तात्त्विक चौकटीत बसत नाही. तो धार्मिक अतिरेकी विचारधारा, फुटीरतावाद किंवा देशद्रोही प्रवृत्ती यावर आधारित असतो. अनेकदा अनेकदा असे म्हटले जाते की दहशतवादाला धर्म नसतो. पण पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या प्रकारे हिंदू समाजातील लोकांना धर्म विचारून मारण्यात आले. त्यावरून दहशतवादी हे धर्मांध असतात हे प्रकर्षाने दिसून आले. उल्लेखनीय बाब म्हणजे पाकिस्तानसारख्या मुस्लिम बहुत देशामध्ये लष्कर-ए-तैयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद यांसारख्या भारतावर हल्ले करणाऱ्या संघटना आसरा घेतात. आणि पाकिस्तान सरकार नेहमीप्रमाणे हात वर करते. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या भूमिकेवर अनेकदा शंका उपस्थित केले जाते.
3.कार्यपद्धती
नक्षलवाद आणि दहशतवाद हे दोन्ही हिंसक मार्गाने आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी, त्यांचा परिणाम एकच असतो तो म्हणजे समाजात भीती, अस्थिरता आणि विध्वंस निर्माण करणे. नक्षलवादी मुख्यतः दुर्गम ग्रामीण भागात सशस्त्र संघर्ष करत असतात, तर दहशतवादी शहरी भागांमध्ये थेट नागरिकांवर हल्ला करून भीती पसरवतात.
नक्षलवाद्यांची कार्यपद्धती:
नक्षलवादी आपले काम मुख्यतः जंगल आणि अतिदुर्गम भागांमध्ये करतात. पोलिस, सरकारी अधिकारी आणि शासनाची यंत्रणा हेच त्यांचे मुख्य लक्ष्य असते. याच वर्षी, जानेवारी महिन्यात नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षादलांवर मोठा हल्ला केला होता. त्यांनी जवानांच्या वाहनावर IED (स्फोटक) ठेवून स्फोट घडवून आणला. या भयंकर हल्ल्यात 9 जवान शहीद झाले आणि अनेक जवान गंभीर जखमी झाले. नक्षलवादी अशा प्रकारचे हल्ले तर करतातच, पण ते आदिवासी जनतेची दिशाभूल देखील करतात. त्यांना कायद्याचे उल्लंघन करायला आणि गुन्हे करायला प्रवृत्त करतात. दहशतीच्या जोरावर ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत राहतात.खरं पाहिलं तर नक्षलवाद्यांचा उद्देश सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आहे. पण त्यांनी त्यासाठी चुकीचा म्हणजेच हिंसक मार्ग निवडला आहे. कोणताही धर्म, संस्कृती किंवा देश हिंसेला मान्यता देत नाही, कारण हिंसा कधीच कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही. म्हणूनच नक्षलवाद हा आपल्या समाजासाठी धोकादायक आणि विनाशकारी आहे.
दहशतवाद्यांची कार्यपद्धती
दहशतवाद म्हणजे हिंसाचाराच्या धमकीद्वारे किंवा प्रत्यक्ष हिंसक कृत्यांद्वारे सामान्य जनता किंवा सरकार यांना घाबरवणे आणि त्यांच्या निर्णयांवर दबाव टाकणे. दहशतवादी आपले हेतू साध्य करण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण करतात. ते शहरे, सार्वजनिक ठिकाणे आणि सामान्य नागरिक यांना लक्ष्य करतात. आत्मघातकी हल्ले, बॉम्बस्फोट, गोळीबार यांसारख्या हिंसक कारवायांची ते योजना आखतात आणि अंमलात आणतात. या प्रकारांमुळे निष्पाप लोकांचा बळी जातो आणि समाजात असुरक्षिततेची भावना पसरते. दहशतवाद केवळ जीवितहानी करत नाही, तर तो देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्थैर्यावरही गंभीर परिणाम करतो. उदाहरण द्यायचे झाल्यास 2008 सालचा 26/11 मुंबई हल्ला, 2019 चा पुलवामा हल्ला किंवा 2001 साली भारतीय संसदेवर झालेला हल्ला ही दहशतवादी हल्ल्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
4. नक्षलवाद आणि दहशतवाद लक्ष्य व प्रभावित क्षेत्र
नक्षलवाद आणि दहशतवाद त्यांची लक्ष्ये आणि प्रभाव क्षेत्र वेगवेगळी आहेत. नक्षलवाद ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये सामाजिक असंतोषावर आधारित असून तो स्थानिक पातळीवर प्रभाव टाकतो, तर दहशतवाद हा अधिक व्यापक आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देतो. या दोन्हींचे लक्ष आणि प्रभावक्षेत्र खालीलप्रमाणे आहेत.
