ऑपरेशन सिंदूर (operation sindoor) नंतर भारताने आपले संरक्षण तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO हायपरसोनिक क्षेपणास्त्र बनवण्यावर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अलीकडेच DRDO चे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी एका मुलाखतीत ‘रुद्रम’ या क्षेपणास्त्राबद्दल माहिती दिली. पण भारताचे संरक्षण क्षेत्र नेमके कसे काम करत आहे? आणि भारताच्या आगामी योजना काय आहेत? सविस्तर जाणून घेऊयात.
1.आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण क्षेत्राचे स्वदेशीकरण
DRDO चे प्रमुख समीर व्ही कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार रुद्रम-1 क्षेपणास्त्र येत्या दोन वर्षांत सेवेत दाखल होईल, जे पूर्णपणे आत्मनिर्भर भारताचे एक उदाहरण आहे. या क्षेपणास्त्रामुळे देशाची क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. “एअर-टू-ग्राउंड क्षेपणास्त्रांच्या बाबतीत बोलायचे झाले तर यात NGARM, रुद्रम-2, रुद्रम-3, आणि रुद्रम-4 आहेत, ज्यांची रेंज हळूहळू वाढत जाईल. ही सर्व क्षेपणास्त्रे सध्या विकसित होण्याच्या टप्प्यावर आहेत, पण पुढील 3-4 वर्षांत ही सर्व क्षेपणास्त्रे सेवेत दाखल होतील.” अशी माहिती कामत त्यांनी दिली आहे.
A.रुद्रम चा अर्थ आणि कार्यप्रणाली
“रुद्रम”या शब्दाचा संस्कृत अर्थ आहे, “दुःख किंवा संकट दूर करणारा”. वास्तविक “रुद्रम” ही एक क्षेपणास्त्र मालिका आहे, जी डीआरडीओ (DRDO – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) यांनी तयार केली आहे. ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि महत्त्वाच्या जमिनीवरील टार्गेट्सवर हल्ला करण्यासाठी वापरली जातात. कामत यांनी सांगितले की, डीआरडीओ हवेतून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या विविध क्षेपणास्त्रांवर सक्रियपणे काम करत आहे. रुद्रम मालिकेमध्ये पुढील चार प्रकार आहेत:
रुद्रम-1
रुद्रम-2
रुद्रम-3
रुद्रम-4
शत्रूच्या संरक्षण व्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी ही सर्व क्षेपणास्त्रे वेगवेगळ्या क्षमतांसह तयार करण्यात आलेली आहेत, या प्रत्येक क्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती घेऊया.
1.रुद्रम-1 (Rudram-1)
रुद्रम-1 हे भारताचे पहिले अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्र आहे, ज्याची यशस्वी चाचणी 9 ऑक्टोबर 2020 रोजी सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानावरून करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 150 किमी आहे. तसेच हे INS-जीपीएस नेव्हिगेशन प्रणालीवर आधारित आहे. रुद्रम-1 द्वारे शत्रूच्या रडार, संप्रेषण केंद्रे (Communication centers) आणि इतर रेडिएशन उत्सर्जक प्रणालींना लक्ष्य करता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे लढाऊ विमानातून हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून, हे वेगवेगळ्या उंचीवरून आणि वेगवेगळ्या वेगाने डागता येते.
2.रुद्रम 2 (Rudram-2)
या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 29 मे 2024 रोजी सुखोई-30 एमकेआय वरून घेण्यात आली. याची मारक क्षमता सुमारे 350 किमी असून यामध्ये अधिक प्रगत पॅसिव्ह होमिंग हेड, INS-जीपीएस नेव्हिगेशन, आणि उच्च उंचीवरून डागण्याची क्षमता आहे. रुद्रम-2 चे उद्दिष्ट अधिक लांब पल्ल्यावरील शत्रूच्या रडार आणि कम्युनिकेशन सिस्टम्स, तसेच कमांड अँड कंट्रोल सेंटर्सवर अचूक मारा करणे हे आहे.
