वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस २०२४ ((World Champions of Legends) च्या थरारक अंतिम सामन्यात भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. बर्मिंगहॅम येथे काल शनिवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा ताणली गेली.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १९.१ षटकांत ५ गडी गमावत १५९ धावा करत सामना जिंकला. अंबाती रायडूने सर्वाधिक ५० धावा करून संघाला विजयाच्या दिशेने नेले. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत इरफान पठानने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स चषकावर भारताचे नाव कोरले.१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. सुरेश रैना फक्त ४ धावा करून बाद झाला. आमिर यामीनने एकाच षटकात दोन्ही खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
अंबाती रायडूने ३० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या. गुरकीरत सिंगने ३३ चेंडूत ३४ धावा केल्या. यानंतर युसूफ पठाणने १६ चेंडूत ३० धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. कर्णधार युवराज सिंगने २२ चेंडूत १५ धावा केल्या. इरफान पठाण पाच धावा करून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून आमिरने २, अजमल, रियाझ आणि शोएबने प्रत्येकी १ बळी घेतला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वाधिक ४१ धावा केल्या. भारताकडून अनुरीत सिंगने तीन बळी घेतले. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शरजील खान १० चेंडूत १२ धावा करून बाद झाला. मकसूदने १२ चेंडूत २१ धावा केल्या. कामरान अकमल १९ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. कर्णधार युनूस खानला ११ चेंडूत फक्त ७ धावा करता आल्या
.या रोमांचक विजयाने भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२४ चा विजेतेपदाचा किताब मिळवला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात आनंदोत्सव सुरू आहे.