नक्षलवादाचे लक्ष्य व प्रभाव
नक्षलवादाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सामाजिक बदल घडवणे आणि सगळ्यांसाठी समानता असलेला समाज तयार करणे नक्षलवादी ग्रामीण भागात जंगलात आणि आदिवासी भागांमध्ये सक्रिय असतात. ते गरिबी, बेरोजगारी आणि विकासाचा अभाव याचा फायदा घेतात आणि लोकांना आपल्या बाजूने वळवतात. नक्षलवाद भारतात मुख्यतः झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र (गडचिरोली), आंध्र प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये आढळतो. हा भाग लाल पट्टा’ (Red Corridor) म्हणून ओळखला जातो. पण आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाल्याने नक्षलवादी चळवळ कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे.
दहशतवादाचे लक्ष्य व प्रभाव
दहशतवाद्यांचे लक्ष्य म्हणजे देशात भीती निर्माण करणे आणि शांतता बिघडवणे ते अनेकदा धार्मिक द्वेषातून किंवा राजकीय हेतूने हिंसा करतात. पहलगाम हल्ल्यासारख्या घटना हे दाखवतात की काही दहशतवादी धार्मिक दृष्टिकोनातून अतिरेकी असतात. दहशतवादाचा प्रभाव राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा असतो. तो मुख्यतः जम्मू-काश्मीर, भागात प्रकर्षाने दिसून येतो.पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी LOC (लाइन ऑफ कंट्रोल) पार करून भारतात घुसतात. आणि हल्ले घडवून आणतात.
मानसशास्त्रीय युद्ध हे माहिती युद्धाचे एक क्षेत्र आहे ज्याचा वापर शत्रू धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शत्रूच्या मानसिक जागेचा वापर करण्यासाठी करतो. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि त्यांच्या भारतातील काही समर्थकांनी लोकांच्या मनात भीती पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असा प्रचार केला की भारत सरकार, विशेषतः भाजप, ही फक्त हिंदूंना साथ देणारी आणि इतर धर्मांवर अन्याय करणारी संघटना आहे. मात्र यामागचा उद्देश भारतात जातधर्मावरून भांडण उकरून काढणे आणि भारताची बदनामी करणे होता. मात्र अशा कृत्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. विशेषतः जम्मू-काश्मीरसारख्या सीमावर्ती भागात अधिक सतत सतर्क राहावे लागते. कारण आजवर याच भागात दहशतवाद्यांचा प्रभाव जास्त दिसून आला आहे. मात्र आता मोदी सर्किट 370 कलम रद्द केल्यापासून जम्मू काश्मीर भागात सकारात्मक बदल पहायला मिळत आहे.
5.समाजातील स्थान
नक्षलवादाला स्थानिक सहानुभूती आणि सुरक्षेचा धोका
नक्षलवादाला काही प्रमाणात स्थानिक लोकांचे सहानुभूती मिळू शकते, विशेषतः जेथे शासन पोहोचलेले नाही अशा भागात नक्षलवादी स्थानिक लोकांना लहान लहान कामे, सुरक्षा, किंवा न्याय देण्याचे वचन देतात. यामुळे काही लोक त्यांना माहिती, अन्न, लपण्यासाठी जागा वगैरे देतात. याशिवाय नक्षलवादी अनेकदा हिंसक मार्गाने लोकांना धमकावतात. जर त्यांनी मदत केली नाही, तर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला धोका असतो. त्यामुळे अनेक वेळा ही मदत “भीतीपोटी” दिली जाते. हे नक्षलवादी आपल्या विचारसरणीचा प्रचार गावांमध्ये आणि गावातील शाळांमध्येही करतात. विशेषतः तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि बर्याचदा अनेक तरुण त्यांच्या जाळ्यात अडकतात. पण नक्षलवाद्यांना साथ देणे म्हणजे राज्याच्या आणि पर्यायाने राष्ट्रीच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे आहे.