3.रुद्रम 3 (Rudram-3)
हे क्षेपणास्त्र अद्याप विकासाच्या टप्प्यात असलेले क्षेपणास्त्र आहे, ज्याची संभाव्य मारक क्षमता सुमारे 550 किमी असल्याचे सांगितले जाते. रुद्रम-3 विकसित झाल्यावर भारतीय हवाई दलाला फार मोठा स्ट्रॅटेजिक फायदा मिळणार आहे, कारण ही क्षमता शत्रूच्या सखोल प्रदेशातही टार्गेट भेदण्यास सक्षम असेल.
4.रुद्रम-4 (Rudram-4)
हे क्षेपणास्त्र रुद्रम मालिकेतील एक महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे, जे शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणालींना निष्प्रभ करण्यासाठी डिझाइन केले आहे. याची अपेक्षित श्रेणी 300 किमी पेक्षा जास्त असेल, ज्यामुळे भारतीय वायुसेनेला शत्रूच्या हद्दीत न जाता खोलवर हल्ले करता येतील. सुखोई-30 MKI, राफेल यांसारख्या लढाऊ विमानांवरून ते प्रक्षेपित करता येईल. याचे मुख्य उद्दिष्ट शत्रूचे रडार, दळणवळण केंद्रे आणि इतर रेडिओ-फ्रीक्वेंसी उत्सर्जित करणारे स्रोत नष्ट करणे हे आहे. रुद्रम-4 सध्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून, पुढील 3-4 वर्षांत ते सेवेत येण्याची शक्यता आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवणार आहे.
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचा एक ऐतिहासिक विकास म्हणून, ब्रम्होस या क्षेपणास्त्राचेही उत्पादन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर याच वर्षी मे महिन्यात उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले आहे.
2.ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विकास
ब्रह्मोस हे एक सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे, जे भारत आणि रशियामध्ये संयुक्तपणे विकसित केले गेले आहे. हे मिसाईल जलद गतीने लक्ष्यावर हल्ला करू शकते. त्यामुळे हे जगातील सर्वात वेगवान क्रूज मिसाईल्सपैकी एक मानले जाते. याचे संरक्षण क्षेत्रात आणखी उत्पादन वाढावे यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये ₹300 कोटी खर्चून उभारलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन केले आहे. या युनिटमध्ये दरवर्षी 80 ते 100 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील, तसेच येत्या 12 महिन्यांत उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. या युनिटमध्ये 290 ते 400 किमी रेंजची आणि मॅक 2.8 वेगाची क्षेपणास्त्रे तसेच पुढील पिढीतील प्रगत क्षेपणास्त्रांची निर्मिती होणार आहे. शिवाय रोजगारनिर्मितीच्या दिशेने एक पाऊल टाकत, या ठिकाणी 36 प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञांची भरती करण्यात आली आहे तसेच त्यांना दरमहा ₹30,000 वेतनही देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, पुढील काही वर्षांत ₹900 कोटींच्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये:
1.अत्यंत वेगवान
ब्रह्मोस ध्वनीपेक्षा 3 पट वेगाने (मॅक 2.8) उडते. म्हणजेच ते शत्रूच्या लक्षावर फार झपाट्याने पोहोचते.
2.लांब अंतरावर मारा करण्याची क्षमता
290 ते 400 किमी अंतरावर असलेले लक्ष्य अचूकपणे नष्ट करू शकते.
3.कोणत्याही दिशेने प्रक्षिप्त करता येते
हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, जहाजावरून, पाणबुडीवरून आणि विमानातूनही डागता येते.
4.अचूक मारा (Target Accuracy)
“फायर अँड फॉर्गेट” म्हणजे एकदा सोडले की ते आपोआप लक्ष्यावर जाऊन आदळते. मधे कोणत्याही मार्गदर्शनाची गरज नसते.
5.शत्रूपासून लपून हल्ला
ब्रह्मोसमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान आहे, त्यामुळे शत्रूच्या रडारला ते पटकन दिसत नाही.
6.वजनदार स्फोटक (वॉरहेड)
यामध्ये सुमारे 200 ते 300 किलो वजनाचे स्फोटक वाहण्याची क्षमता आहे.
7.भारतीय-रशियन संयुक्त निर्मिती
हे क्षेपणास्त्र भारतातील DRDO आणि रशियाच्या कंपनीने एकत्रितपणे विकसित केले आहे.
8.नावाचा अर्थ
“ब्रह्मोस” हे नाव भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मोस्क्व्हा या नद्यांच्या नावांपासून घेतले आहे.
