भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण आता या मालिकेत एक महत्त्वाचा बदल झाला आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना जो धर्मशाला येथे होणार होता तो आता ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी रात्री ही घोषणा केली आहे. .
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने ड्रेसिंग रूममध्ये नूतनीकरणाचे काम केल्यामुळे स्थळांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हा सामना 6 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे, तो नव्याने बांधलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. तसेच सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर ग्वाल्हेरमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.
कसे असणार सामन्यांचे वेळापत्रक
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. तसेच टी-20 मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना दिल्लीत तर तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना २२ जानेवारीला आणि दुसरा २५ जानेवारीला होणार आहे. यातील पहिला सामना चेन्नईत तर दुसरा सामना कोलकात्यात खेळवला जाणार होता. मात्र आता दोन्ही सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली असून आता पहिला सामना कोलकात्यात तर दुसरा सामना चेन्नईत पार पडणार आहे.