मर्यादित समर्थन आणि समाजाचा विरोध
दहशतवादाला फारसे समर्थन मिळत नसले तरीही काही कट्टरपंथीय गट दहवतवादाला साथ देतात. बुरहान वाणी याचे एक ठळक उदाहरण आहे. तो जम्मू-काश्मीरमधील रहिवासी होता आणि अभ्यासातही खूप हुशार होता. त्याने आठवीत 90% पेक्षा जास्त गुण मिळवले होते. पण काही कारणांमुळे तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्याचा चुलत भाऊ आधीच 2008 पासून अतिरेकी चळवळीत सामील झाला होता, त्यामुळे त्याचाही प्रभाव बुरहानवर पडला.
बुरहानला स्थानिक लोकांकडून सहानुभूती आणि पाठिंबा मिळत होता. त्यामुळे त्याने अनेक तरुणांना आपल्या विचारांकडे ओढले आणि त्यांना दहशतवादी बनवले. अशा संघटना अनेकदा स्थानिक लोकांची गरीबी, अशिक्षितपणा आणि नाराजीचा फायदा घेतात. त्यांना असे सांगितले जाते की ते धर्मासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. पण खरा उद्देश असतो. भारतात अस्थिरता निर्माण करणे.
हा धोका फक्त जम्मू-काश्मीरपुरता मर्यादित नाही. तर ईशान्य भारत, दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतही याचा प्रभाव जाणवतो. तरीही, बहुसंख्य समाज दहशतवादाचा विरोधच करत आला आहे आणि करत राहील. फक्त काही कट्टर विचारधारेच्या लोकांचा अपवाद वगळता, दहशतवादाला समाजात थारा नाही आणि तो असूही नये.
6.प्रमुख गट व उदाहरणे:
नक्षलवाद आणि दहशतवाद यांचा उद्देश वेगवेगळा असला तरी दोघांमुळेही देशाच्या शांततेला धोका पोहोचतो.
नक्षलवादाचे प्रमुख गट आणि हल्ले
नक्षलवाद्यांची CPI आणि त्याची सशस्त्र शाखा PLGA (People’s Liberation Guerrilla Army) हे गट मुख्यतः आदिवासी आणि मागास भागांमध्ये सक्रिय आहेत. त्यांचा दावा असतो की ते गरीब, शोषित लोकांसाठी लढत आहेत. मात्र, त्यांचे मार्ग हिंसक आहेत. 6 एप्रिल 2010 रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात PLGA ने केलेला हल्ला नक्षल चळवळीतील सर्वात भयंकर हल्ला मानला जातो. या हल्ल्यात 76 केंद्रीय राखीव पोलिस (CRPF) जवान शहीद झाले होते. जंगलात लपून आणि अचानक हल्ला करणे ही या चळवळीची मुख्य रणनिती आहे.
दहशतवाद्यांच्या प्रमुख संघटना आणि हल्ले
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, ISIS आणि अल-कायदा हे अधिक धोरणात्मक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले दहशतवादी गट आहेत. हे गट धर्माच्या नावाखाली दहशत पसरवतात. भारतात या गटांनी अनेक वेळा मोठमोठे हल्ले केले आहेत. त्यापैकी 2008 मधील 26/11 मुंबई हल्ला हा सर्वात भयानक होता. यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारतात येऊन मुंबईत विविध ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 170 पेक्षा जास्त लोक ठार मृत्युमुखी पडले होते. तसेच, 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेत झालेला हल्ला, 2016 मधील उरी हल्ला, आणि 2019 मधील पुलवामा हल्ला हेही अत्यंत गंभीर हल्ले होते. पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधात तीव्र तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे भारताने त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइकसारखे पाऊल उचलले होते.
नक्षलवाद आणि दहशतवाद यामध्ये एक मुख्य फरक म्हणजे नक्षलवादी लढा सामाजिक-आर्थिक असंतोषातून उगम पावतो, तर दहशतवाद प्रामुख्याने धार्मिक कट्टरतेवर आधारितअसतो. नक्षलवादाचे कार्यक्षेत्र देशांतर्गत असून ते प्रामुख्याने मध्य भारतात दिसून येते, तर दहशतवादाचा प्रभाव जम्मू-काश्मीरपासून दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांपर्यंत दिसतो. या दोन्ही हिंसक प्रवृत्तींना थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत, पण त्याचबरोबर स्थानिक जनतेचा जागरूक सहभाग, शिक्षण, विकास आणि संवाद यांचीही गरज आहे.