3.सरकारच्या स्वदेशी धोरणांचा प्रभाव आणि फायदे
भारत सरकारने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या धोरणांद्वारे संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला प्रोत्साहन दिले आहे. पण कसा तर या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रात भारतातच शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला गेला आहे. या धोरणांचा मोठा परिणाम म्हणजे DRDO सारख्या संस्थांना रुद्रम-1 यांसारखी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे देशातच तयार करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक पाठबळ, आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक सहकार्य मिळाले आहे. तसेच यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठी पावले उचलली गेली आहेत, ज्यामुळे केवळ लष्करी क्षमतेतच नव्हे तर एकूण औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातही सकारात्मक बदल घडले आहेत.
सरकारच्या स्वदेशी धोरणांचे फायदे
1.संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे
2.स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे
3.विदेशी वस्तूंवर अवलंबून राहावे लागत नाही
4.भारतातच उद्योग, नवे रोजगार आणि खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढला आहे.
4.भविष्यातील क्षेपणास्त्र योजना
वास्तविक पाहता डीआरडीओच्या भात्यात असे अनेक बाण आहेत ज्याची माहिती अद्याप उघड झालेले नाही. पण DRDO पुढील दोन ते तीन वर्षांत असे अनेक क्षेपणास्त्र प्रणाली सैन्यात सामील करणार आहे, ज्यामुळे आत्मनिर्भर भारताची ताकद अधिक मजबूत होईल. DRDO सध्या ज्या प्रकल्पांवर काम करत आहे त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
1.वेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम (VSHORADS)
भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ने विकसित केलेली VSHORADS ही अल्प पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे. तिचा उद्देश शत्रूच्या कमी उंचीवरून येणाऱ्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणे आहे.
2.मॅन-पोर्टेबल अँटी-टॅंक गाईडेड मिसाइल (MPATGM)
MPATGM ही मॅन-पोर्टेबल अँटी-टँक क्षेपणास्त्र असून ती रणांगणात टँकविरोधी वापरली जाते.रणांगणात शत्रूच्या टँक व बख्तरबंद वाहनांचा नाश करणे. हा क्षेपणास्त्राचा उद्देश आहे.
3.प्रलय क्षेपणास्त्र
‘प्रलय’ हे अल्प-मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून
त्याद्वारे अचूक आणि वेगाने हल्ला करता येतो.
4.रुद्रम क्षेपणास्त्र
‘रुद्रम’ हे शत्रूच्या रडार प्रणाली नष्ट करण्यासाठी विकसित केलेले अॅंटी-रेडिएशन क्षेपणास्त्र आहे.शत्रूच्या रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली नष्ट करणे. हा याचा उद्देश आहे.
5.अॅडव्हान्स्ड लाइट टॉरपीडो
ही पाणबुडीविरोधी हलकी टॉरपीडो आहे. जिचा उद्देश शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेऊन त्याचा नाश करणे आहे.
6.मल्टी-इन्फ्लुएंस लँड माईन
मल्टी-इन्फ्लुएंस लँड माईन ही सागरी सिग्नल ओळखून स्फोट होणारी नौदलातील अत्याधुनिक माईन आहे.
शत्रूच्या जलवाहिन्यांना (नौका, पाणबुडी) विविध सिग्नलवर प्रतिसाद देत नष्ट करणे. हा माईनचा उद्देश आहे.
एकुणच भारताचे संरक्षण क्षेत्र आता स्वदेशी तंत्रज्ञानावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. DRDO ने विकसित केलेली ‘रुद्रम’ आणि ‘ब्रह्मोस’ यांसारखी क्षेपणास्त्रे देशाची लष्करी क्षमता वाढवत आहेत. तर ‘मेक इन इंडिया’मुळे संरक्षण क्षेत्रात उत्पादन, रोजगार आणि नवकल्पनांना चालना मिळाली आहे. पर्यायाने या घडामोडी भारताला अधिक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर बनवत आहेत.
🚨DRDO chief confirmed that India is actively developimg "Rudram 4, India's next generation hypersonic long range Air to surface missile: (IRDW) pic.twitter.com/AqRfaIFzAV
— Indian Infra Report (@Indianinfoguide) June 9, 2025